संपूर्ण देशभरात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण लागले आणि बंद दरम्यान देशभरात ६ जण ठार झाले.
नवी दिल्ली- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सोमवारी संपूर्ण देशभरात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात या बंदला हिंसक वळण लागले असून ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको करण्यात आला. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून बंद दरम्यान देशभरात ६ जण ठार झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील चौघांचा तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सोमवारी सकाळपासूनच देशभरातील अनेक राज्यात बंदचे हिंसक पडसाद उमटले. खासकरून उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंडमध्ये दलित आणि आदिवासी संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. उत्तर प्रदेशात मेरठमध्ये आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला, त्यात एकाचा मृत्यू झाला. हापूडमध्येही आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली. तर ग्वाल्हेरमध्ये आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये १९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ग्वाल्हेरमध्ये अधिक हिंसा भडकू नये म्हणून सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
सर्वाधिक दलित खासदार भाजपचे
दलित आणि आदिवासींच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आमच्या सरकारमध्ये सर्वाधिक दलित खासदार आहेत, असे प्रसाद यांनी सांगितले.
मध्यप्रदेशात गोळीबार, संचारबंदी लागू
मध्यप्रदेशातील मुरैनामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर आंदोलन कव्हर करताना झालेल्या धावपळीत एका स्थानिक वृत्तवाहिनीचा पत्रकार जखमी झाल्याचे वृत्त आहे. मध्यप्रदेशात प्रचंड हिंसा उसळल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सागर जिल्हा आणि ग्वाल्हेरमध्ये हिंसेनंतर चार भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुरैना, भिंड, लहार, गोहद आणि मेहगांवमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राजस्थान पेटले..
राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रोको करण्यात आला. बाडमेरमध्ये तर आंदोलकांनी कार पेटवून दिल्या. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पवन नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सांचौरमध्ये व्यापा-यांना टार्गेट करण्यात आल्याचं वृत्त आहे. भरतपूरमध्येही आंदोलकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम केला. अलवरच्या दाऊदपूरमध्ये झालेल्या हिंसेत तीन तरूण जखमी झाले. या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. खबरदारीचा उपाय म्हणून राजस्थानमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पुष्करमध्ये हिंसक जमावाने २५ हून अधिक वाहनांची तोडफोड करत त्यांना आगी लावल्या. त्यामुळे पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागला.
उत्तर प्रदेशात जाळपोळ..
हापूड येथे पोलिसांनी लाठीमार केल्याने आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मुझफ्फरनगरमध्ये आंदोलकांनी पोलीस चौकीला टार्गेट केले. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. गाझियाबादमध्ये आंदोलकांनी रेल्वे रूळावर उतरून ठिय्या आंदोलन केले. मेरठमधील शोभापूर पोलीस ठाण्याला हिंसक जमावाने आग लावली आणि अनेक वाहनांची जाळपोळ केली. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले.
पंजाबमध्ये रेल्वेरोको
पंजाबच्या पटियाला येथे रेल्वे रोको करण्यात आला. रविवारपासूनच संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये ४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणीही आंदोलकांची निदर्शने केली.
बिहारमध्ये निदर्शने
बिहारच्या आरियामध्ये सीपीआयएमएलच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको केला. भाकपनेही बिहारमध्ये रेल्वे रोको केला.
गुजरात
गुजरातच्या कच्छमधील गांधीधाम येथे आंदोलकांनी गाड्या पेटवल्या. यावेळी महिलांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.
दिल्ली
दिल्लीच्या सर्व रेल्वे स्थानकांमध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये घुसण्यास आंदोलकांना मनाई करण्यात आली आहे. या शिवाय अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
ओडिशा
ओडिशाच्या संभलपूरमध्ये आंदोलकांनी रेल्वे रोको करत जोरदार निदर्शने केली.
तुरळक घटना वगळता राज्य शांत
मुंबई- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातील अनेक भागांत उमटले. नंदूरबारमध्ये हिंसक वळण लागले. आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. नागपुरातील इंदोरा चौकात आंदोलकांनी शहर परिवहनची बस पेटवून दिली.
