उत्तर प्रदेश आणि मुंबई यांच्यातील ‘ग्रुप ए’मधील लढतीत धुक्यामुळे रविवारी पहिल्या दिवशी ५० षटकांचाच खेळ झाला.
कानपूर – उत्तर प्रदेश आणि मुंबई यांच्यातील ‘ग्रुप ए’मधील लढतीत धुक्यामुळे रविवारी पहिल्या दिवशी ५० षटकांचाच खेळ झाला. त्यात यजमानांनी १ बाद ११५ धावा केल्या. ते पाहता मुंबईच्या गोलंदाजांना दिवसभरात एकच विकेट घेण्यात यश आले.
नाणेफेक जिंकून मुंबईने क्षेत्ररक्षण घेतले. फॉर्मात असलेला मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने सलामीवीर मुकुल दागरला (१५) बाद करत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र तन्मय श्रीवास्तव (खेळत आहे ४९) आणि प्रशांत गुप्ता (खेळत आहे ४१) यांच्या नाबाद ८७ धावांच्या भागीदारीने मुंबईच्या गोलंदाजांना आणखी यश मिळून दिलेले नाही. मुंबईला यंदाच्या रणजी हंगामात पहिल्या दोन लढतींमधून एकाच गुणावर समाधान मानावे लागले आहे.
महाराष्ट्र २१० धावांत गारद
पुणे : महाराष्ट्राला ‘ग्रुप बी’मध्ये पंजाबने पहिल्या डावात २१० धावांत गुंडाळले. राहुल त्रिपाठीच्या ५६ धावा महाराष्ट्राच्या डावात सर्वाधिक ठरल्या. सिद्धार्थ कौलच्या तीन विकेटसह कर्णधार व ऑफस्पिनर हरभजन सिंगने दोन विकेट घेतल्या. त्याबदल्यात पंजाबने १ बाद २६ धावा केल्या आहेत.
विदर्भच्या लढतीत ४७ षटकांचाच खेळ
रोहतक : हरयाणा आणि विदर्भ यांच्यातील ‘ग्रुप बी’च्या लढतीत पहिल्या दिवशी धुकं आणि पावसामुळे ४७ षटकांचाच खेळ झाला. त्यात विदर्भने पहिल्या दिवसअखेर ३ बाद १०१ धावा केल्या. भरवशाचा
कर्णधार एस. बद्रिनाथ अवघ्या २० धावा काढून तंबूत परला.
नमन ओझा अपयशी
चेन्नई : ऑस्ट्रेलिया दौ-याहून परतलेला मध्य प्रदेशचा कर्णधार नमन ओझा तामिळनाडूविरुद्धच्या लढतीत अवघ्या १३ धावा काढून बाद झाला. मात्र जलाज सक्सेनाने नाबाद शतक (खेळत आहे १२०) झळकवल्याने मध्य प्रदेशने ‘ग्रुप ए’च्या लढतीत दिवसअखेर ४ बाद २५० अशी मजल गाठली. नमन ओझाला ऑस्ट्रेलिया दौ-यात एका कसोटीसाठीच यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग ढोणीच्या जागी संघात निवडण्यात आले होते.
कर्नाटक ७ बाद २०७
नवी दिल्ली : पहिल्या दोन्ही लढती जिंकलेला गतविजेता कर्नाटकची ‘ग्रुप ए’च्या लढतीत रेल्वेने दिवसअखेर ७ बाद २०७ स्थिती केली आहे. मध्यमगती गोलंदाज कृष्णकांत उपाध्यायने रेल्वेकडून चार विकेट घेतल्या.