भारताच्या क्रिकेटसाठी आजचा रविवार (संडे) खूपच ‘स्पेशल’ आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या ‘फायनल’मध्ये रविवारी (१४ फेब्रुवारी) माजी विजेता भारत वेस्ट इंडिजशी दोन हात करेल.
मिरपूर / विशाखापट्टनम – भारताच्या क्रिकेटसाठी आजचा रविवार (संडे) खूपच ‘स्पेशल’ आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या ‘फायनल’मध्ये रविवारी (१४ फेब्रुवारी) माजी विजेता भारत वेस्ट इंडिजशी दोन हात करेल. ‘अजिंक्य’ भारत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. भारत आणि श्रीलंका या सीनियर संघांमधील तिसरी आणि अंतिम टी-२० लढतही रविवारी खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणा-या महेंद्रसिंग धोनी आणि सहका-यांना सलग दुस-या मालिका विजयाची संधी आहे.
ज्युनियर्सना चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी
आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकून चौथ्यांदा जगज्जेता बनण्याची संधी भारताला आहे. स्पर्धेत ‘अजिंक्य’ असलेल्या भारताचे प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिजविरुद्ध पारडे जड वाटते. भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर चमकदार कामगिरी केली आहे. मधल्या फळीतील मुंबईचा सर्फराझ खान (५ सामन्यांत ३०४ धावा) आणि सलामीवीर रिषभ पंतने (५ सामन्यांत २६६ धावा) फलंदाजीचा भार समर्थपणे पेलला आहे.
त्यांना अरमान जाफर, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरार आणि अमोलप्रीत सिंगची चांगली साथ लाभली आहे. मध्यमगती गोलंदाज अवेश खान (११ विकेट) भन्नाट फॉर्मात आहे. त्याला महिपाल लोमरार तसेच वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळत आहे. रविवारी बाजी मारल्यास सर्वाधिक जेतेपद मिळवण्यात भारत ऑस्ट्रेलिया मागे टाकेल. २००८, २०१० आणि २०१२ मध्ये भारताने बाजी मारली आहे. अष्टपैलू शमर स्प्रिंगर (२८२ धावा आणि ६ विकेट)आणि गिर्डन पोप (२२९ आणि ७ विकेट) तसेच वेगवान गोलंदाज अलझरी जोसेफने (१० विकेट) वेस्ट इंडिजला दुस-यांदा ‘फायनल’मध्ये पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांना पहिल्या जगज्जेतेपदाची प्रतीक्षा आहे.
२००४मध्ये पाकिस्तानविरुद्ध विंडिजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताला चकीत करण्यासह पहिल्यावहिल्या जेतेपदाचा निर्धार प्रतिस्पध्र्यानी केला तरी भारताला रोखणे, तितके
सोपही नाही.
वेळ : सकाळी ८.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.