सरकारी आदेश डावलून मासळी विक्री बंदीवर लादण्यात आलेला मिरा-भाईंदर महापालिकेचा निर्णय रद्द करण्यात आला.
वसई – सरकारी आदेश डावलून मासळी विक्री बंदीवर लादण्यात आलेला मिरा-भाईंदर महापालिकेचा निर्णय रद्द करण्यात आला.
जैन धर्मियांच्या पर्युषण काळात दोन दिवस कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. मात्र मिरा भाईंदर पालिकेने हा आदेश डावलून शहरात मासळी विक्रीवर बंदी लादली होती. मात्र संबंधितांनी याविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्याने महापालिकेने हा निर्णय रद्द केला.
कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने श्रावण वद्य १२ व भाद्रपद शुद्ध ४ या दोन दिवशी बंद ठेवण्याचे आदेश होते. आयुक्त काकाणी यांच्या मंजुरीने उपायुक्त दिपक कुरळेकर यांनी २, ६ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस बंदचे आदेश काढले. राज्य सरकारच्या आदेशात या बाबत उल्लेख नसताना शहरात मासळी विक्री वर बंदी करण्यात आली. २ सप्टेंबर रोजी कुरळेकर स्वत: पालिका कर्मचा-यांसह मासळी बाजार बंद करण्यास गेले होते.
त्यावेळी मच्छीविक्रेत्यांशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर मच्छीविक्रेत्यांनी आयुक्त काकाणी यांची भेट घेतली व मासेविक्रीबंदी मागे घेण्याची विनंती केली. आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत मासळी विक्रीवरील बंदी रद्द केली. याबाबत स्वच्छता निरीक्षकांना कळवण्यात आल्याची माहिती उपायुक्तांनी दिली.