नंदूरबारमध्ये सोमवारी सकाळी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे आगारातील बससेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. तर शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. नंदूरबार, नवापूर, तळोदामध्ये आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात बंदचे आवाहन करताना जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत तीन जण जखमी झाले. नागपुरमधील शताब्दी चौकात भारत बंदच्या पाठिब्यांसाठी विविध संघटनांनी निदर्शने केली. तर इंदोरा चौकात शहर परिवहनची बस पेटवून देण्यात आली. संविधान चौकात विविध संघटनांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, मुंबईतही आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांंनी वांद्रे येथे निदर्शने केली. नागपुरात बस पेटवून देण्याची एक घटना घडली तर अहमदनगरमध्येही विविध संघटनांनी निदर्शने केली. उर्वरीत महाराष्ट्रात बंद शांततेने पाळला गेला. काही ठिकाणी संमिo्र प्रतिसाद मिळाला.
संघ, भाजप दलितविरोधी
अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात सोमवारी दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दलितांची नेहमीच उपेक्षा केलीय. त्यांचा डीएनएच दलितविरोधी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. दलितांनी कायम मागास राहावे, हीच संघ व भाजपची भूमिका आहे. संघ, भाजपच्या या विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणा-यांचे बंड हिंसाचार घडवून मोडून काढले जाते, असे राहुल गांधी म्हणाले. हजारो दलित बांधव आज रस्त्यावर उतरून मोदी सरकारकडे त्यांच्या अधिकारांच्या सुरक्षेची मागणी करत आहेत. त्यांना माझा सलाम आहे, असेही राहुल यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे.
वांद्रे जिल्हा कार्यालयावरील भीमसेनेचा मोर्चा अडविला!
अॅट्रोसिटी संदर्भात भीमसेनेने सोमवारी भारत बंदला हाक दिली. यावेळी भीमसेनेने वांद्रे जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चावर तत्काळ कारवाई करत जिल्हा कार्यालयाच्या काही अंतरावर पोलिसांकडून हा मोर्चा अडविला. अॅट्रोसिटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी दर्शविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. अॅट्रोसिटीच्या कायद्यात कुठलाही बदल करू नये, अशी मागणी यावेळी मोर्चेक-यांनी केली.
काँग्रेसने डॉ.आंबेडकरांवर अन्याय केला
राहुल गांधी यांच्या आरोपला केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. भीमराव आंबेडकरांना भारतरत्न देण्यास विलंब का झाला? असा सवाल प्रसाद यांनी काँग्रेसला केला. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न का दिले नाही. आंबेडकरांचे निर्वाण १९५६मध्ये झाले. पण १९८९ मध्ये व्ही.पी. सिंह सरकारच्या काळात डॉ. आंबेडकरांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी व्ही.पी. सिंह सरकारला भाजपचा पाठिंबा होता, असे सांगत रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर हल्ला केला.
पुनर्विचार याचिका दाखल, आंदोलन थांबवा- योगी
दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे उत्तर भारतात काही राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. यूपीमध्ये काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. दलितांच्या भावनांची दखल घेत केंद्र सरकारने या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. आमच्या संवेदना दलित आणि आदिवासींसोबत आहेत. यामुळे भारत बंदमधून कायदा सुव्यवस्था बिघडवू नका, असे आवाहन योगींनी केले आहे.
आरक्षण बंद होणार नाही- पासवान
आरक्षण बंद करु शकणारा अजून जन्माला आलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अॅट्रॉसिटीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन काँग्रेसला फटकारले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतरत्नने सन्मान न करणा-या काँग्रेसला आता बाबासाहेबांची आठवण होत आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला. अॅट्रॉसिटीबाबत दलित
संघटनांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. बंदच्या काळात भारताच्या विविध भागात हिंसक घटना घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर तातडीने फेरविचार याचिका दाखल केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुप्रीम कोर्टातून निर्णय येताच सरकारने फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या, आठ दिवसांमध्ये फेरविचार याचिका दाखल केली, असे त्यांनी सांगितले.
पासवान यांनी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. काँग्रेसने दलितांसाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी काहीच केले नाही. काँग्रेसने त्यांच्यासाठी फक्त अपशब्दांचा वापर केला. आंबेडकर यांचे छायाचित्र संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये देखील लावून नये, यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आरक्षण बंद करु शकणारा अजून जन्माला आलेला नाही. खुद्द मोदींनीही आरक्षण बंद करण्यापूर्वी माज्या मृतदेहावरुन जावे लागेल, असे सांगितल्याचे पासवान म्हणालेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणा-या काँग्रेसने आंबेडकर यांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी विचारला. मृत्यूसमयी आंबेडकर यांच्याकडे औषधांसाठी देखील पैसे नव्हते, असेही त्यांनी सांगितले.