इस्तंबुल येथे नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताच्या महिलांनी प्रभावी कामगिरी करत चौथे स्थान मिळवले. त्यात पुण्याच्या ईशा करवडेचे योगदान मोलाचे ठरले. आपल्या कामाबद्दल आपण समाधानी असल्याचे ईशाने ‘प्रहार’ला सांगितले.
मुंबई – ‘आम्हा महिलांची इस्तंबुल येथील कामगिरी खूपच प्रभावी होती. कोनेरू हम्पीसारखी सिनियर बुद्धिबळपटू स्पर्धेत खेळत नसतानाही आम्ही चौथे स्थान मिळवले. हे नक्कीच मोठे यश म्हणायला हवे. सर्वच मुलींची वैयक्तिक कामगिरी चांगली झाली. सुरुवातीपासून आम्ही आत्मविश्वासाने खेळलो, त्याचा फायदा झाला. तानिया सचदेवनेही मोलाचे योगदान दिले. प्रशिक्षक अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले,’ असे २५ वर्षीय ईशा सांगते. जळगावमध्ये पुढील महिन्यात होणा-या महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकावण्याचे ध्येय्य बाळगल्याचे तिने सांगितले.
बुद्धिबळ या खेळाकडे कशी वळलीस याबाबत विचारले असता, ‘माझ्या बाबांना बुद्धिबळाची आवड आहे. त्यांच्याकडूनच मला हा खेळ खेळण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवातीपासून खेळात यश मिळत गेले. त्यामुळे बुद्धिबळातच कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. आता पुण्यातील ‘लक्ष्य’ या क्रीडा फाउंडेशनकडून मला प्रायोजकत्व मिळाले आहे. त्याचा मला खूप फायदा होत आहे. प्रशिक्षणापासून सरावापर्यंतचा सर्व खर्च लक्ष्यकडून करण्यात येतो. लक्ष्यने सुरुवातीला प्रायोजकत्व दिलेल्या क्रीडापटूंमध्ये माझा समावेश आहे. गेली तीन वर्षे मला लक्ष्यचे पाठबळ मिळत आहे,’ असे ईशाने म्हटले.
इलो रेटिंग वाढवण्यासाठी काय मेहनत घेत आहेस असे विचारले असता, ‘सध्या माझे इलो रेटिंग २४१० आहे. मी याआधीच महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर हे ‘नॉर्म’ मिळवले आहेत. मात्र आता ग्रँडमास्टर बनण्यासाठी मला २५०० इलो रेटिंग करणे गरजेचे आहे. दोन ते तीन स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करून मला ते साध्य करायचे आहे,’ असा निर्धार तिने व्यक्त केला.
भारतातले आणि जगातील बुद्धिबळ यात काय फरक वाटतो, असे तिला विचारले असता, ‘जर सोयी-सुविधांचा विचार केला तर रशिया आणि युरोप हे आघाडीवर आहेत. इस्तंबुलमध्ये नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये रशियाच्या बुद्धिबळपटूंची संख्या मोठी होती. युरोपमध्येही मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. भारताच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जगज्जेता विश्वनाथन आनंदमुळे देशात बुद्धिबळला प्रसिद्धी मिळू लागली आहे. भारतातदेखील आठ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा होतात. ते पाहता देशातील बुद्धिबळाचा दर्जा उंचावत आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते,’ असे जागतिक ज्युनियर स्पर्धा (२००४) आणि गेल्यावर्षी इराणमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत कांस्यपदकांची कमाई करणा-या ईशाने सांगितले.