नवख्या क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या माजी विजेत्या मुंबईची गटवार साखळीतील कामगिरी संमिश्र राहिली. तरीही त्यांनी रणजी करंडकाच्या बाद फेरीत प्रवेश केला. केवळ दोन विजय मिळवलेल्या मुंबईला नशिबानेही साथ दिली, असेच म्हणावे लागेल.
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजले असतानाच भारतातील एक सवरेत्कृष्ट देशांतर्गत (डोमेस्टिक) क्रिकेट स्पर्धा असलेली रणजी करंडक स्पर्धाही महत्त्वपूर्ण टप्प्यावर (बाद फेरी) आली आहे. बाद फेरीला (नॉकआउट) सोमवारपासून (१६ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. गतविजेता कर्नाटकसह माजी विजेता मुंबई, तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, विदर्भ, आसाम आणि आंध्र प्रदेश आदी संघांनी बाद फेरी गाठली आहे. ‘अ’ गटात कर्नाटक आणि तामिळनाडूने थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. दोघांनी प्रत्येकी चार विजय मिळवलेत. त्यात कर्नाटक ‘अजिंक्य’ आहे. वीरेंदर सेहवाग आणि गौतम गंभीरसारखे ‘स्टार’ असणा-या दिल्लीने पाच विजय मिळवत ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवले. याच गटात महाराष्ट्र आणि विदर्भाची कामगिरीही चांगली झाली. ‘क’ गटातून आसाम आणि आंध्र प्रदेशने पहिले दोन क्रमांक पटकावत अंतिम आठ संघांतील प्रवेश निश्चित केला. या सात संघांपेक्षा मुंबईचा हेवा वाटतो. प्रमुख क्रिकेटपटूंची अनुपस्थिती, खेळले तरी त्यांच्या खराब फॉर्म, धक्कादायक सुरुवात तसेच नेतृत्व बदलांमुळे मुंबई संघ चर्चेत राहिला. मात्र मोक्याच्या क्षणी त्यांची कामगिरी उंचावली आणि मुंबईने बाद फेरी गाठली.
रणजी करंडकातील चुरस कमी झालेली नाही, हे यंदाच्या मोसमात दिसून आले. ‘अ’ गटात तिस-या स्थानासाठी मुंबईसह मध्यप्रदेश, बडोदा आणि रेल्वे अशा चार संघांत स्पर्धा होती. सातव्या फेरीनंतर १८ गुणांसह बडोदा तिस-या स्थानी होता. चौथ्या क्रमांकावरील मुंबईच्या खात्यात १७ गुण होते. पाचव्या क्रमांकावरील रेल्वेलाही (१६ गुण) उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी होती. आठव्या आणि शेवटच्या गटवार साखळीत मुंबईसमोर गतविजेता कर्नाटक होता. बडोद्यासमोर तामिळनाडूचे तसेच रेल्वेसमोर उत्तर प्रदेशचे आव्हान होते. बडोदा आणि रेल्वेच्या निकालावर मुंबईचे भवितव्य अवलंबून होते. तामिळनाडूने पहिल्या डावात बडोद्यावर आघाडी घेतल्याने मुंबईच्या जीवात जीव आला. मात्र दुसरीकडे रेल्वेने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. फलंदाजी बहरल्याने मुंबईला पहिल्या डावात ४३६ धावांची मजल मारता आली. तामिळनाडूविरुद्ध बडोदा सावरलाच नाही. डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंगच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईने कर्नाटकला ४१५ धावांत रोखताना पहिल्या डावात आघाडी घेतली. मात्र रेल्वेने निर्णायक विजय मिळवल्यास मोठी अडचण होती. त्यामुळे मुंबईलाही बलाढय़ कर्नाटकवर मात करणे, क्रमप्राप्त होते. परंतु, मुंबईचे नशीब जोरावर होते. रेल्वेचा दुसरा डाव १८९ धावांत कोसळला आणि उत्तर प्रदेश जिंकला. पहिल्या डावातील आघाडी मुंबईला तारून नेणारी ठरली.
मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर त्यांना ‘क’ गटातून आलेल्या जम्मू आणि काश्मीरविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. रेल्वेविरुद्ध पहिल्या डावातील आघाडी मिळाली. तिस-या लढतीत उत्तर प्रदेशविरुद्ध मुंबईला सूर गवसला. त्यानंतरचा विजय हा मुंबईला सातव्या फेरीत बडोद्याविरुद्ध मिळवता आला. दोन पराभव आणि चार लढती अनिर्णित राहिल्याने मुंबईला दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. मुंबईला अनुभवी क्रिकेटपटूंची उणीव भासली. वासिम जाफर हा दुखापतीमुळे केवळ दोनच सामने खेळू शकला. त्यातही चार डावांत त्याला केवळ २२ धावा करता आल्या. आणखी एक अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायर पाच सामने खेळला तरी आठ डावांत एका अर्धशतकासह त्याला १६८ धावा जमवता आल्या. राष्ट्रीय संघात निवड झाल्याने मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीला ऑस्ट्रेलियाला जावे लागले. खालावलेल्या मुंबईला नेतृत्व बदलाचाही सामना करावा लागला. वासिम जाफर आणि अभिषेक नायर या ‘सिनियर्स’नी कर्णधारपद भूषवण्यास नकार दिल्याने सुरुवातीला सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर यष्टिरक्षक आदित्य तारेकडे नेतृत्वाची धुरा आली. असे अनेक अडथळे पार करत मुंबईने बाद फेरी गाठताना अर्धी लढाई जिंकली.
मुंबईच्या बाद फेरीपर्यंतच्या प्रवासात श्रेयस अय्यर (८ सामन्यांत ६४९ धावा), सूर्यकुमार यादव (८ सामन्यांत ६०१ धावा), सिद्धेश लाड (५ सामन्यांत ४२७ धावा), आदित्य तारेची (८ सामन्यांत ४२२ धावा) दमदार फलंदाजी तसेच मध्यमगती, अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि फिरकीपटू हरमीत सिंगची अचूक गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरली. श्रेयस आणि सूर्यकुमारने प्रत्येकी दोन शतके ठोकताना सातत्य राखले. सिद्धेश आणि निखिलने कर्नाटकविरुद्ध शतके झळकावतानाच पाचव्या विकेटसाठी १९० धावांची बहुमूल्य भागीदारी रचली. कर्णधार तारेनेही एक शतक मारताना फलंदाजीत अधिकाधिक योगदान देण्याचा प्रयत्न केला. फलंदाजी ब-यापैकी झाली तरी गोलंदाजी तितकी बहरली नाही. केवळ मध्यमगती शार्दुलला सातत्य राखता आले. त्याने फलंदाजीतही चांगले योगदान दिले. बाद फेरी गाठल्याने मुंबईने सुटकेचा नि:श्वास टाकला तरी माजी विजेत्यांकडून खूप अपेक्षा वाढल्यात.
कमकुवत जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईवर टीकेची झोड उठली. यातून प्रशिक्षक प्रवीण अमरेही सुटले नाहीत. मात्र अननुभवी क्रिकेटपटू असल्याने कामगिरी उंचावेल, असा विश्वास त्यांना व्यक्त केला. उपांत्यपूर्व फेरी गाठल्याने अमरे यांनाही हायसे वाटले असेल. कारण गटवार साखळीत बाहेर पडणे, मुंबईला शोभेसे ठरले नसते. प्रशिक्षक अमरे यांच्यासह निवडसमिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी युवा क्रिकेटपटूंना अधिक संधी देण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या या निर्णयांवर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र युवा क्रिकेटपटूंनी चुकांमधून बोध घेत कामगिरी उंचावली. त्याचे फलित सर्वासमोर आहे. उपांत्यपूर्व फेरीत आठपैकी तीन संघ महाराष्ट्राचे आहेत. मुंबईप्रमाणेच महाराष्ट्र आणि विदर्भाचे कौतुक करायला हवे. मुंबई आणि विदर्भाला अव्वल संघांशी भिडावे लागणार असले तरी महाराष्ट्राला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. घोडामैदान फार दूर नाही. मात्र तिन्ही संघ उपांत्य फेरी गाठून आपली गुणवत्ता सिद्ध करतील, अशी आशा बाळगूया.