कॉलेज आणि अगदी शाळेत असतानाही आपल्या भविष्यात व करिअरमध्ये इतरांनाच आपल्यापेक्षा थोडा जास्तच रस असतो. त्यामुळे करिअरच्या गांभीर्याचे दडपण आपल्या मनावर चढत जाते; परंतु आपल्याला पुढे काय करायचं आहे हे खरोखरच कॉलेजच्या वयापासूनच ठरवण्याचं ध्येय आहे आणि ते ध्येय यशस्वीपणे गाठण्यातच खरं आव्हान आहे.
करिअर हा तसा तरुणांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असतो. किंबहुना लहानपणापासूनच आपल्या प्रत्येक गोष्टीचा उद्देश एकच असतो आणि तो म्हणजे आयुष्यात मोठं झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहणं, काहीतरी करून दाखवणं, स्वत:ची स्वतंत्र ठळक ओळख या जगात तयार करणं. त्यासाठी प्रत्येकाने मनाशी काहीतरी वाट निश्चित करून ठेवलेली असते.
अर्थात बालवaयात याबद्दल आपल्याला यासंबंधी फार कमी जाण असते आणि ते बरोबरच आहे. २+२=४ हे गणित शिकण्याच्या वयात भविष्याचं गणित सोडवू शकेल इतकं आपलं मन आणि बुद्धी प्रगल्भ नसतेच मुळी. आपल्या लहानपणी कोणीही मोठी माणसं एक प्रश्न अगदी हमखास विचारतात, तो म्हणजे ‘काय रे बाळ, मोठं झाल्यावर काय व्हायचंय तुला? ’ त्या मोठय़ांसाठी त्या वेळी जरी तो किंचित गंमतीचा प्रश्न असला तरी लहानग्यांची उत्तरं ऐकून त्यांना फार कौतुक वाटतं.
कोणी म्हणतं पायलट, कोणी डॉक्टर, तर काही मुलं हमखास एखाद्या नट-नटीचं नाव घेऊन मोकळे होतात. अमिताभ, शाहरूख, सलमान ही नावं तर त्यात सदैव अग्रेसर राहिली आहेत. पण कोणतंही क्षेत्र म्हटलं, तरी त्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि मार्ग काही त्या नकळत्या वयात माहीत नसतो. ही सगळी माणसं आपल्या आजूबाजूला समाजात वावरताना दिसत असतात आणि त्यातून निर्माण होणा-या कुतूहलातून, आकर्षणातून त्यावेळेला ते निर्णय घेतले जातात. काही मुलांच्या बाबतीत हेच निर्णय पुढे जाऊन त्यांचं ध्येय बनतात हेसुद्धा खरं आहे. सचिन तेंडुलकरला आदर्श मानणा-या अनेक विद्यार्थ्यांनी क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतलेला असतो, तशी मेहनतही ते करत असतात.
आधी शाळेत आणि मग महाविद्यालयात जसजशा आपण एक एक इयत्ता वर चढत जातो, त्याच वेगाने ‘आपल्याला काय व्हायचंय?’ हा प्रश्न आणि त्याची गंभीरता वाढत जाते. चांगले गुण मिळवत जाणा-यांच्या एका टप्प्यानंतर स्वत:कडून आणि इतरांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षासुद्धा वाढत जातात. करिअर म्हणजे काय हे ब-याच मुलांना एव्हाना कॉलेज प्रवेशापर्यंत कळलेलं असतं आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत घेण्यासाठीची तयारीसुद्धा ही मुलं स्वत:हून दाखवतात. खरं म्हटलं तर हाच मार्ग योग्य असतो. असं म्हणतात की तरुणांनी कधीही ध्येयहीन राहू नये. परंतु ध्येयाकडे आगेकूच करणा-या मुलांव्यतिरिक्त अशी काही मुलं असतात, ज्यांनी स्वत:साठी स्वत:हून मनाशी काहीच ध्येय ठरवलेलं नसतं.
आठवी-नववीपर्यंत हे चालून जातं, पण दहावीचं वर्ष आलं की मात्र या मुलांची तारांबळ उडतेच. ध्येय समोर असेल तर तितकी मेहनत घेऊन गुण मिळवून त्यासाठी पात्र होण्याची तयारी करता येते. अन्यथा मिळालेल्या गुणांच्या आधारे ‘इतर मित्र जातील त्याच क्षेत्रात मी जाईन’ अशी वेडी भावना तयार होते. आणि मग फक्त आणि फक्त मित्राने सायन्समध्ये प्रवेश घेतला म्हणून सायन्स निवडणारी बरीच मुलं आपल्या आजूबाजूला नक्कीच दिसतील. पालकसुद्धा यावेळी आपलं मूल स्वत:हून ठरवतंय मग विरोध का करा, या भावनेने पाल्याला पाठिंबा देतात.
आपला मित्र ती शाखा निवडतो ती त्याची आवड म्हणून, पण आपण ती शाखा निवडतो तीसुद्धा मित्र-मैत्रिणींचीच आवड म्हणून हे उघड सत्य काही या मुलांच्या आणि पालकांच्या उघडय़ा डोळ्यांना दिसत नाही. यातही काही मुलं स्वत:ला परिस्थितीशी जुळवून घेतात, पण नंतरच्या वर्षात हवे तितके गुण न मिळणं, अभ्यासक्रम अवघड जाणं, नापास होणं हे काही परिणाम मुलांचा आत्मविश्वास ढासळण्यास कारणीभूत होतात. वर्ष वाया जाणं, पैसे वाया जाणं आणि मुलाची काळजी यामुळे पालकांना होणारा त्रास तर वेगळाच! या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे वेळीच मिळालेलं मार्गदर्शन.
