परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे.
नवी दिल्ली – परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी आणि सहकारी पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकप जिंकतील, असा विश्वास भारताचा माजी कसोटीपटू वीरेंदर सेहवागने सोमवारी एका टीव्ही वाहिनीवरील एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला.
‘‘पाकिस्तानवरील विजय खूप काही सांगून जातो. या विजयाने भारताला हत्तीचे बळ मिळाले. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विराट कोहलीने त्यावर कळस चढवला. तो फलंदाजी करताना कुणीही टीव्हीपासून हलत नाही. माझ्या मुलांनीही शनिवारी तेच केले. भारताला आता जेतेपद पटकावण्याची सर्वाधिक संधी आहे. भारतासह न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत, असे मी स्पर्धेपूर्वी म्हटले होते. तसेच घडते आहे,’’ असे सेहवागने म्हटले.