मैत्रीचं नातं म्हणजे एक अतुट, कधीच न तुटणारं बंधन! मैत्री ठरवून करता येत नाही. पण एकदा मैत्री झाली की, ती आयुष्यभर साथ देते. रक्ताचं नातं नसलं तरी मैत्रीत भरभरून प्रेम, जिव्हाळा असतो. आपण लहान असतानाच मैत्रीरूपी सागरातून प्रवास करायला सुरुवात करतो.
मैत्री म्हणजे काय हे माहिती नसतानाच शालेय जीवनापासूनच आपण मित्र-मैत्रिणी बनवायला सुरुवात करतो. मग शाळेचे दिवस हां हां म्हणता निघून जातात. आणि मग करावी लागते उज्ज्वल भविष्यासाठीची वाटचाल. या वाटचालीमध्ये शालेय जीवनातले मित्र-मैत्रिणी दुरावतात, कारण प्रत्येक जण या वाढत्या स्पर्धेच्या जगात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी धडपडायला लागतो.
शालेय जीवन आनंददायी, उत्साहदायी असतं. शाळेचे दिवस डोळ्यांसमोर आले की नकळतच गालावर हसू आणि डोळ्यांत तेज येतं, कारण शाळेत असताना अभ्यासासोबतच दंगा, मस्ती आणि शिक्षकांचा ओरडा हे समीकरण ठरलेलंच असायचं! शाळेचे ते मंतरलेले दिवस डोळ्यांसमोर तरळून जातात. आणि मग मागे राहतात त्या फक्त गोड आठवणी! शाळेचा कट्टयावरली मैत्री ही अशी आपल्या मनात जपली जाते.
व्हॉट्सअॅपमुळे आपण घरच्यांपासून दूर जातो असे काही जण म्हणतात खरे, पण याच व्हॉट्सअॅपमुळे आम्ही शाळेतले मित्र-मैत्रिणी एकत्र येऊ शकलो. जर व्हॉट्सअॅप नसतंच तर आम्ही एकत्र येणे फार कठीण होते. आजही शाळेचे दिवस आठवले की, समजावून सांगणा-या वारकरी मॅडम आठवतात. वेळेचे महत्त्व पटवून देणारे कदम सर डोळ्यांसमोर उभे राहतात.
आमच्या वर्गाच्या वर्गशिक्षिका वगद मॅडम, ज्या वेळोवेळी आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहून आम्हाला प्रोत्साहित करायच्या. लोहाळकर मॅडमची छडी लागे छम छम, पवार सरांचे ज्ञानामृत, संख्येत सरांचा पी.टी.चा पिरियड. पालकर मॅडम, विचारे मॅडम, लोहट मॅडम आणि सुळे सर यांच्या आठवणी आजही स्मरणात आहेत. शिक्षकासोबतच वर्ग मित्र-मैत्रिणीच्या आठवणी ताज्या आहेत.
सतत मस्ती करणारा चेतन, अमित आणि दीपक, कपाळाला टिळा लावून येणारा तुषार, हुशार पण अबोल अशी माझी जीवाभावाची मैत्रीण प्रियंका, प्रत्येक गोष्टीत सतत चूक काढणारा योगेंद्र आठवतोच. श्री क्लासेसमध्ये मस्तीखोर योगेशच्या करामती आठवल्या की आजही हसायला आल्याशिवाय राहत नाही.
इतक्या वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यामागचे कारण म्हणजे आम्ही तब्बल ८ वर्षानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आलो. आधी फेसबुक मित्र होऊन आणि नंतर व्हॉट्सअॅपवर शाळेचा ग्रुप तयार करण्यात आला. गोरेगाव आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आम्ही, १० वी २००७ चीआमची बॅच. आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचं नाव ‘मैत्री आपली मनात जपली’.
आमच्या ग्रुपमध्ये अमित, अनिल, अर्जुन, चैताली, चेतन, दीपक, धनराज, इब्राहिम, कृष्णा, मनोज, सूरज, प्रीती, राहुल, माऊ, सचिन, स्नेहा, सुभाष, तुषार, विक्रांत, विशाल, विवेक, स्वप्नील, योगेंद्र, योगेश, प्रियंका, सुनील, स्वाती, लहू, पल्लवी आणि मी असा आमचा वाढत चाललेला ग्रुप. आम्हा सर्वाना एकत्र आणण्याचं श्रेय जातं ते म्हणजे आमचा प्रिय मित्र दीपकला म्हणजेच आमच्या ग्रुप अॅडमिनला!
व्हॉट्सअॅप ग्रुपवर आठवणीत असलेले व नसलेले मित्र-मैत्रिणी ग्रुपमध्ये आलेत. दीपकची बायको जान्हवी, ती पण आमची खूप छान मैत्रीण झाली. अशाप्रकारे आमची ग्रुपवर मैफल जमली. मैफलीत रोज गप्पा सुरू झाल्या. शाळेत असताना एकमेकांशी फारसे न बोलणारे आम्ही ग्रुपवर मात्र तासन्तास गप्पा मारायला लागलो.
इतक्या वर्षानंतर सर्वामध्ये कमालीचा बदल झाला होता. सर्वाचे शिक्षण पूर्ण होऊन सर्व आर्थिकदृष्टया सक्षम झाले होते. काहींची लग्नंही झाली होती. पण आमच्या मैत्रीतलं प्रेम होतं तसंच आजही आहे. पुढेही तसंच राहील याबद्दल काही वाद नाही.
आम्ही सर्व आता वाट पाहत होतो ती एका भेटीची! तो योग जुळून आला योगेशच्या लग्नात. त्याच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही सर्व भेटलो. पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर भेटीगाठीचे सिलसिले सुरू ठेवायचं ठरलं. कोणावरही जबरदस्ती न करता ज्याला शक्य आहे त्याने भेटायचं असं ठरलं आणि हेच आमच्या ग्रुपचं वैशिष्टय़ आहे.
३१ जुलैच्या गुरुपौर्णिमेला शिक्षकांना जाऊन भेटायचं ठरलं. आणि मग काय ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी (विद्यार्थी) शाळेत गेलो. इतक्या वर्षानंतर शाळेत गेल्यावर, शाळा पाहिल्यावर मन प्रसन्न झालं. आमची शाळा होती तशीच आजही वाटली. पण आता शाळेत मराठी माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमही सुरू करण्यात आले आहे.
आमच्या शाळेत, आमच्या लाडक्या शिक्षकांना भेटून खूप छान वाटलं. आमच्या एवढाच आमच्या शिक्षकांनाही आम्ही आल्याचा आनंद झाला होता. पुन्हा जुने शाळेचे दिवस आठवून मन प्रसन्न झालं.
रमजान ईदला इब्राहिमच्या घरी शिरखुरम्याचा घेतलेला आस्वाद, प्रीतीच्या वाढदिवशी चिकनवर मारलेला आडवा हात, टपरीवरचा कटिंग चहा कायम आठवणीत राहील. ग्रुपमध्ये मस्ती, चिडवा-चिडवी, मस्करी, रुसवे-फुगवे आणि खूप सारी गंमत नेहमी सुरू असते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे काही झालं तरी आम्ही एकमेकांना समजून घेतो. त्यामुळेच आमची मैत्री अधिक घट्ट झाली.