शब्दांनो मागुते या- आपल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधुभाई हे कविता लिहितात हे कित्येकांना ज्ञात नाही.
शब्दांनो मागुते या- आपल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधुभाई हे कविता लिहितात हे कित्येकांना ज्ञात नाही. ‘‘माझी कविता हे माझे खासगी शेत आहे! ’’ असे भाई म्हणतात. हा कवितांचा किस्सा डॉ. महेश केळुसकर यांनी सांगितला.
वीणा, मौज, दीपावली, साधना या अभिजात साहित्याच्या अंकांतून भाईंच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. भाईंच्या जन्मदिनी २८ एप्रिल २००१ रोजी भाईंनी हे कवितेचे शेत सर्वासाठी मोकळे केले. ‘शब्दांनो मागुती या’ असे भाईंच्या कविता संग्रहाचे नाव आहे. ७३ कविता ७४ पानांवर निवांत बसल्या आहेत. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या श्री.अशोक केशव कोठावळे यांनी हे प्रकाशित केले आहे. हे काव्य संग्रह मिळणे दुर्मीळ आहे.
७३ कवितांमधील १४ कविता या करूळच्या कविता आहेत. कविता वाचून करूळचे चित्र उभे करणा-या कविता. २०१४ साली भाईंच्या बॅ. नाथ पै विद्यालयाला ३५ वष्रे पूर्ण झाली. त्या निमित्त भाईंच्या निमंत्रणावरून भाईंचे करूळ पाहता आले.
पाणी, घरदार, चव्हाटा, आई, भजन, महापुरुष, राखणदार, चौकट, तळे, स्वयंभू रामेश्वर, शाळा, गोकुळगाणे, पावसाचे पाखरू, अंबाडयाची कोंड या कवितांच्या शीर्षकांवरून तेथील निसर्गाची कवी मनाला लागलेला ओढ. जिव्हाळा, आपलेपणा मातीचा, जन्मभूमीचा दिसतो. पाणी कवितेत कवी मधुभाई लिहितात..
मायबापांची पुण्याई, पाणी उदंड उदंड
त्यांच्या तीर्थाची माझिया खांद्यावरती कावड
घरदार कवितेत कवींचे वडील आणि पंचक्रोशीतील मंगेशदादांच्या मनाच्या श्रीमंतीचे दर्शन घडते.दरोडयानंतर कफल्लक होऊनही मंगेशदादा कुबेराहून श्रीमंत श्रीमंती एकामागोमाग होणा-या मुलांची-न बोलवता येणा-या पाहुण्यांची,
गाई गुरांची, मोती कुत्र्याची-
चुलीच्या वैलावर पेंगणा-या लेकुरवाळया भाटीची
सर्वासाठी सर्वाच्या मनातल्या मायेची..
घरदारामध्ये त्यांची आत्येबाय, अंगण, झाडे, झोपाळा,पशुपक्षी निसर्ग वाचकाला श्रीमंत करतो.
गोकुळ गाणे कवितेत कवी दुधांच्या थेबांची रांगोळी काढतात. कवीची सूक्ष्म निरीक्षणशक्ती नवकवींनी अभ्यासावी.
सारवल्या गोठयामध्ये,
दूध-थेंबाची रांगोळी
दहीदुधात करिती,
सारे गोपाळ आंघोळी
सध्याच्या भाईंच्या नवीन बंगलेवजा घराच्या दाराला जुनीच वेलबुट्टीच्या नक्षीदार चौकटीवर, गोंडस गणपती असलेली चौकट आहे. चौकट या कवितेते जुने ते सोने म्हणत कलावंत मनासोबत जुन्या आठवणींची शिदोरी नव्या पिढीला, नातवंडांना देण्याची भावना असते.
सारी मंगेशदादांच्या जुन्या घराची दौलत, कुणा महादू सुताराच्या बापाने घडवलेली.. चार पिढय़ांपूर्वीची चौकट.
संभ्रम कविता गझलचा आनंद देते.
सरोवराला कमळांचा लागतो जिव्हाळा निळा, तसा भेटतो आकाशातील मला मेघ सावळा रतन अबोली कविता अबोला सोडून वाचकाची बोलती होते..
सतत अबोली खुडणारा,मी तुझ्यात पुरता बुडणारा बहरांच्या प्रहरांना चोचित घेऊन गगनी उडणारा.. जीवमूल्ये शिकविणारी अवकाश कविता.
सत्यासाठी परखड कविता. मानवी जीवनाच्या अखेरच्या दिवसांची मानसिक स्थिती सा-याच वृद्धांना मरणाचं स्मरण करून देणारी-संपत आला खेळ ही कविता.
येतो आता, ओळख ठेवा
माफ करा चुकले ते सारे
‘एक भिडू आपल्यातून गेला’
असे कधीही म्हणू नका रे.
ईश्वराचे अस्तित्व सांगणारी शुभागमन ही कविता. श्रमप्रतिष्ठा सांगणारी हाक. भाईंनी प्रेमकविताही लिहिल्या आहेत.
ते म्हणतात-:
ती अकस्मात येतांना, तुम्ही डोळे मिटून घ्यावे
प्रगटताच ती सभोरी, पुतळयासम स्तब्ध राहावे
हृदय ‘हृदयी’ जोडणा-या कवितांचा संग्रह, शब्दांना पुन्हा एकदा मागे घेऊन यावे.