१८ हजार बसेस, एक लक्ष दहा हजार कर्मचारी, ६५ लाख किलोमीटर रोजचा प्रवास, वर्षाला २६१ कोटी प्रवाशांची ने-आण म्हणजे दिवसाला ७१ लक्ष ६९ हजार प्रवाशांची ने-आण. दररोजचे डिझेल १२ लाख लिटर, एस.टी.चे उत्पन्न १०० रुपये पकडले तर त्यातील ३३ रुपये रोज डिझेलवरती खर्च होतात. म्हणजे एकूण उत्पन्नाच्या ३३ टक्के रक्कम डिझेलवर खर्च होते. एस.टी.बस सेवेचा असा प्रचंड पसारा आहे आणि हा सार्वजनिक उपक्रम गरिबांसाठी आहे, तो जगवलाच पाहिजे.
बघता बघता एस. टी. ला ६८ वर्षे झाली. १ जून १९४८ रोजी अहमदनगर येथून एस. टी. ची लाल डब्याची पहिली गाडी पुण्याला जायला सुटली. खाकी ड्रेसमधील कंडक्टरने एस. टी. चे पहिले तिकीट नगर-पुणे फाडले आणि ते बाळासाहेब भारदे यांच्या हातात दिले. श्री. बाळासाहेब भारदे हे एस. टी. चे पहिले प्रवासी. आजही नगरचा तोच एस. टी. डेपो महाराष्ट्रात फायद्यात असलेला एस. टी. चा एकमेव डेपो आहे. एकूण सगळी एस. टी. तोट्यात आहे. पण हा डेपो फायद्यात आहे. अहमदनगरहून एस. टी. ची सुरुवात झाली आणि बघता बघता ६८ वर्षे झाली. जगातील कुठल्याही परिवहन संस्थेत (पब्लिक ट्रान्सपोर्ट) अशी एकही संस्था नाही, जी एस. टी. एवढी मोठी संस्था आहे. त्या संस्थेचा पसारा एस. टी. एवढा मोठा आहे. देशात नाही, आशिया खंडात नाही, जगात कुठेच नाही. १८ हजार बसेस, एक लक्ष दहा हजार कर्मचारी, ६५ लाख किलोमीटर रोजचा प्रवास, वर्षाला २६१ कोटी प्रवाशांची ने-आण म्हणजे दिवसाला ७१ लक्ष ६९ हजार प्रवाशांची ने-आण. दररोजचे डिझेल १२ लाख लिटर, एस.टी.चे उत्पन्न १०० रुपये पकडले तर त्यातील ३३ रुपये रोज डिझेलवरती खर्च होतात. म्हणजे एकूण उत्पन्नाच्या ३३ टक्के रक्कम डिझेलवर खर्च होते. नियमित वेतन, बोनस, कंडक्टर, ड्रायव्हर यांना गणवेश, एस. टी. ची ही अशी थक्क करणारी सेवा आहे. एस. टी. महामंडळावर अनेक प्रकारची टीका रोज होत आहे. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात गेल्या ६८ वर्षात एस. टी. ला वाहतुकीसाठी दुसरा कोणताही पर्याय आजपर्यंत मिळालेला नाही आणि टीकाकारांनी दिलाही नाही. त्यामुळे एस. टी.च्या सेवेचे, एस. टी. महामंडळाचे, कर्मचा-यांचे, सर्व अधिका-यांचे आणि वेळोवेळी असलेल्या एस. टी. संचालक मंडळांचे किती आणि कसे अभिनंदन करावे, असे मनापासून वाटते. ही सेवा नसती तर महाराष्ट्राचे ग्रामीण जीवन कोलमडून पडले असते. आठवड्याच्या बाजाराला जायला एस. टी., छोटय़ा-मोठय़ा गावाला जायला एस. टी., खेड्यांतून चालणारी एस. टी., पूर, महापूर असले तरी धावणारी एस. टी., ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासात ५० टक्के सवलत देऊन शाळा-कॉलेजांत पोहोचवणारी एस. टी., ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत देणारी एस. टी., स्वातंत्र्य सैनिकांना उपकार म्हणून नव्हे तर त्यांच्या त्यागाला अभिवादन म्हणून त्यांना तिकिटाशिवाय प्रवास करू देणारी एस. टी., जावई असलेल्या पत्रकारांना फुकटात प्रवास करू देणारी एस. टी., गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन रात्री मुक्कामाला जाऊन जिथे झोपायची सोय नाही, तिथे ड्रायव्हर, कंडक्टरने त्याच गाडीत रात्र काढून दुस-या दिवशी आपल्या गावाला घेऊन येणारी हीच एस. टी.च आता एस. टी. चे २५० डेपो आहेत, दोन मुख्य वर्कशॉप आहेत, २० छोटे वर्कशॉप आहेत. जेव्हा ६८ वर्षापूर्वी एस. टी.ची सुरुवात झाली तेव्हा अनेक गावांमध्ये एस. टी. स्टॅण्ड नव्हता, डेपो नव्हता. मग रात्री गावाच्या कुठल्यातरी नाक्यावर एस. टी. मुक्कामाला राहायची. ड्रायव्हर-कंडक्टर गाडीतच झोपायचे. डासांमुळे झोप लागायची नाही. गाडीचा लाईट चालू ठेवला तर बॅटरी उतरायची. सकाळी ती गाडी धक्का मारून स्टार्ट करायची. रात्री मुक्कामाला असलेल्या गाडीतील स्पंज खायला गाडीत उंदीर घुसायचे. मुक्कामाला असलेल्या एस. टी. कर्मचा-यांनी अशा अनंत अडचणी सहन करून ही महाराष्ट्राची एस. टी. खेड्यापाड्यांत पोहोचवली. लोकप्रिय केली. त्यावेळचे अपुरे वेतन, खराब रस्ते अशा अनेक गैरसोयींमध्ये एस. टी. ची सेवा अजोड आहे. त्याची तुलनाच नाही. म्हणून ६८ व्या वाढदिवशी या सार्वजनिक उपक्रमाचेही मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे.
