मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून, शनिवारी दिवसभर संततधार पावसाने राज्याला झोडपून काढले.
मुंबई- मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून, शनिवारी दिवसभर संततधार पावसाने राज्याला झोडपून काढले. या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून जनजीवनावरही मोठा परिणाम झाला. रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली तर त्यापाठोपाठ खेडमध्ये जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. ठिकठिकाणी खड्डय़ांमुळे साचलेल्या पाण्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात शुक्रवारपासून दमदार पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण उडवली. गुरुवारपासून सुरू झालेल्या माऊलींच्या पालखी आणि वारीवरही पावसाने अभिषेक केला.
कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी रात्रीपासून कोसळणा-या पावसाने फज्जा उडविला आहे. शनिवारी सकाळी तर कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणच्या स्टेशन परिसरात नद्या वाहू लागल्या आणि रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली. परिणामी सकाळी कामावर जाणा-या चाकरमान्यांचे हाल झाले आहे. ठाणे, पालघर, पुणे, रायगडसह कोकण किनारपट्टीमधे मुसळधार पाऊस पडला. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक कोलमडली असून लोकल कल्याण, कर्जत, कसारा मार्गावर ठप्प झाल्या होत्या.
सतत दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने तसेच धोक्याची पातळी ओलांडल्याने पनवेल रेल्वे स्थानक तसेच मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत रेल्वे स्थानक, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी या स्थानकदरम्यान रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकल कल्याणपर्यंतच अप डाऊन मार्गावर सुरू होत्या. यामुळे लांबपल्ल्याच्या गाडय़ा देखील खोळंबल्या असून यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले. त्यांना पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने घरी परतावे लागले. त्यामुळे रेल्वे स्थानक दरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तर काही लोकल रुळावरच खोळंबल्या असल्याने मध्य रेल्वे मार्ग विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी ट्रान्सहार्बर मार्गावर दहा मिनिटे लोकल उशिरा धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांना पुढील प्रवास करताना प्रचंड गर्दीचा सामना करत खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. ठाणे, वसई-विरार आणि रायगड या भागांत मुसळधार पाऊस झाला.
कल्याण-डोंबिवली जलमय
शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपापर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीचा परिसर जलमय झाला आहे. तसेच पावसाच्या पाण्याने गटारे तुंबली असून पाणी रस्त्यावर आले होते. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नाले व गटारे सफाई कामांची पोलखोल झाली.
मुंबईसह कोकणात संततधार
कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत लहान-मोठे रस्ते, कल्याण-शीळ मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांची अडचण झाली. कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण व शहर भागात सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक रस्ते, चौक पाण्याखाली गेले आहेत. कल्याणहून नगरकडे जाणा-या रस्त्यावर बिर्ला गेट ते वरप गाव परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला असून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. तसेच दुर्गाडी पुलावरही सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
अशीच परिस्थिती कल्याण-शिळ मार्गावर दिसून आली. परिणामी वाहनचालक, तसेच सर्वसामान्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. त्यातच मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या अनियमित वेळेत धावत होत्या.
मुंबईत विजांचा कडकडाट
मुंबईत पश्चिम उपनगरांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शनिवारी पावसाला पुन्हा सुरुवात झाली. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ११ वाजेनंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. सतत दोन तास मुसळधार पाऊस होऊन अनेकठिकाणी पाणी साचले. त्यानंतर दिवसभर रिपरिप सुरु होतीच. बुधवारनंतर पावसाने शहरात थोडी विश्रांती घेतली होती. तीन दिवस थोडा फार पाऊस पडत होता. पण त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या कामावर काही फरक पडला नव्हता. मात्र शनिवारी पाऊस जोरदार बरसायला सुरुवात झाली आणि अध्र्या तासात सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली.
पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, असल्फा परिसरात सखल भागात पाणी भरले यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. शाळेची वेळ असल्याने विद्यार्थी पाण्यात भिजले. तर काहींनी पावसाच्या पाण्यात भिजून आनंद घेतला. हवामान खात्यानेसुद्धा शनिवारी मुंबईत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. संततधार सुरू राहिल्याने त्याचा परिणाम रस्ता वाहतुकीवर व रेल्वे सेवेवर झाला आहे.
महाडमध्ये सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी
दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सध्या मोसमी पावसाने जोर धरला असून महाडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गांधारी पूल पाण्याखाली गेला असून शहराकडे येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोकणात मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे महाड शहराकडे येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बळीराजा सुखावला
महाराष्ट्राच्या कानाकोपर-यात आणि ग्रामीण भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मागच्या पंधरवडय़ात थोडी ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट बळीराजापुढे ओढवले होते. मात्र यातून पावसाने साथ दिल्याने शेतकरी सुखावला आहे. अनेकठिकाणी शेततळी, तलाव, धरणे भरली असून पाण्याची चिंता मिटल्याचा आनंद शेतक-यांच्या चेह-यावर दिसत होता.
विद्युत खांब कोसळल्याने पनवेल, कल्याणचा वीजपुरवठा खंडित
पावसाचा परिणाम वीज पुरवठय़ावरही झाला आहे. विद्युत खांब कोसळल्यामुळे पनवेल, कल्याण पूर्व आणि पेणमधील काही गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत खांब उभा करणे शक्य नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
वीजेच्या झटक्यात महिलेचा मृत्यू
घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड येथील पीएमजीएम कॉलनी येथे रस्त्यावरून आई व मुलगी जात असताना वीजेचा झटका बसला. दोघांनाही जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, उषा सावंत (४०), यांचा मृत्यू झाला असून समिधा सावंत (५) ही जखमी झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले.
जमीन खचली
वसंत पार्क श्री गणेश गुह निर्माण संस्थेच्या विरुद्ध दिशेला, आर. सी. मार्ग चेंबूर पश्चिम येथे एसआरए अंतर्गत इमारतींचा पाया टाकण्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी येथील जमीन खचली आणि शेजारील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई अग्निशमन दल, पालिका विभागीय अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केल्याचे पालिकेच्या अधिका-याने सांगितले.
१० जुलैपर्यंत अतिवृष्टी
कोकणात १० जुलैपर्यंत आणि विदर्भात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या कोकण, घाटमाथा आणि विदर्भात दमदार पाऊस पडत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांना फटका
लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाडय़ांनाही पावसाचा फटका बसला. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरून तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गावरून वळवण्यात आली. शनिवारी दुपारी १२ नंतर तर कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विठ्ठलवाडीजवळ रुळावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर लोकांची मोठी गर्दी झाली. बदलापूरमध्येदेखील रुळावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. शनिवारी सकाळपासूनच येथे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे याचा फटका रेल्वेला बसला आहे.
मराठवाडा कोरडाच
संपूर्ण महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडला असला तरी मराठवाडय़ात मात्र पावसाने ओढच दिलेली आहे. मराठवाडा अद्याप कोरडाच असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.