आपण भारतीय आहोत, असे अभिमानाने सांगत असलो तरी प्रत्यक्षात भारतीयांप्रमाणे आपण वागत नाहीत. आपण जर याबाबत आत्मचिंतन केल्यास भारतीयांप्रमाणे आपण कसे वागायला हवे आणि कसे वागतोय हे स्वत:चे स्वत:ला कळून येईल.
आपण भारतीय आहोत, असे अभिमानाने सांगत असलो तरी प्रत्यक्षात भारतीयांप्रमाणे आपण वागत नाहीत. आपण जर याबाबत आत्मचिंतन केल्यास भारतीयांप्रमाणे आपण कसे वागायला हवे आणि कसे वागतोय हे स्वत:चे स्वत:ला कळून येईल. आज सगळेच चायना मेड झालोय. इलेक्ट्रिक वस्तू चायना, इलेट्रॉनिक वस्तू चायना, खेळाची साहित्ये चायना, खाद्यपदार्थ चायना. अगदी सुई-धाग्यापर्यंत सर्वच चायना मेड वस्तू वापरू लागलोय.
‘युज अँड थ्रो’ अशीच काहीशी ओळख या चायना मेड वस्तूंची आहे. केवळ स्वस्तात मिळतात म्हणून खरेदी करायच्या. वापरून झाल्या की त्या फेकून द्यायच्या. स्वस्तातील या वस्तूंमुळे सर्वानाच भुरळ पाडली नव्हे तर या वस्तूंनी भारतीय मार्केट काबीज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करतानाच स्वदेशी कंपन्यांच्या मोबाइल फोनवरही सवलत दिली.
परंतु भारतीय बाजारपेठा काबीज करणा-या चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याचे फर्मान त्यांना सोडता आले नाही. या सर्व वस्तूंमुळेच भारतीय बाजारपेठांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. भविष्यात भारतीय उत्पादने या चायना मेड वस्तूंपुढे टिकतील की नाही, अशी जी भीती व्यक्त केली जात आहे, ती खरी ठरली तर नवल वाटू नये.
ही झाली बाजारपेठांमधील भविष्यातील धोक्याची घंटा. परंतु ख-या अर्थाने मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनता आणि देशवासीयांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम चायनीज खाद्यपदार्थाच्या माध्यमातून होते. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्रत्येक जण चायनीय रेस्तराँ, हातगाडय़ा यांसह मिळेल तिथे जात चायनीय पदार्थावर आडवा हात मारत आहे. भारतीय पद्धतीच्या जेवणाऐवजी अनेकांना भुरळ पाडलीय ती चायनीज खाद्यपदार्थानी.
जागोजागी आणि रस्तोरस्ती कोप-यात एका आडोशाला चायनीजच्या हातगाडय़ा टाकून धंदा केला जातो. धंदा करण्यास कोणाचाही विरोध नसेल. परंतु हे पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी ज्या अजिनोमोटोचा वापर केला जातो ही पावडर आरोग्यास आणि शरीरास हानिकारक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या पावडरचा वापर करून बनवलेले खाद्यपदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास हाडे ठिसूळ होणे आणि अनावश्यक कॅलरीज वाढणे अशा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
तज्ज्ञांच्या मते चायनीज खाद्यपदार्थ चविष्ट बनवण्यासाठी मॉनसोडियम ग्लूटॅमिकचा वापर केला जातो. जो मिठाप्रमाणे असतो. पण त्यात अॅसिडची मात्रा असते. त्यामुळे चायनीय खाद्यपदार्थाच्या अति खाण्याने चायनीय रेस्तराँ सिंड्रोम असा आजार होतो. यामध्ये डोके दुखणे, छाती दुखणे आदी व्याधी बळावतात. म्हणजे आपण जे खाद्यपदार्थ अतिचवीने आणि आनंदाने खातोय, ते खातच मानसिक व्याधींना एक प्रकारे आमंत्रण देत असतो.
खरे तर मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांचे कौतुक करायला हवे की, त्यांनी शहरातील सर्व चायनीज हॉटेल तसेच हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थामध्ये वापरण्यात येणा-या ‘अजिनोमोटो’ पावडर वापरण्यास तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली. महापालिका सभागृहात यावर ठराव करण्यात आला. पुढे आता महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार काय कारवाई करतेय हा पुढचा विषय आहे. परंतु या गंभीर विषयाला वाचा फोडून जनतेचे आरोग्य बिघडवणा-या खाद्यपदार्थावर सर्वाचे लक्ष वेधले.
सिगारेट पिणे, तंबाखू खाणे तसेच मद्यपान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातकच आहे. जर अशा वस्तूंची विक्री करताना, त्यावर आरोग्यास अपायकारक, असे लिहिले जाते, तर मग चायनीय खाद्यपदार्थाबाबत अशी जनजागृती का होऊ नये. चायनीय खाद्यपदार्थ जेव्हा भारतात किंबहुना मुंबईत आले होते, तेव्हा ते विशेष हॉटेलमध्येच विकले जात होते. हॉटेलशिवाय ते खाद्यपदार्थ कुठेच मिळत नव्हते. त्यानंतर हातगाडय़ांवर हे खाद्यपदार्थ विकले जाऊ लागले.
