राजा पाटकर सासरवाडीला म्हणून गेला आणि चालता-बोलता तिथेच गचकला ही खबर बांबरवाडीत कळल्यावर जो-तो माणूस हळहळला. राजा पाटकर मेल्याचा सर्वात मोठा धक्का कुणाला बसला असेल तर तो नानू मालवणकराला! कारण राजा आणि नानूची जोडी गावात अतिशय फेमस!
गावकरी त्या दोघांना म्हणायचे की, पांडवांनी पाचजणात द्रौपदी केली तसं तुम्ही दोघांमध्येच एक बायको करा. यातील गंमतीचा भाग सोडला तर राजाचं तोंड बघीतल्याशिवाय नानू चहा पीत नसे आणि नानूची हाक आल्याशिवाय राजा अंथरूण सोडत नसे. रविवारी आणि बुधवारी दोघे एका क्वाटरमध्ये नाईन्टी-नाईन्टी मारत असत. त्यावेळी सुध्दा दोघांमध्ये एकच ग्लास होता.
राजाने बुधवारी पहिला नाईन्टीचा ग्लास मारला तर रविवारी नानूचा पहिला मान असायचा. त्यामुळे साहजिकच राजा पाटकर सासरवाडीला जावून मेल्याचं कळल्यावर त्याचं प्रेत गावात आणण्यासाठी बांबरवाडीतून माणसं गेली त्यामध्ये नानू मालवणकरही होता. अर्थात राजाचा बाप सदाशिव पाटकरही आपल्या तरण्या-ताठय़ा मुलाला आणण्यासाठी त्या मंडळींसोबत गेला होता.
सकाळी अकराच्या दरम्यान नानू मालवणकर, किशोर, बाबू गेंडय़ा, सदा पाटकर वगैरे मंडळी राजाच्या सासरवाडीला निघाली. राजाचं प्रेत आणण्यासाठी बाबाजी मोरेची सुमो करून ही माणसं गेल्यावर गाडी गेल्याच्या दिशेने पहात तात्या वाणी म्हणाले,
‘देव पन कसो हा बग! खरा म्हंजे पोरान बापसाक अग्नी देव्क व्हयो. पन पोराच्या देहाक बापसाक अग्नी देवचो लागता, हय़ेका काय म्हणायचा?’
‘तात्यांनू, तुम्ही म्हंतास ता अगदी बरोबर हा. पन परत्येकाच्या घराकडे असाच कायतरी घडत आसता. आता तुमचाच बगा ना! तुमी सत्तरी पार केलास. पन आजूनव खडखडीत आसास. आनी तुमचो धाकटो पोरगो जन्या. तिशीतलो पोर! पन बिचारो शिकपनान मरताहा.’ तात्यांच्या बोलण्यावर शित्या चौकेकराने अशी जळजळीत प्रतिक्रिया दिल्यावर हातातला दांडा तात्यांनी शित्याच्या पाठीत घातला आणि म्हणाले,
‘मायझंया, तू काय माज्या मरनाची वाट बगतंस? दारू पिव्न सोताची हाडा समशानात गेली हत त्येच्याकडे आदी लक्ष दी. तो राजा मराच्या अगोदर त्या देवान तुका कित्या उठवल्यान नाय? पन शेवटी त्या देवाक तरी काय दोष देनार म्हणा! देवाक चांगलीच मान्सा व्हयी आसतत.’ तात्यांचा दांडा आणि शब्द खावूनही निर्लज्ज शित्या लगेच म्हणाला,
‘ताच सांगतंय मी. देवाक चांगलीच मान्सा व्हयी आसतत. म्हणानच तुमी आनी मी आजून हयच आसव.’ दोघांचं बोलणं भांडणाच्या दिशेने जातंय हे लक्षात आल्यावर मध्येच कानू गांवकराने तोंड घातलं आणि तो म्हणाला,
‘अरे, हयंसर झाला काय नी तुमचा चल्ला काय हा? राजासारो जगनारो राजा मानूस आमका सोडान गेलो. त्येच्या मरनाचा थोडा तरी दुख बाळगा.’ कानू गांवकराच्या या बोलण्यावर नाम्या गोसावी म्हणाला,
‘आता तू राजा गेल्यार राजा पाटकर राजासारो जगलो असा म्हंतंस. उद्या भिकाजी साटविलकर गेल्यार तो भिका-यासारो जगलो असा म्हनशील!’
‘नाम्या, निदान मेल्यार तरी कोनाबद्दल वाय्ट बोला नूको.’ कानूने त्याला समज दिली. पण यावर गप्प बसेल तो नाम्या कसला? तो म्हणाला,
‘पन वाय्ट बोलाक भिकाजी आजून मेलो खंया?’
‘खरा सांगाचा तर आबा, आपल्या गावात मरूची पन सोय नाया. मायझंये मेल्यार पन कोनाक सोडनत नाय. ता कायव आसांदे. माजा म्हणना याकच होता की, तरणोताटो राजा जाण्यापेक्षा त्येचो बापूस सदा पाटकर गेलो आसतो तरी माका काय वाटला नसता.’ इति. तात्या वाणी.
‘तात्यांनू, जल्म-मरान आपल्या हातात आसता काय? तसा जर आसता….’