इतरांना जसं काहीतरी बनायचंय तसं आपल्याकडे सांगायला काहीच नाही याचा ब-याचदा न्यूनगंड मुलांमध्ये तयार होतो. पण असं वाटून न घेता योग्य मार्गदर्शन घेऊन आणि आपल्याला कशाची आवड आहे, आपली कोणती बाजू जमेची आहे हे ओळखून त्याच गोष्टीत करिअर करणं आणि तशी तयारी शाळेपासूनच करणं हे कधीही फायद्याचंच ठरतं. मग ते क्षेत्र फार सर्वसाधारण नसलं तरी पालकांचा पाठिंबा आणि आपली स्वत:ची आवड या भांडवलावर आपण आपलं एक यशस्वी करिअर घडवू शकतो. आणि हा उपाय शाळेत किंवा त्यापुढे महाविद्यालयात असताना किंवा अगदी शिक्षण संपल्यावरसुद्धा लागू होऊ शकतो हे विशेष!
बरेचदा परदेशात शिक्षण घेण्याचीही काही मुलांची इच्छा असते. ज्यांना खरंच स्वत:साठी शिक्षण घ्यायचं असतं ते लोक यात यशस्वी होतातच. पण पुन्हा एकदा, मित्र करत आहेत म्हणून किंवा फॅशन म्हणून परदेशात जाण्याचं ध्येय ठरवणा-यांना, ‘मला परदेशात जायचंय!’ या एका गोष्टीव्यतिरिक्त कशाचीच कल्पना नसते. जिथे देशातच तारांबळ उडते तिथे परदेशात जाऊन अभ्यास करणं हे काही सोपं काम नव्हे.
उत्तम शिक्षण घेऊन चांगले गुण मिळवण्याव्यतिरिक्तही ब-याच जबाबदा-या आपल्यावर परदेशात येऊन पडतात. स्वावलंबी बनणं, खाण्या-पिण्यापासून, आरोग्य सांभाळण्यापर्यंत सगळीच जबाबदारी ही आपलीच असते. स्वदेशात पालक आपल्यासाठी आपल्या कळत-नकळत किती कष्ट घेतात याचा साक्षात्कार मात्र परदेशात नक्कीच होतो. खरंच आवड आणि पूर्ण तयारी असेल, तरंच परदेशात जाणं योग्य ठरतं. अर्थात परदेशातलं यश हे बहुमोल नक्कीच असतं.
करिअर घडण्याची प्रक्रिया ही केवळ शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरू होऊन मग चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून स्थिर होण्यापर्यंतच मर्यादित नसते. ब-याचदा कशात करिअर करायचं हा प्रश्न म्हणजे आपण कुठल्या कंपनीत नोकरी करायची याच्याशी संबंधित करून ठेवतो. परंतु करिअर घडवण्याची प्रक्रिया ही खरं तर शाळेपासूनच सुरू झालेली असते. करिअर ओळखण्याआधी आपण स्वत:ला ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे.
स्वत:च्या आवडी-निवडी, स्वत:चे वीकपॉइंट्स व अवगत असलेली कौशल्यं ओळखणं हाच करिअर घडवण्याचा पाया आहे. त्यामुळे इतरांची आवड, इतरांच्या अपेक्षा यांच्यामुळे वहावत जाऊन स्वत:च्या बाबतीत किमान चुकीचे निर्णय तरी आपण घेणार नाही याची खात्री होते. आपल्याला आवड असणारी गोष्ट आपण नक्कीच यशस्वीरीत्या साध्य करू शकतो. कारण त्यासाठी मनापासून मेहनत घेण्याची आपली तयारी असते. ते क्षेत्र कुठलंही असू शकतं.
सायन्स, टेक्नॉलॉजी, कॉमर्स, आर्ट्सपासून ते अगदी अभिनय, नृत्य, खेळ इत्यादीपर्यंत! सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर हे आणि असे अनेक लोक मोठे झाले याचं कारण त्यांनी स्वत:ची आवड ओळखली आणि त्यातच आपलं करिअर केलं. तेंडुलकरनं जर एखादा जवळचा मित्र वेगळ्या क्षेत्रात जातोय म्हणून किंवा मोठे कोणीतरी सांगतात म्हणून क्रिकेटची आवड बाजूला ठेऊन वेगळंच क्षेत्र निवडलं असतं, तर आज हा मास्टर ब्लास्टर आपल्याला माहीतच नसता.
शिक्षण पूर्ण झाल्यावर ताबडतोब घवघवीत यश किंवा नोकरी मिळणं, हे फार क्वचित घडतं. कधीकधी करिअरमध्ये असं यश हे दोन पावलं पुढे असतं, तर कधी दोनशे पावलं! कितीही असली तरी तितकी पावलं चालून जाण्याची तयारी ठेऊन तो मार्ग पार करायलाच हवा, कारण पलिकडे यश आपली वाट बघतच असतं !