मुंबईच्या कॉलेज फेस्टिव्हलचा ‘बाप’ म्हणून ख्याती असलेला सेंट झेविअर्स कॉलेजचा ‘मल्हार’ नुकत्याच मोठया जल्लोषात साजरा झाला. यंदा ‘मल्हार’ची थीम ‘लोकल’ अशी असल्याने त्याद्वारे अनेक पद्धतीने मुंबईतील संस्कृती, जीवन यांची सांगड विविध उपक्रमाद्वारे घालण्यात आली. या आधीच ‘चकाचक क्लीन अप ड्राइव्ह’, ‘द यार्ड सेल किंवा विविध एनजीओंना भेटी यासारख्या सामाजिक उपक्रमाद्वारे मल्हार आधीच प्रकाशझोतात आला होता. या दरम्यान त्यांची कामगिरी आणि त्यातून झालेली मदत ही उल्लेखनीय गोष्ट आहे.
पण हा मल्हार पूर्व झालेल्या गोष्टींचा भाग. 17 ते 19 ऑगस्ट या दरम्यान मल्हारचा मुख्य फेस्ट पार पडला. त्यापैकी पहिला दिवस हा विचारमंथनाचा म्हणजे ‘मल्हार कॉनक्लेव्ह डे’ होता. तर उर्वरित दोन दिवस हे भरपूर स्पर्धानी परिपूर्ण दिवस होते. या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना आपले कौशल्य जास्तीत जास्त दाखवण्याची संधी मल्हारने दिली. यावेळेसही मल्हारमध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. विद्यार्थ्यांनी समाजात घडणा-या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवावे, त्यामागील सत्य जाणून घ्यावे, चांगल्या-वाईट बाजू दिग्गजांचे विचार या सर्व समजून घेऊन आपल्या विचारचक्रांना चालना द्यावी, यासाठी ‘कॉनक्लेव्ह डे’ हा विशेष उपक्रम हाती घेतला. यात शोभा चौधरी यांनी ‘नक्षलवाद’ या विषयावर भाष्य केले. त्यातून त्यांनी आपल्या देशात पसरत जाणारा नक्षलवाद, त्याचे दूरगामी परिणाम आणि यासाठी आजूबाजूची परिस्थिती किती जबाबदार आहे, याची कल्पना दिली.
दिलीप पाडगावकर यांनी सध्या तापत असलेल्या काश्मीर मुद्यावर प्रकाशझोत टाकला. ‘द हिंदू’ या अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राचे ग्रामीण विभागाचे एडिटर पी. साईनाथ यांनी गरीब-श्रीमंत यांच्यात वाढत चाललेली दरी, गरिबांना सहन कराव्या लागणा-या समस्या तसेच उच्चभ्रू लोकांच्या दबावामुळे कधी कधी बदलावे लागणारे कायदे यामुळे आर्थिक परिस्थितीवर होणारे परिणामांची माहिती दिली. याशिवाय इतर अनेक दिग्गजांनी सामाजिक विषयांवर भाषणं केली.
