भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा केली.
मुंबई- पुण्यातील भीमा कोरेगाव पडसादानंतर आज महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा केली.
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र बंद मागे घेत आहोत. मात्र, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनवर जे गुन्हे दाखल झाले होते, त्याच पद्धतीचे गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर दाखल करा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.
याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता, पण त्याने त्यासाठी पूर्ण मदत केली. तसाच प्रकार भिडे आणि एकबोटेंनी केला आहे. त्यांचे कृत्यही दहशतवादाप्रमाणेच आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच भीमा कोरेगावमध्ये कोणी हिंसाचार घडवला, ते मुख्यमंत्र्यांना माहित आहे, असा खळबळजनक आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
लोकांनी त्यांचे त्यांचे धर्म पाळावे, तुम्ही सांगाल तो धर्म असे चालणार नाही. राज्याला धर्म असू नये, असेही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.
भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटले. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर या शहरांत दगडफेक, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले. पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. शहरात सर्वात जास्त तणाव चेंबूर आणि घाटकोपरमध्ये होता. या भ्याड हल्ल्यामागे असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंसह अन्य आरोपींविरोधात गुन्हा नोंद होत नाही, त्यांना अटक होत नाही तोवर रस्ता मोकळा करणार नाही, अशी भूमिका घाटकोपर रमाबाई नगर, कामराज नगरातील आंबेडकरी जनतेने घेतली होती.
चेंबूरमधील आंदोलकांनी चेंबूर नाका येथे सायन-पनवेल मार्ग रोखून धरला. पवईत आयआयटी संकुलासमोर चक्का जाम करण्यात आला. गोवंडी, चेंबूर रेल्वे स्थानकांमध्ये लोकल रोखण्यात आल्या. शहरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, पवई या भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांच्या टायरमधील हवा काढण्यात आली.