म्हणता म्हणता हातगाडय़ांचे एवढे पेव फुटलेय की या चायनीज गाडय़ा खाद्यपदार्थाऐवजी दारू पिणा-यांचा अड्डाच बनू लागला आहेत. एक ते दोन प्लेट चायनीज पदार्थ मागवून दारूच्या बाटल्या ढोसायच्या हा प्रकार सर्वच चायनीज हातगाडय़ांवर चालू असतो. मद्यपान केल्यामुळे आधीच आरोग्यावर परिणाम, त्यातच चायनीज पदार्थ खाऊन आरोग्याची पुरती वाट लावली जात आहे.
पण याचा विचार करतोय कोण? चीनला युद्धात भारताला हरवता आले नाही. नामोहरम करता आले नाही. ते अशा प्रकारे विषारी खाद्यपदार्थाची चटक लावून भारतीयांना हळूहळू संपवण्याचे काम करत आहे. खरे तर हे विचार वाचून अनेकांना हसायला येईल. परंतु या परकीय देशातून भारताला वारंवार टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे जे युद्धाने जिंकले गेले नाही, तर ते अशा प्रकारे जिंकण्याचा चीनचा डाव नसेल हे कशावरून? जास्त दूर जाऊ नका. आपली भावी पिढी चायनीज भेळेच्या प्रेमात पडू लागलीय.
प्रत्येक शाळांच्या आसपास आणि शाळांच्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी चायनीज भेळ विकणा-यांनी स्टॉल टाकले आहेत. या धंद्यात अधिक पैसा मिळत असल्यामुळे प्रत्येक जण चायनीज भेळेची विक्री करत आहेत. पावलागणिक हे स्टॉल दिसत असून अवघ्या पाच रुपयांमध्ये ही भेळ मिळत असल्यामुळे शाळेचे विद्यार्थी ही भेळ खाण्यासाठी गर्दी करत असतात. पण ही भेळ खाऊन बालवयातच त्यांचे आरोग्य बिघडवण्याचे काम ही चायनीज भेळ करत आहे, याचा कदाचित सर्वानाच विसर पडलेला असेल.
लालभडक रंगातील कोबीमिश्रित भेळ आणि शेजवन चटणीतील ते कढईतील मन्च्युरियन पकोडे पाहून रक्तरंजित अवयवांची आठवण येते. एक प्रकारे चायनीय भेळ आरोग्याला घातक आहे, हे यावरून स्पष्ट संकेत दिले जातात. आता कोणी म्हणेल, की हे पदार्थ खाल्ल्यामुळे आजार अथवा व्याधी झाल्याचे कसे काय म्हटले जाते. याला काय पुरावा आहे. परंतु याला पुरावा देण्याची गरज नाही. ज्याला त्याला आपले आरोग्य प्रिय आहे. आपले आप्तस्वकीय प्रिय आहेत. त्यामुळे आपल्या माणसांची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतूनच प्रत्येकाला चायनीज पदार्थ पूर्णपणे खाणे जरी बंद करता येत नसेल तर किमान खाण्याचे प्रमाण कमी करावे, हेच सांगावेसे वाटते.
चायनीज खाद्यपदार्थाच्या हातगाडय़ा, चायनीज भेळचे स्टॉल दिवसागणिक वाढत असताना, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. हातगाडय़ा उचलण्याची कारवाई केली जात असली तरी तो केवळ फेरीवाल्यांवरील कारवाईचा भाग आहे. परंतु याशिवाय कोणतीच ठोस कारवाई नाही. महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आपल्याला अधिकार नाही म्हणून हातावर हात घेऊन बसला आहे. एका बाजूला मुंबईकरांना प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यरत असला तरी चायनीज भेळसह खाद्यपदार्थ विकणा-यांवर आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करून त्यांच्याविरोधात अॅक्शन मोहीम राबवावी असे वाटत नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाचे नेमके काम तरी काय? आंतरपाट धरून विवाह प्रमाणपत्र देण्याचे काम हे विभाग इमानेइतबारे करत आहे. पण साथीचे आजार पसरवणारे लिंबू सरबतवाले, कापून फळांची विक्री करणारे तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही कोणतीही कारवाई केली जात नाही.
आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आधीच लोकांचे आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. आणि आरोग्य बिघडवणा-या प्रवृतींना आळा घालणेही तेवढेच महत्त्वाचे असते. पण आरोग्य विभाग ढिम्मच बसला. राज्याचे अन्न व औषध प्रशासनही मूग गिळून बसले आहे. सण आला की भेसळयुक्त मावा पकडण्यापलीकडे या विभागाचे कार्य काही दिसत नाही.
सणामध्ये महापालिका-अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हातात हात घालून भेसळयुक्त मावा व त्यापासून बनवलेली मिठाई जर जप्त करू शकतात, तर मग चायनीज भेळ आणि चायनीज पदार्थ विकले जाणारे रेस्तराँ, हातगाडय़ा आणि स्टॉलविरोधात अशी मोहीम का राबवली जात नाही. जर महापालिकेला तसे अधिकार नसतील तर अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करून महापालिकेने संयुक्त कारवाई करायला हवी. परंतु ही मानसिकता महापालिकेच्या अधिका-यांमध्ये दिसत नाही. चिरीमिरी घेत पोलिसांसह महापालिकेचे अधिकारीच अशा हातगाडय़ांना प्रोत्साहन देतात, म्हणून आज अशा हातगाडय़ांचे पेव फुटले आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.