सेलिब्रिटीजची मांदियाळी
‘मल्हार’दरम्यान विविध स्पर्धा जज करण्यासाठी त्या-त्या विषयांतील दिग्गज मंडळी आली होती. श्रीदेवी, अमृता राव, मास्टर मर्जी, लेसली लुईस, नंदू भेंडे, पूरब कोहली, शिबानी कश्यप अशा अनेक दिग्गजांसमोर विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. मोठमोठय़ा दिग्गजांसमोर परफॉर्म करत असल्याने आपण केवळ ‘उत्तम’च द्यावे, या चुरशीत सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पेशल इव्हेंट्स
‘मल्हार’मध्ये क्वीझ, ड्रॉइंग अँड पेटिंग, जॅम, डीबेट इत्यादी इव्हेंट्सना स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. पण स्पर्धक आणि प्रेक्षकांचं खरं आकर्षण ठरलं ते बॉलिवुड डान्स, स्ट्रीट डान्स, यूव्ही डान्स, कव्वाली, हिंदी व इंग्रजी रॉक बँड हे इव्हेंट्स. या प्रत्येक इव्हेंटमध्ये वेगवेगळय़ा आव्हानांना सामोरं जायचं होतं. थीम ‘लोकल म्हणून बॉलिवुड डान्समध्ये एखाद्या वाहतुकीच्या साधनाचा संदर्भ आणून नृत्य सादर करणे, अल्ट्रा व्हॉयलेट डान्समध्ये एखाद्या कथेचा संदर्भ देणे, अशी वेगवेगळी चॅलेंजेस देऊन स्पर्धेची रंगत वाढवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीही आपलं कौशल्य पणाला लावून आपली कलात्मकता दाखवत होते. बँड इव्हेंटमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेली रॉक गाणी, जसे सिस्टीम ऑफ डाऊनचा चॉप सुई, मरूनचा पे फोन, ब्रीटने स्पीअर्सच टॉक्सिक यांसारख्या गाण्यांना उत्तम प्रकारे कव्हर केले. एवढंच नाही, तर परीक्षकांनादेखील आश्चर्यात टाकणारे ‘इम्प्रोवाइजेशन’ या गाण्यात करण्यात आली. मल्हारला सर्वात शेवटी झालेला हा इंग्रजी बँड इव्हेंट म्हणजे मल्हारमध्ये सादर होणा-या परफॉर्मन्स आणि त्यात दर्शवली जाणारी क्रिएटिव्हिटी याचा ‘पीक पॉइंट’ होता असं म्हटलं तरी चालेल. शेरो-शायरीने सुरू होणारी कव्वाली, हुबेहूब पोशाख, अभिनय यामुळे कव्वाली इव्हेंट अनेकांच्या पसंतीस उतरला.
वर्कशॉप्स
स्पर्धाव्यतिरिक्त मुलांना खूप काही शिकता यावं, यासाठी विविध वर्कशॉप्सचं आयोजन केलं होतं. यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, ब्राझीलचा मार्शल आर्ट्स (डान्स स्वरूप) कपूर यासारखे नावीन्यपूर्ण वर्कशॉप्स झाले. ‘अँड्रॉइड अॅप मेकिंग’ या वर्कशॉपला उत्तम प्रतिसाद मिळाला.
कॉलेजेसची कामगिरी
मल्हारला यावर्षी 15 ते 20,000 विद्यार्थ्यांनी भेट दिली. यामध्ये मुंबईतील, तसंच मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळेस एन. एम., सोफिया, यू.पी.जी, एच.आर., के.सी., सिडनहॅम, झेविअर्स या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात बाजी मारली. त्याचप्रमाणे सिम्बॉयसिस कॉलेज, फग्र्युसन कॉलेज यांचा दबदबादेखील विविध स्पर्धामध्ये जाणवत होता. अशा छोटय़ा-मोठय़ा स्पर्धा मिळून 40च्या वर स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. विजेत्यांना ब्लॅकबेरी फोन्स, व्हेस्पा, प्ले बुक, स्कलकँडीचे हेडफोन्स अशा महागडय़ा वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
‘मल्हार’चे विशेष कौतुक करावंसं वाटतं. कारण एवढी सेलिब्रिटी फोर्स असतानासुद्धा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनाच आपले कलागुण सादर करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे उद्याच्या पोशनल आर्टिस्टसाठी मल्हार हा उत्तम आणि मानाचा प्लॅटफॉर्म समजला जातो. मल्हारच्या तीन दिवसांत कमी जागा आणि उदंड प्रतिसादामुळे काही समस्या निर्माण झाल्या. पण मल्हारच्या सिक्युरिटीने म्हणजेच याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आलेल्या काही विद्यार्थ्यांना मनासारख्या गोष्टी बघता आल्या नाहीत. पण ज्यांच्या नशिबी ‘ग्लॅमरस इव्हेंट्स’ बघणं होतं, त्याच्यासाठी तो लाइफटाइम अनुभव ठरला. स्पर्धकांच्या परफॉर्मन्समध्ये नावीन्य, मौलिकता, वेगळेपण होते, उत्साह होता. याच उत्साहात ‘मल्हार’चे तीन दिवस पार पडले. थोडक्यात, ‘मल्हर’ची ही ‘भरगच्च’ लोकल सुसाट धावली.