देशात आणि राज्यात स्वाईन फ्लूने लोकांची झोप उडवली आहे. या आजाराची लागण मुंबईकरांनाही झालेली आहे.
देशात आणि राज्यात स्वाईन फ्लूने लोकांची झोप उडवली आहे. या आजाराची लागण मुंबईकरांनाही झालेली आहे. मुंबई-ठाण्यातही काही रुग्ण आढळले आहेत. अशातच पुन्हा मुंबईकरांमध्ये टीबीची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईकरांच्या पाठीमागे आजारांचा ससेमिरा जणू बाराही महिने लागला आहे. मुंबईत गर्दी, दाटीवाटी यामुळे मोठय़ा प्रमाणात संसर्गजन्य आजारांचा प्रसार होतो. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बस, लोकल, रिक्षा तसेच टॅक्सींमुळे याचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढतो.
निरोगी व्यक्ती अशा टीबी किंवा स्वाईन फ्लू रुग्णांच्या संपर्कात आल्यास त्यालाही हा आजार होतो. त्याचबरोबर लोकांची स्वच्छतेबाबतची उदासीनताही याला कारणीभूत ठरते. कुठेही थुंकणे, कचरा टाकणे हे भारतीयांचे ‘राष्ट्रीय आजार’ आहेत. त्यांच्या या सवयींविरोधात अनेक मोहिमा राबवूनही त्या बदललेल्या नाहीत. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खांद्यावर स्थानिकांच्या आरोग्याची, त्यांच्यासाठीच्या मूलभूत सोयीसुविधांची जबाबदारी असते त्या संस्थाही बेजबाबदार आणि उदासीन बनल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका ही सव्वा कोटींहून जास्त लोकसंख्येची जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्था; पण ती मुंबईकरांचे जीवन धोक्यात घालत आहे. मुंबईत रस्ते, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, मलनि:सारण, वीजपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या सेवा मुंबईकरांना देणे बंधनकारक आहे. मात्र, या सेवा योग्य प्रकारे दिल्या जात आहेत की, नाहीत याची शहानिशा करण्याचे काम पालिका करत नाही. कंत्राटदारांच्या मदतीने या पालिकेचे काम सुरू आहे.
पालिका कर्मचा-यांवर अवलंबून राहण्यापेक्षा कंत्राटदारांवर अवलंबून राहण्याचे पालिकेचे धोरण आहे. पावसाळा म्हटला की, मुंबईकर आजारांमुळे हैराण होतात. सामान्य सर्दी-खोकल्यापासून मलेरिया, डेंग्यूने मुंबईकरांच्या डोक्याला ताप होतो. पाणी तुंबणे, अस्वच्छता, कचरा न उचलणे, नावापुरती नालेसफाई अशा एकमेकांशी संबंधीत गोष्टींमधून डासांची निर्मिती आणि त्यातून मलेरिया आणि डेंग्यूचा फटका लोकांना सहन करावा लागतो.
रस्ते उखडणे, रस्त्यात मोठमोठे खड्डे पडणे आणि खणलेल्या खड्डय़ात वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वार पडल्यामुळे होणारे मृत्यू, रस्त्यातील खड्डय़ांमुळे लोकांच्या मानेचे, पाठीचे आणि मणक्यांचे होणारे आजार यामुळे मुंबईकर बेजार आहे. लोकांना बेजार करण्यातच पालिकेला मोठी धन्यता वाटत आली आहे. अशा प्रकारे कार्यकारण भावानुसार निर्माण होणारे हे आजार म्हणजे सगळी पालिकेची देण आहे.
सगळय़ाच समस्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात घालणे, हे पालिका आपले कर्तव्य समजते की, काय, अशी शंका मुंबईकरांना येते. सगळय़ाच समस्यांचा खूपच मोठा गाजावाजा झाल्यावर त्याबाबत प्रबोधन करण्याचे काम पालिका हाती घेते. हे म्हणजे वरातीमागून घोडे नेण्याचा प्रकार आहे. मुंबईत आता दरदिवशी टीबीचे ४० नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. पालिकेने यावर तात्काळ उपाययोजना आखल्या पाहिजे. वेळ निघून गेल्यावर प्रबोधन करण्यात काय हशील?