भारतात कोणतेही सरकार सत्तेत आले तरी त्यांनी खगोल संशोधनाला महत्व देऊन काम केले पाहिजे असे मत खगोल संशोधक डॉ.प्रकाश तुपे यांनी व्यक्त केले.
कल्याण- नजीकच्या काळात मंगळ ग्रहावर वस्ती करण्याइतपत संशोधन करण्यात भारतीय खगोल शास्त्रज्ञांना शक्य झाले आहे. परग्रहांशी संपर्क साधून त्यातूनच मानवी जीवन अधिक प्रगल्भ व सुखी करणे शक्य होऊ शकेल. भारतात कोणतेही सरकार सत्तेत आले तरी त्यांनी खगोल संशोधनाला महत्व देऊन काम केले पाहिजे असे मत खगोल संशोधक डॉ. प्रकाश तुपे यांनी व्यक्त केले.
कल्याण येथे सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वसंत व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना ‘मंगळावर स्वारी’या विषयावर ते बोलत होते.मंगळ या ग्रहावर यान उतरवून पृथ्वीवर तेथील वातावरणाविषयक माहिती ,छायाचित्रे पाठविण्यात व खगोल-विज्ञान संशोधन कार्यात आघाडी घेऊन महत्वपूर्ण भूमिका बजावणारा भारत हा एकमेव देश आहे,असेही तुपे म्हणाले.
पृथ्वी, तिच्या भोवती असणारे ग्रह- तारे यांची विस्तृत माहिती देऊन ते म्हणाले, मंगळ मोहिमेला भारताला साडेचारशे कोटी रुपये खर्च झाला. शेती, पाणी असे अनेक प्रश्न असताना एवढा प्रचंड खर्च योग्य आहे का? अशी टीका झाली. त्या टीकेत काहीही अर्थ नाही.कारण हा खर्च म्हणजे दरडोई फक्त तीन ते साडेतीन रुपये येतो,रशिया, अमेरिका यांनीही यापूर्वी मंगळावर यांन पाठविण्याचा प्रयत्न केला. या सर्व मोहिमातून मंगळाबद्दल असलेल्या अंधश्रद्धा दूर होण्यास खूप सहाय्य झाले.तसेच खरी माहितीही उपलब्ध झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. आकाशगंगा म्हणजे १० ते १५० अब्ज तारांचा समूह असतो. असे अनेक समूह या विश्वात आहेत. सूर्य हा एक अग्नीचा गोळा असून तो पृथ्वीपेक्षा ९५० पट मोठा आहे. अंतराळात जाऊन रहाणे अवघड आहे. गुरुत्वाकर्षणामुळे मंगळावर जीवसृष्टी असावी याबद्दल काही महत्वाचे पुरावे संशोधनातून पुढे आले आहेत. पण नवीन तंत्रज्ञानामुळे छायाचित्रे अनेक पटींनी मोठी करून काल्पनिक माहिती देण्याचेही उद्योग काहींनी केले जात आहेत.
त्यातून गैरसमज व चुकीची माहिती पसरविली गेली. मंगळावरच्या एका छायाचित्रात मनुष्यसदृश्य आकृती आली त्यावरून तेथे मनुष्यप्राणी असल्याच्या बातम्या कशा पसरवल्या गेल्या हे एका चित्रफितीच्या सहायाने त्यांनी पटवून दिले . मंगळावरचे दगड हे अणकुचीदार आहेत , प्रवाही पाण्यामुळे दगडांचे आकार बदलतात, याचा अर्थ फार पूर्वी केव्हातरी मंगळावर महाप्रलय झाला असावा असे मानता येईल, मंगळावर पाण्याची शक्यता, तेथील तपमान या सर्वाचा तेथे जीवसृष्टी होती का? आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कल्याणातील आकाश मित्र संस्थेचे संस्थापक हेमंत मोने,खगोल अभ्यासक प्रभाकर गोखले, डॉ. शैलेन्द्र गोडबोले, शिल्पकार सदाशिवराव साठे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.