मी आपला असाच लिहीत जातो..झ-यातून पाणी फुटलं की वाहत जावं उताराकडे तसा..!मी डोकावतो खोल मनात..
मी आपला असाच लिहीत जातो..
झ-यातून पाणी फुटलं की वाहत जावं
उताराकडे तसा..!
मी डोकावतो खोल मनात..
आणि टाकतो एक आपला पोहरा
जे चटदिशी लागेल हाताला ते ओढत जातो..
सध्यातरी पाऊस भरपूर असल्याने गाळ लागतच नाही..
लागतात दोन-चार ओलेगच्च शब्दच!!
जो लागेल हाताला तो शब्द खेचत जातो..
किमान चार शब्दांची मुंडावळ तरी हाती लागतेच
किंबहुना बहुतेक वेळा शब्दांची भलीमोठी माळच बाहेर पडते..
असायला हवं भरपूर वाचन बिचन..
पण आळशीपणामुळे
वाचन बिचन फारसं काही होतच नाही..
तसंही वाचायचं म्हणजे तरी काय?
कुणाच्या नं कुणाच्या तरी आयुष्यात,
पडलेल्या पावसातून..
कोणीतरी लिहिलेलं म्हणजे
काहीतरी भिजक्या शब्दांतून
उमललेलंच असतं नं?
अशा मुरणा-या पावसामुळेच
तर झरे फुटतात ना?
त्यासाठी जमिनीचं कुठे वाचन असतं?
आणि वाचायचं ठरवलं तरी
ही पृथ्वी जाऊन वाचणार कुठे?
आकाशाच्या फळ्यावर?
मग आपणही जगत असतोच की एवढं
नाही सूर्याभोवती पण
किमान नशिबाभोवती हेलपाटे मारत..!
त्यातून घुसतच असतं की सारखं,
भलं वाईट.. काही ना काही तरी
आपल्या आत आत!
फक्त कचरा, प्लॅस्टिकपासून वाचायचं..
नाही तर मनच कलुषित व्हायचं
आणि झ-याचं तोंड जाम व्हायचं..
अशा छान पडलेल्या पावसातून
मनातल्या या शब्दांच्या माळा काढायच्या बाहेर..!
त्या नेहमीच ताज्याच असतात.
कारण कितीही खेचल्या तरी,
त्याचं एक टोक मनाशी कायम संधान साधून असतं!
लिहिता लिहिता जे आपल्याला भिडत जातं
ते सहसा कुणालाही भिडतं..!
आपण लिहितो माणसांसाठी,
अन् सगळी माणसं इथून तिथून सारखीच असतात..
आपणही माणूस असतो,
त्यामुळे आपल्याला जे भिडतं ते माणसांना भिडतच..
प्रत्येक माणसाच्या हृदयाची धडधड
तशीच असते ना..
आपल्यासारखी बंद-चालू?
तसा कोलेस्टेरॉलचा फरक असू शकतो थोडाफार..
कुणाकडे कोलेस्टेरॉल थोडा जास्त असतो..
ज्याला आपण चरबी म्हणतो
ती चरबी जेवढी अधिक तेवढं हृदय नाजूक..!
हं.. आता काही जणांची कातडीच जाड बीड असते म्हणतात..
गेंडय़ासारखी!
पण आपल्याला कुठे गेंडय़ासाठी लिहायचंय?
त्यामुळे काळजी नसावी
एरवी आघात मोठा करत असले तरी
शब्द अगदी सूक्ष्म असतात..
त्वचेला घाम फुटतो तिथूनच आत घुसतात..
काही वेळा तर काही काही शब्दांमुळे
थंडगार एसीमध्येसुद्धा
दरदरून घाम फुटतो म्हणतात!
थोडक्यात काय शब्द लिहिणा-याला
स्वत:ला भिडले असतील तर
वाचणा-यांना भिडतीलच..
सखोल अभ्यासात्मक शब्द असतील
अन् ते नीट पचून हृदयाद्वारे मेंदूला पोहोचले असतील
तर ते सुद्धा नक्की भिडतील..
पण आत न घेताच नुसतीच आपली
जाडजूड पुस्तके कोरून शब्द उचललेले असतील
तर या उचलेगिरीच्या शब्दांची मांडणी
बुद्धिवादी भासेल खरी..
पण ती नुसतीच मेंदूज्वर वाढवील..
निष्पन्न काहीच करणार नाही..!
एरवी आपले आपल्याला भिडले
तर बघा शब्द माणसाला भिडतीलच भिडतील!!!
अर्थात पण आपलं
सगळं खेचून घेतात हं हे शब्द..
एखाद्या कुंडीत झाड वाढतं
तेव्हा एकापरीने सगळी खत-माती खेचून घेतं..
नंतर नंतर नुसता मुळांचाच गुंता दिसतो
माती गायबच होते..
तसं हे लिखाण आपल्यातूनच उगवतं ना?
मग आपला कसं घेतल्याशिवाय
कसं उगवेल?
खरं तर शाप असतो हा..
हे लिहिता वगरे येणं म्हणजे..
वाचणा-याच्या आयुष्यात दोन आनंदाचे क्षण
आपण पेरतो हे तेवढंच खरं..
आयुष्याकडेही समृद्ध नजरेनं पाहण्याचा दृष्टिकोन
लिहिता लिहिता नकळत आपल्याकडून दिला जातो हेही खरंच!
पण स्वत:च्या आयुष्याचं काय?
जगण्यासाठी तुम्ही काय लिहिता
याला काडीचीही किंमत नसते..
पावसाआधी तुम्हाला कौलं परतता येतात
की नाही तेच महत्त्वाचे ठरते..
लिहून काय मिळवता?
म्हणावं तर तसं विशेष काही नाही!
तुमच्याबरोबरीचे पैशानं तुमच्या पुढे असतात..
मग बाहेर फुकटचा मान मिळून काय उपयोग?
घर चालवण्याच्या शर्यतीत तुम्ही कुचकामीच असता.
डोक्यावर कमळ उगवलं तरी चिखल चिखलच राहतो..
आपलं आयुष्य असंच मूळव्याधीच्या मोडासारखं..
सहनही होत नाही आणि छाटताही येत नाही..!
खरंच राव! लिहिता न येणंही खूप चांगलं असतं..!
वाचता मात्र आलं पाहिजे..
आपण लिहिले नाही म्हणून काय झालं?
वाचावसं वाटलं तर दुस-याचं वाचता येतंच..
शिवाय स्वत:चं आयुष्यही वाचवता येतं..!
एवढी अक्कल असूनही नाही सोडता येत
लिहिणं..
चिकटलेलंच असतं ते आयुष्याला
श्वास सोडून नुसतं मर्तिक राहील तोवर..
एक बरं..!
लिहून झालं की गरळ ओकल्यासारखं
सगळं शांत मोकळं मोकळं वाटतं..
पण
पुढच्याच क्षणी डोकं खाजायला लागतं..!
काय करणार?
सृजन नावाचा जुना इसब किंवा गजकर्ण
कोणत्याच मलमाने बराच होत नाही!
लिहिणं बंद तर नक्कीच करता येईल..
पण लिहिणं थांबवलं म्हणून सुचणं का थांबणार आहे?
कसंय कातडी लपवून ठेवली म्हणून
खाजवणं थोडीच थांबणार आहे?