देशातील प्रमुख शहरांमध्ये दणक्यात शाखा सुरू केल्यानंतर भारतीय महिला बँकेने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे.
चंडीगढ – देशातील प्रमुख शहरांमध्ये दणक्यात शाखा सुरू केल्यानंतर भारतीय महिला बँकेने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागातातील महिला बचतगटांच्या गरजा लक्षात घेऊन या भागात लवकरच शाखा सुरू करणार असल्याचे बँकेच्या अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे. बँकेच्या १०व्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
महिला बँकेकडून येत्या वर्षभरात शाखा विस्तारावर भर दिला जाणार आहे. महिला बँकेचा ब्रँड तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. मार्च २०१५ पर्यंत देशभरात ८० शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या प्रत्येक राज्यामध्ये शाखा सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्यापुढे देशभर विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
१,००० कोटींच्या भांडवलावर सुरू करण्यात आलेल्या महिला बँकेने २०२० पर्यंत ६०,००० कोटींचे उलाढालीचे लक्ष्य ठेवले आहे. महिलांना पुरेशा प्रमाणात वित्तपुरवठा करण्याचे बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांच्या गरजांनुसार कर्ज उत्पादने विकसित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये कॅटरिंग सेवा सुरू करण्यासाठी कर्ज, पाळणाघर सुरू करण्यासाठी आणि लघुा्रउद्योगासाठी कर्ज दिली जातील, असे त्यांनी सांगितले.
बँकेने काही शैक्षणिक संस्थांशीही करार केला आहे. यामध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंट्स ऑफ इंडियाशी केलेल्या कराराने महिलांना कर्जावर एक टक्का सवलत दिली जाईल. अशाच प्रकारे इतर संस्थांशीही करार केला जाणार असल्याचे सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. याबरोबरच महिलांना मोटार खरेदीसाठी सवलतीत वाहन कर्ज दिले जाणार असून याबाबत मोटार उत्पादकांशी करार करण्याची चाचपणी बँकेकडून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन कर्ज उत्पादने विकसित करण्यात आली असून ती सवलतीत देण्यात येतील. – उषा अनंतसुब्रह्मण्यम, अध्यक्ष, भारतीय महिला बँक