देशात गेल्या काही वर्षात रस्ते आणि मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारत चालले आहे. या विस्तारणा-या जाळयामुळे लोकांचा प्रवास सुखकर झालेला नाही तर अधिक धोकादायक झाला आहे. हाच नियम हवाई वाहतुकीलाही लागू पडत आहे. गेल्या काही वर्षात हवाई क्षेत्रात खासगी कंपन्यांचे जाळे मोठया प्रमाणात विस्तारत गेले आहे. पण या हवाई क्षेत्राचा विस्तार जरी होत असला तरी मानवी चुकांमुळे हवाई वाहतुकीतील धोके वाढत आहेत.
काही वर्षापूर्वी भारतीयांसाठी परदेशगमन आणि हवाई सफर या दोन्ही गोष्टी मोठया कुतूहलाच्या होत्या. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीयांचे पगार आणि राहणीमान यात कमालीची वाढ होत गेली आणि त्यांची जीवनशैलीही बदलली.
कधी ऑफिसमधून कामानिमित्ताने तर कधी स्वखर्चाने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इतर राज्यांमध्ये जाताना विमानाचा वापर होऊ लागला. त्यासाठी काही रक्कम वर्षाकाठी शिल्लक ठेवण्याचा विचार केला जाऊ लागला. लोकांना रेल्वे आणि मोनो प्रवासाइतकाच विमानाचा प्रवासही ओळखीचा वाटू लागला आहे. सवयीचा वाटू लागला आहे. मात्र, या विमान प्रवासातील धोके मात्र लोकांच्या जीवावर उठू शकतील असे आहेत.
गेल्या आठवडयात अहमदाबाद-मुंबई-लंडनला जाणा-या एअर इंडियाच्या विमानात उंदीर सापडल्याने ते विमान मुंबईत पुन्हा खाली उतरवावे लागले. खानपान विभागातून आणलेल्या खाद्यपदार्थामधून हा उंदीर आला असावा, असा अंदाज बांधला जात होता. उंदरासारखा कधी जमिनीवर तर कधी जमिनीखाली बिळ करून राहणारा प्राणी हवाई वाहतूक क्षेत्रातील कर्मचा-यांच्या गाफीलपणामुळे विमान सफर करू लागला आहे. याच्या आधीही एअर इंडियाच्या एका विमानात उंदीर शिरल्याची घटना घडली होती.
जणू उंदीरमामाने एअर इंडियाच्या विमानाचे बुकिंग केले असावे. पण हा उंदीरमामा लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकला असता. या उंदराने विमानातील विजेच्या तारा किंवा इतर महत्त्वाच्या कॅबिनमध्ये शिरून तारा तोडल्या असत्या तर विमानात तांत्रिक बिघाड होऊन विमान अपघात घडला असता.
विमान उड्डाण आणि विमान उतरवताना आता विविध अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. ज्याच्यामुळे हवाई वाहतुकीतील तांत्रिक दोष कमी करता आले आहेत; परंतु या हवाई वाहतुकीतील महत्त्वाची गोष्ट असलेल्या मानवी चुकांमुळे इतरांच्या जीवाला धोका पोहोचला असता, त्याची जबाबदारी एअर इंडियाने घेतली असती का?
मध्य प्रदेशमध्येही हवाई वाहतुकीतील मानवी चुकीमुळे एका वृद्ध महिलेला रुग्णालयात हलवण्यात आले. ही महिला घराबाहेर उभी असताना एक पांढराशुभ्र गोळा तिच्या खांद्यावर आपटला. हा गोळा म्हणजे विमानातून खाली पडलेला ‘ब्ल्यू आईस’ होता. हा ब्ल्यू म्हणजे मानवी विष्ठा. लोकांची विष्ठा गोठवून त्याचे बर्फाच्या गोळयात रूपांतर केले जाते. नंतर विमानतळावर त्याची विल्हेवाट लावली जाते.
हा मानवी विष्ठेचा गोळा त्या वृद्धेच्या गच्चीवर प्रथम आपटला आणि नंतर ती घराबाहेर जिथे उभी होती तिथे तिच्या खांद्यावर आपटला. तो थेट तिच्या अंगावर पडला असता तर ती अधिक गंभीर जखमी झाली असती. हवाई वाहतुकीतील अशा गंभीर चुका या इतरांच्या जीवावर बेतत असतील तर मग विमानाकडे कुतूहलाने पाहायचे दिवस संपल्यात जमा आहे. अशा चुका घडत असतील तर विमान आले पळा पळा असे म्हणावे लागेल आणि विमान दिसले की, लपावे लागेल. जणू ते विमान म्हणजे शत्रू देशाचे विमान असावे.
मोनो, मेट्रो जी पूर्वी परदेशात दिसायची ती आता देशातही दिसू लागली आहे. प्रवासी विमानांची संख्याही वाढली आहे. पण या क्षेत्रात काम करणा-या तंत्रज्ञानाबरोबर मानवी चुका कमी होण्याची आवश्यकता आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोआधी धावणा-या मोनोतून प्रवास करण्यासाठी गेलेली अनेक कुटुंबे मुंबईतील वडाळा येथे अडकून पडली होती. मोनो रेल्वेतील वीजपुरवठा बंद पडल्यामुळे ही मोनो एक ते दीड तास अधांतरी अडकून पडली होती.
शेवटी वीजपुरवठा सुरू होणार नाही, हे निश्चित झाल्यानंतर मोनोतील प्रवाशांना अग्निशमन दलातील जवानांनी खाली उतरवले. मोनोची ही नाचक्की तर होतीच; पण त्याचबरोबर मुंबईचीही नाचक्की होती. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले; मात्र त्या चौकशीचे पुढे काहीच झालेले नाही. त्या चौकशीच्या ‘च’चीही चौकशी झालेली नाही.
एअर इंडियाच्या एका अभियंत्याचाही विमानाच्या पंख्यात अडकून मृत्यू झाला होता. त्यानंतर एका आठवडयातच उंदराची घटना घडली. या अभियंत्याचा मृत्यू आणि उंदराच्या विमानप्रवासाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पण ही चौकशी म्हणजे दोन चोरांनी किंवा दोन पोलिसांनी परस्परांची करायची चौकशी आहे. यातून काहीच निष्पन्न होणार नाही; पण मानवी चुकांमुळे निर्धास्तपणे प्रवास करणा-या प्रवाशांचा जीवाची आता काहिली होऊ लागली आहे.
कधी उंदीर विमानात शिरतो तर कधी विमानातील विष्ठा लोकांच्या अंगावर पडते तर कधी विमानाचा टायर फुटतो. एक ना अनेक घटना या लोकांच्या जीवावर बेतू शकतात. विमान प्रवासाचा फटका लोकांना बसेल तसा या मानवी चुकांचा फटका त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्यांना बसेल.
भारतातील मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात हवाई प्रवास आला असताना त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित कसा होईल, याकडे लक्ष देण्याऐवजी लोकांच्या जीवावर बेतणारे संकट म्हणजे हवाई प्रवास अशी व्याख्या केली जात असेल तर या सगळयाचा फटका देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या प्रवासी हवाई वाहतुकीला बसेल.
देशाची प्रतिमा खराब होईल ते वेगळेच. एकेकाळी भारत म्हणजे फक्त साप, विंचू यांचा प्रदेश असा परदेशी व्यक्तींचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. आता तो भारत म्हणजे विमानात उंदीर सापडणारा देश असा होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.