‘तसा आसता तर मी पयली शित्यासारख्या मान्सांची शिपारस त्या यमराजाकडे केलं आसतंय.’ तात्यांचा शित्यावरील राग पुन्हा उफाळून आला. यावर अतिशय शांतपणे शित्या चौकेकर म्हणाला,
‘तात्यांनू, माजी शिपारस करून तुमच्या पोरग्याक तुमी काय तसाच आयुष्यभर शिकपनात तळमळत ठेवतंलास?’ शित्या चौकेकराने शांतपणे तात्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यावर तात्या वाणी जागच्या जागी थयाथया नाचायले लागले. नाचता-नाचता हातातली काठी त्यांनी शित्याच्या दिशेने भिरकावली. पण ती काठी नेमकी मोठय़ा दगडावर पडली आणि काडकण त्याचे दोन तुकडे झाले.
डिझाईन वगैरे कोरलेली आणि गेल्या दहा वर्षापासून म्हातारपणात आधार देणारी ती काठी मोडून पडलेली पाहताच तात्यांनी आकाश-पातळ एक केलं. शेवटी आबा शेलार, कानू गांवकर वगैरेंनी मध्यस्थी करून हे प्रकरण इथेच मिटवलं. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मार्गाने गेला. पण सायंकाळपर्यंत प्रत्येकाच्या घराघरात राजा पाटकराच्या मरणाची चर्चा होती.
संध्याकाळी पाचच्या दरम्यान राजाचं प्रेत घेवून अँब्युलन्स गावात येत असल्याची खबर कळल्यावर सर्वजण पाटकराच्या घराकडे जमले. पण पुन्हा अध्र्या तासातच विश्वनाथ पराडकराच्या मोबाईलवर फोन आला की, राजाचं प्रेत घेवून येणा-या अँब्युलन्सला अपघात झाला. विश्वनाथाने दोघा-तिघांना बाजूला घेतलं आणि ही खबर सांगितली. यावर बापू दांडेकर आष्टद्धr(155)र्य व्यक्त करत म्हणाला,
‘आवशीक रे खाव! मैताच्या गाडयेक पन अॅक्सीडन होता?’
‘अरे, मैताची गाडी आसांदे नायतर आन्खी खंयची आसांदे. शेवटी गाडी ती गाडी! गाडी म्हटली की अॅक्सीडन इला.’ विश्वनाथाने बापूची समज घातली. त्यानंतर अपघात झालेल्या ठिकाणी बांबरवाडीतून रिक्षा करून कुणालाही न सांगता दुसरी टिम रवाना झाली. यामध्ये विश्वनाथ पराडकर, बापू दांडेकर, नाम्या गोसावी आणि नाना होता.
तिथे जाईपर्यंत चौघांच्या जीवात जीव नव्हता. पण अपघात झालेल्या ठिकाणी गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तिकडे वेगळीच परिस्थिती होती. मृत झालेला राजा पाटकर हा नानू मालवणकर, किशोर आणि बाबू गेंडय़ाबरोबर बोलत असलेला पाहून बांबरवाडीतून आलेली दुसरी टिम गारच झाली. राजाकडे पाहत विश्वनाथ पराडकराने नानूला विचारलं,
‘नानू, हय़ां काय? अरे, राजा मेलो होतो ना?’ विश्वनाथ पराडकराबरोबर बापू, नाम्या, नाना हे तिघेहीजण अक्षरश: गोंधळून गेले. पण त्यांच्या गोंधळात अधिक भर न घालता नानू त्यांना म्हणाला,
‘खरा सांगाचा तर राजा मेलोच नव्हतो. सासरवाडीक सासयेवांगडा त्येचा कायतरी भांडान झाला. त्या रागान त्येना झोपेचे गोळये खाल्ल्यान. खंयच्या तरी गावठी डाकटराक बोलवल्यानी तर त्येना केस गेली म्हणान सांगितल्यान. पन हय़ा अँब्युलन्सचा अॅक्सीडन झाला आनी त्येच्या आवाजान त्येका जाग इली. बाकी काय नाय.’
‘अरे, मग ही आनंदाची बातमी हा! थांब, मी आदी राजाच्या घराकडे हय़ां कळवतंय.’ राजाला जीवंत बघून विश्वनाथाला खूप बरं वाटलं. पण त्याच्या त्या आनंदावर विरजण टाकत नानू पूढे म्हणाला, ‘कळव. पन अॅक्सीडनात राजाचो बापूस गेलो हय़ा कळव्क इसरा नूको.’
‘म्हंजे?’‘म्हंजे अँब्युलन्स पलटी झाल्यार राजाच्या बापसाचा डोक्या दगडार आपाटला आनी जागच्या जागी सदामामा गेले. आता पंचनामो होयसर आपनाक हंयसर थांबाचा लागतला.’
नानू मालवणकराने ही माहिती दिल्यावर नाम्या गोसाव्याच्या डोळय़ासमोर सकाळचा प्रसंग उभा राहिला. तात्या वाण्याने राजाऐवजी त्याचा बाप मेला असता तर आपल्याला काहीच वाटलं नसतं असं वक्तव्य केलं होतं. शेवटी तात्यांच्याच मनासारखं झालं होतं. पण मयत घेवून येणा-या अँब्युलन्सला अपघात होवून मयत झालेला माणूस जीवंत होवून दुसरा माणूस त्या अपघातात मयत होणे हा आगळा-वेगळा प्रकार पाहून नाम्या गोसावी, विश्वनाथ पराडकर वगैरे मंडळी अगदी चक्रावून गेली होती. शेवटी जीवंत राजाशी सुख-दु:खाच्या गोष्टी करून आणि अपघातात मृत झालेल्या त्याच्या बापाच्या सुख-दु:खाच्या आठवणी काढून विश्वनाथ पराडकराने राजाच्या घरी फोन केला आणि एक सुखाची नी दुसरी दु:खाची बातमी कळवून टाकली.