एस. टी. ला शिव्या देणारे खूप आहेत. एस. टी. ला समजून घेणारे कोणी नाही. खासगीकरणाच्या कालखंडाची सुरुवात झाल्यावर जेवढे फायद्याचे रस्ते आहेत त्या फायद्यांच्या रस्त्यांवर नीता, गीता, सीता, कोंडुसकर अशा खासगी गाड्यांनी आक्रमण केले. गाड्या वातानुकूलित केल्या. तिकिटे भरमसाट केली. त्या गाड्यांच्या मालकांना कसलीही गुंतवणूक करावी लागली नाही. ना त्यांचा ट्रॅव्हल्स स्टॅण्ड आहे, ना डेपो आहे. त्यांच्या बापाच्या मालकीचा रस्ता आहे असे समजून मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. सीझनप्रमाणे ते तिकीटदर वाढवतात आणि प्रवाशांची लूट करतात. गाडीच्या टपावर इतक्या मोठ्या प्रमाणात सामान नेतात, ते सामान प्रवाशांचे नाही. लॉरी, टेम्पोने जे सामान पाठवायचे ते सामान हे खासगी बसवाले थेट रचून हा सामान पोहोचवण्याचाही धंदा करतात आणि त्यातही पैसे मिळवतात. एस. टी. ला असला दुहेरी हलकटपणा करता येत नाही. शिवाय हे कोंडुसकर किंवा नीता, गीता, सीतावाले, मुंबई-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-लातूर, मुंबई-औरंगाबाद अशा फायद्याच्या मार्गावरच खासगी गाड्या चालवतात. ज्या गाड्यांमध्ये प्रचंड पैसा आहे, त्यातील एकही ट्रॅव्हल्सवाला खेड्यापाड्यांत आपली ए.सी. गाडी घेऊन जात नाही. कारण जिथे फायदा आहे, तिथेच ते वाहतूक करतात. त्यांची दादागिरी आहे. मग एलफिन्स्टन रोडचा नाका असेल. तिथे वाहतुकीची कोंडी झाली तरी, मुंबईकर, समर्थ असल्या गाड्या भररस्त्यात उभ्या करून वाहतूक कोंडी करणार. ठाण्याच्या तीन हात नाक्यावर हीच स्थिती आहे. खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी आरटीओवाल्यांना विकत घेतले आहे. हातमिळवणी झाली आहे. त्यामुळे फायद्याच्या रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्सवाले आणि तोटय़ांच्या रस्त्यावर एस. टी. म्हणून एस. टी. तोटय़ात आहे. ६८ वर्ष झाल्याबद्दल परिवहन खात्यामार्फत एस. टी. चा अभिनंदन सोहळा झाला. पण परिवहन खाते ज्या मंत्र्यांकडे आहे त्यांच्याकडे आरटीओ आहे. हे आरटीओवाले खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांबरोबर किती मिलीभगत करतात हे त्यांना दिसत नाही. गेल्या दोन वर्षात एस. टी.चे १६ कोटी प्रवासी घटले आहेत. ते का घटले? उदाहरणच सांगायचे तर मुंबई सेंट्रल मुख्य स्थानक, परळचे मध्यवर्ती स्थानक, ठाण्याचे स्थानक आणि सायनच्या रस्त्यावरील एस. टी. स्टॅण्ड, या सर्व ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे दलाल प्रवाशांना एस. टी.च्या आवारात शिरून खासगी बससाठी बाहेर बोलावून नेतात. ‘कमी पैशात नेतो’ म्हणून सांगतात, ‘एसी गाडी आहे’, सांगतात, ‘लगेच सुटणार’ असे सांगतात, अशा वर्मा, शर्माच्या कित्येक गाड्या अधिकृत एस. टी. स्टॅण्डच्या बाहेर पोलीस आणि आरटीओच्या हप्तेबांधणीतून सर्रासपणे उभ्या आहेत. त्यांना कोणीही अडवत नाही. आरटीओ एवढे भ्रष्टाचार असलेले खाते जगात नाही. मुंबईचे सगळे रस्ते अडवून टाकले आहेत. अशा या स्पर्धेच्या कठीण काळात सार्वजनिक वाहतुकीतील खेड्यापाड्यांतील व्यवस्था एस. टी. ने तग धरून टिकवून ठेवली आहे. महाराष्ट्राचे जे सामाजिक मानदंड मानता येतील, त्यात महाराष्ट्राची एस. टी., महाराष्ट्राची रोजगार हमी, कापूस खरेदी एकाधिकार योजना आणि मुंबई चाळ दुरुस्ती मंडळ या चारही योजनांमध्ये सामान्य माणसाचा विचार आहे. रोजगार हमीत मजुराचा विचार आहे. कापूस एकाधिकारात शेतक-याचा विचार आहे, घर दुरुस्ती मंडळात गरीब भाडेकरूचा विचार आहे आणि एस. टी.मध्ये तर सामान्य माणसाचाच विचार आहे. अशी ही गरिबाची वाहतुकीचे साधन असलेली एस. टी. आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना शिकवते आहे. शिक्षण शाळा-कॉलेजांत मिळते पण त्या शाळा-कॉलेजच्या दरवाजापर्यंत आमच्या ग्रामीण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना घेऊन जाणारी एस. टी.च आहे.
एस. टी.चे आणखी एक कौतुक केले पाहिजे. ज्या संस्थेच्या १८ हजार बसेस रोज रस्त्यावर धावतात, त्यांच्या अपघाताचे प्रमाण ००.०१ टक्कासुद्धा नाही. वर्षात एक कुठेतरी अपघात आहे, याचा अर्थ असा की, ‘देखभाल आणि दुरुस्ती’ या दोन्ही खात्यामध्ये काम करणारे कर्मचारी आपली एस. टी. तंदुरुस्त राहून रस्त्यावर चालली पाहिजे याकरिता कमालीच्या निष्ठेने काम करीत आहेत. गाडीच्या इंजिनाचा कोणताही भाग हा मुख्य इंजिन एवढाच महत्त्वाचा असतो. सार्वजनिक वाहतूक संस्थेमध्ये हाच नियम लागू आहे. प्रत्येकाने ही भूमिका घेऊन जर काम केले तर कोणतीही सार्वजनिक संस्था, टीकेची अनेक वादळे झेलून, सार्वजनिक जीवनात यशस्वीपणे वाटचाल करू शकेल. महाराष्ट्रात ६८ वर्षे धावणारी एस. टी., तिचे सर्व कर्मचारी, ड्रायव्हर-कंडक्टर, डेपो मॅनेजर यांचे तर खास अभिनंदन केले पाहिजे. कारण एस. टी.चा मेकॅनिक विभाग, कंडक्टर-ड्रायव्हर, आगारप्रमुख हे एस. टी. चा कणा आहेत. त्यांच्या जोरावर एस. टी. चालते. पण या सर्व कामगार संघटनांनी एस. टी.च्या प्रवाशांना वेठीला धरून कधीही आततायी संपाचे हत्यार उपसले नाही. याबद्दल या विचारी आणि समतोल कामगार संघटनांचेसुद्धा अभिनंदन केले पाहिजे. एस. टी. कामगार संघटना चालवणारे भाऊ फाटक आज नाहीत पण त्यांनी एस. टी. कामगारांना सकारात्मक विचाराची दृष्टी दिली होती. त्याच संघटनेचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस होते, आज त्यांचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. मुंबई सेंट्रल आगाराचे व्यवस्थापन सांभाळणारे त्यावेळचे प्रमुख पेस्तनजी यांनी सलग ३५ वर्षे सेवा दिली होती. त्या अवाढव्य आगारावर त्या काळात कमालीचा ताण होता. परळचे स्थानक झाले नव्हते. सायनचा रस्त्यावरचा एस. टी. स्टॅण्ड नव्हता. त्या काळात महाव्यवस्थापक पी. जी. साळवी, मुंबई आगाराचे पेस्तनजी, कदम, किंजवडेकर, मधुसूदन कोल्हटकर, विजय गुप्ते या आगारांतील अधिका-यांनी अथक मेहनत करून हा भार सांभाळला होता. पी. जे. साळवी यांनीच ‘रातराणी’ सुरू केली आणि तो प्रयोग यशस्वी झाला. अशा या ६८ वर्षाच्या एस. टी. ला पुन्हा एकदा तारुण्य प्राप्त होओ आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची सेवा एस. टी. च्या हातून अधिक प्रभावी होओ या मन:पूर्वक शुभेच्छा..!