समाजात काम करणा-या दहा मान्यवरांचा ‘प्रहार’च्या वर्धापन दिन सोहळय़ात ‘प्रहार भूषण’ पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
मुंबई- प्रसिद्धीपासून कोसो दूर राहताना आपण समाजासाठी काही देणे लागतो, या भावनेतून समाजात काम करणा-या दहा मान्यवरांचा ‘प्रहार’च्या वर्धापन दिन सोहळय़ात ‘प्रहार भूषण’ पुरस्कार देऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
‘प्रहार भूषण’ पुरस्कारामागील भूमिका ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे यांनी यावेळी मांडली. पुरस्कारामुळे समाजासाठी काम करणा-या व्यक्तींना प्रोत्साहन मिळते. समाजातील जी माणसे प्रसिद्धीपासून दूर राहिली आहेत, अशा व्यक्तींना शोधण्याचे काम ‘प्रहार’ करते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पुरस्कार विजेत्याची त्यांनी थोडक्यात ओळख करून दिली.
‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले डॉ. पी. डी. पाटील हे ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पिंपरी-चिंचड शाखेचे अध्यक्ष आहेत. यंदाच्या वर्षी होणा-या साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्षही आहेत. तर र. ग. कर्णिक हे ५२ वर्षे सरकारी कामगारांचे नेते आहेत. अत्यंत संयमाने त्यांनी ही कामगार चळवळ पुढे नेली आहे. याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तर दैनिक‘सागर’चे नाना जोशी यांना पत्रकारितेतील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सहकारी कायदे, सहकारी संस्थांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी कराव्या लागणा-या प्रयत्नांबाबत मार्गदर्शन करणारे विद्याधर अनासकर यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल तर कोकणच्या ग्रामीण भागात राहून पाच पुस्तके लिहिणारे लक्ष्मण खेतले यांना साहित्य क्षेत्रातील चोख कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
गिरीश गांधी यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्यालयाबद्दल व कणकवली तालुक्यातील वरवडेसारख्या खेडेगावात राहून फुलशेतीद्वारे शेतक-यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवणारे दिगंबर शंकर जाधव यांना ‘प्रहार भूषण’ने गौरवण्यात आले.
अमरावती जिल्ह्यात आदिवासी महिलांसाठी काम करणा-या नासरी चव्हाण यांच्या पुरस्कार त्यांच्या नातलगांनी स्वीकारला. तर जुहू चौपाटी स्वच्छ ठेवण्यात मोलाचे काम करणारे प्रदीप उपाध्याय यांना विशेष पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले.