दुरवस्थेत सापडलेल्या मराठी भाषेच्या संवर्धनावर सध्या खूप काथ्याकूट सुरू आहे. खुद्द मराठी भाषिकांनाच आता आपल्या मायमराठीचा कंटाळा आलेला आहे. त्यांना आपली आई नकोशी झाली आहे. हा सारा प्रकार म्हणजे मराठी भाषिकांची आत्महत्याच म्हणावं लागेल आणि सुमारे दहा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या मराठी भाषिकांनी भाषिक-सांस्कृतिक आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला, हे कोडं वाटतं.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असं अनेकांना वाटतं. अनेकांचं हे वाटणं खरं असतं, मनापासूनचं असतं, पण मराठीच्या संवर्धनासाठी नक्की काय करायला पाहिजे नि कसं करायला पाहिजे याबाबत मात्र अनेकांना कल्पना नसते. काहींच्या डोक्यात काही कल्पना असतात, पण त्या इतक्या चमत्कारिक असतात, इतक्या अव्यवहारी असतात की त्यांना जे काय करायचं आहे ते नक्की मराठीच्या संवर्धनासाठीच आहे की आणखी कशासाठी आहे हेच कळत नाही. मराठीच्या संवर्धनासाठी सरकारच्या पातळीवरही काही ना काही होत असतं, पण ते खास सरकारी पद्धतीनं.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर अगदी सुरुवातीला ‘साहित्य संस्कृती मंडळ’ स्थापन झालं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या समर्थ व्यक्तीच्या हातात अध्यक्षपद देण्यात आलं. त्यांनी केलेल्या कार्याची यादी करायची झाली तरी तो एक ग्रंथ होईल. याच काळात उच्चशिक्षणाच्या दृष्टीनं साहित्य तयार करण्यासाठी वेगळी संस्था तयार करण्यात आली, ‘ग्रंथनिर्मिती मंडळ’. उत्तमोत्तम कामं सुरू झाली.
पण मराठी गंमत म्हणजे, नेमक्या याच काळात खुद्द मराठी भाषिकांच्या नेतृत्वानंच मराठीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. मराठीतून विकास होत नाही, अशी खोटी ओरड करून त्यांनी आपली मुलं इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये घालायला सुरुवात केली आणि ते दुष्टचक्र आजही चालूच आहे. हा गरप्रकार प्रथम मोठय़ा शहरांमधून सुरू झाला तरी त्याची लागण हळूहळू खेडय़ापाडय़ांपर्यंत झाली. सुदैवानं आजही ९० टक्क्यांहून अधिक मुलं मातृभाषेतूनच शिकत असली तरी त्यांना न्यूनगंडानं पछाडलेलं असल्यामुळे मराठीच्या बाजूनं विचार करणारे आज अगदीच अल्पसंख्य झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या न्यूनगंडामुळे होणारं नुकसान भयंकर आहे.
पुढे हळूहळू शिक्षणाचा बाजार झाला, सत्ताधा-यांनीच इंग्लिश शाळा काढून जोरदार धंदा सुरू केला, आता तर मराठी शाळा काढणं हा गुन्हाच झाला आहे. मराठी शाळांना जो लढा द्यावा लागतो आहे तो गेली काही वर्ष आपण सगळेच (मख्खपणे) बघत आहोत. एकीकडे आपल्या घरांतून मराठीला हद्दपार करायचं आणि दुस-या बाजूला मराठीचं कसं होणार म्हणून गळा काढायचा ही आजची समाजनीती झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खूप पैसा खर्चून ‘राज्य मराठी विकास संस्था’ स्थापली, आजही ती चालू आहे. सुरुवातीला प्रा. डॉ. सरोजिनी वैद्यांसारख्या समर्थ बाई संचालक होत्या, त्यांच्या अनेक कल्पनांना त्यांनी मूर्त स्वरूप दिलं, पण नंतर? त्यांच्यानंतर मुलाखत घेऊन रीतसरपणे संचालक नेमण्याचं कामही झालं नाही.
मराठीच्या नावानं अनेक संस्था आहेत, आणखी काही काढण्याचं चालूच आहे. पण मराठीसाठी/मराठीच्या निमित्तानं एखादी संस्था काढणं म्हणजे ‘आपल्या’ एखाद्या खास माणसासाठी एखादं राखीव कुरण तयार करून देणं एवढाच त्याचा अर्थ झालेला आहे. ते कुरण आपल्याला किमान काही र्वष मिळावं यासाठीच सारे प्रयत्न होतात, कुठलेही कुरणपती फारसं काही करत नाहीत याबद्दल आपल्यालाही काही वाटत नाही. या सा-या व्यवहारात मराठीशी कोणालाही काहीही
कर्तव्य नसतं.
या सगळ्या अनास्थेमागे एक मूळ कारण असं आहे की, खुद्द मराठी भाषिकांनाच आता आपल्या मायमराठीचा कंटाळा आलेला आहे. त्यांनाही आपली आई नकोशी झाली आहे. तमाम भारतीयांना भुलवणा-या गो-या कातडीच्या आकर्षणापासून मराठी भाषिक तरी कसे दूर राहणार? त्या जबरदस्त आकर्षणातून आता आपल्या मुलांसाठी ‘इंग्लिश मम्मी’ची योजना पालक करायला लागले आहेत. मुलांनाही ही गोरी मम्मी मायमराठीपेक्षा आवडू लागली आहे. हिच्या जोरावर अमेरिकेत वगरे जाऊन बाराकसारीक का होईना, काम मिळू शकतं एवढय़ावर समाधान मानणारी मम्मीची मुलं खुश आहेत. ठीक आहे.
हा सारा प्रकार म्हणजे मराठी भाषिकांची आत्महत्याच म्हणावं लागेल. सुमारे दहा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या मराठी भाषिकांनी भाषिक-सांस्कृतिक आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला हे कोडं वाटतं, बहुसंख्य जनता कसलाही विचार न करता केवळ मेंढरांच्या पद्धतीनं पुढच्याच्या मागे-मागे जाऊन खड्डय़ात उडी मारत आहे. ही भयंकर, आत्मघातकी चूक त्यांना कधी उमगणार आहे की नाही?
तेव्हा आपण सर्वानी जागतिक परिप्रेक्ष्यात आपल्या मराठीचा विचार करण्याची गरज आहे. मराठी ही मुळात खूप मोठी, संख्येनंही खूप मोठी आणि समृद्ध भाषा आहे. पण जुन्या समृद्धीवर आपण पुढे जाऊ शकत नाही. तिचा वापर केला तर ती आजही समृद्ध होऊ शकते. आपलं भांडण इंग्लिशशी नाही. तीही एक अत्यंत समृद्ध भाषा आहे. तीही आपण शिकावी, शिकून आपण समृद्ध व्हावं. पण ती समृद्ध आहे म्हणून तिलाच आपली आई नाही करता येत.
आपण सर्वत्र मराठीचा वापर करायचा आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवून प्रामाणिकपणे तसंच आचरण ठेवलं तर या एकसूत्री कार्यक्रमानं मराठीचं संवर्धन उत्तम प्रकारे होईल.