वैदिक काळापासून आजपर्यंत ज्या काही प्रथा आपण टिकवून ठेवल्या आहेत, त्यात विडा, सुपारी, बडीशेप, धणाडाळ, वेलची, कलिंगड, भोपळय़ाच्या बिया अशा अनेक वस्तू आपण मुखशुद्धी म्हणून घेत असतो. या प्रकारास आपल्याकडे अन्नपचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. मुखशुद्धीचे पदार्थ म्हणजे उदा. मसाला सुपारी हे अत्यंत चविष्ट असून ते खाताना तोंडात भरपूर लाळ निर्माण होते. अन्नपचनाच्या दृष्टीने उपयुक्त असते. बडीशेप, मसाला सुपारी, विडे यांसारखे पदार्थ मुखशुद्धी म्हणून वापरले जातात. जेवणाच्या तयारीबरोबरच जेवणानंतर द्यावयाचे विडे तयार करून ठेवले जातात किंवा विडय़ांच्या सर्व साहित्याची तयारी एकाच तबकात करून ठेवली जाते.
भोजनानंतर प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार विडा तयार करून घेतो. विडय़ासाठी थोडी जुनी व पिवळट पाने वापरावीत. ती अधिक रुचकर लागतात. विडय़ाच्या पानात चुना, कात, सुपारी, वेलची, लवंग, बदाम, खोबरे, जायफळ, जायपत्री, केशर, कंकोळ, कस्तुरी आणि कापूर असे १३ पदार्थ घातले जात असल्याने याला त्रयोदशीगुणी विडा म्हणतात. गोविंद विडा, पुडीचा विडा, मद्रासी विडा, खणाची पट्टी असे अनेक प्रकारचे विडे प्रसिद्ध आहेत. खास विडा करताना त्यात थोडी गुंजाची पाने घालतात. थोडा गुलकंद घालून श्रीमंती थाटाचा विडा केला जातो. आयुर्वेदामध्ये सुपारी, जायफळ, कापूर, लवंग, कस्तूरी इ. मुखाला स्वच्छ ठेवणा-या तिखट व तुरट रसात्मक पदार्थासह तांबूल सेवन (पान सेवन) करावे असे म्हटले आहे. आपण फक्त जेवणानंतरच विडा घेतो; परंतु झोपून उठल्यावर, आंघोळीनंतर, उलटी झाल्यास त्यानंतरही तांबूलसेवन करण्यास सांगितले आहे.
विडा हा तिखट, कडू, गोड, तुरट, क्षार अशा रसांनी युक्त, उष्ण गुणाचा, वात, कफ, कृमी, मुखदरुगधी यांचा नाश करणारा, मुख स्वच्छ करून त्यास कांती देणारा, मुखातून होणारा अतिरिक्त कफाचा स्त्राव व गलरोग दूर करणारा असा १३ गुणांनी युक्त आहे. सुपारी ही पचायला जड, थंड, रुक्ष, तुरट रसाची, कफ पित्ताचा नाश करणारी, रुचिकार, भूक वाढवणारी असते. खैराचा कात हा कफ व पित्त यांचा नाश करतो. चुना हा वातकफपित्तनाशक आहे.
विडा चावून झाल्यावर पहिली पिंक थुंकून टाकावी, कारण ती विषासारखी मारक असते. दुसरी पिंक रेचक व पचायला कठीण असल्याने तीही थुंकून टाकावी. तिसरीपासून पुढील कोणतीही पिंक न थुंकता गिळावी कारण, ती अमृततुल्य तसेच आरोग्याला हितकारक आहे. विडा खाल्यामुळे पचनास मदत होते, म्हणून मेजवानीनंतर विडा खाण्याची प्रथा आहे. काही ना काही निमित्ताने रोज गोडधोड खाल्ले जातेय. मग ते पचायला सुगंधी चविष्ट पान वा सुपारी हवीच की! सुरेख पदार्थानी भरलेले ताट त्याचा आस्वाद घेत-घेत केलेले तुडुंब जेवण त्यावर तोंडात टाकायला तांबूल किंवा छानशी सुपारी, सुखच! असे कितीही छान जेवणानंतर पोट भरले तरी आठवण येते ती मुखवासाची. मुखवास म्हणजे जेवणानंतर पचनासाठी खाल्ली जाणारी सुपारी, तांबूल. आपल्याकडे अनेकविध प्रकारचे तांबूल, सुपा-या, सुकामेवा खायची परंपरा फार जुनी. अगदी ऐतिहासिक, पौराणिक काळात याचे उल्लेख आढळतात. राजे, महाराजे, सरदार लोकांकडे पान-सुपारीचा सुरेख सरंजाम असायचाच. सुंदर नक्षीदार पानाचे डबे, चुन्याच्या डब्या, अडकित्ते सोन्या-चांदीचे नाजूक वेलबुट्टी असलेले. सहज म्हणून तोंडात टाकले जाणारे वेलदोडा, केशर. आव्हानाचे विडे, निरोपाचे विडे एक-एक वर्णन एकूणच थाटमाट! आता गेला तो काळ, पण आवड तर आहेच.
आपल्यालाच काय देवालाही नैवेद्याच्या ताटाबरोबर तांबूल लागतो. छान भात, भाज्या, पोळी, गोडधोड असलेल्या ताटाबरोबर सुबक हिरवागार गोविंद विडा ठेवला की, कसे परिपूर्ण वाटते ताट. माहुरच्या देवीला तर तांबुलाचा नैवेद्य नित्याचाच. रोज अगदी विडा नाहीतरी सुपारी, बडीशेप, लवंग, वेलदोडा काहीतरी तोंडात टाकायची सवय असतेच. सुपारी वा तांबूल खरा खायचा तो पाचक म्हणून. छान चावून, चघळून खाल्लेला मुखवास मुखात लाळ सुटून पचनाला मदत करतो शिवाय तोंडाला सुगंध येतो तो वेगळाच. त्यात वापरलेल्या पदार्थातील औषधी गुणामुळे पचनाला मदत होते.
१. विडा
साहित्य – नागवेलीची पाने (त्यालाच विडय़ाची पाने म्हणतात) काताच्या गोळय़ा, चुना, बडीशेप, बारीक किसलेले कोरडे खोबरे किंवा खवलेले ओले खोबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी अथवा कातरलेली सुपारी.
कृती – प्रथम ओलसर कपडय़ावर विडय़ाची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात. साधारणत: एक विडा दोन पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत, त्याच्या दुप्पट पाने जोडीने मांडावीत, नंतर पानाला थोडा थोडा चुना लावावा. प्रत्येक पानावर २/३ कात गोळय़ा, लहान चमचाभर सुपारी, वेलदोडय़ाचे ६-८ दाणे, लहान चमचाभर बडीशेप व १ चमचाभर ओले खोबरे किंवा कोरडय़ा खोब-याचा कीस घालावा. नंतर पानाची पुडी करून त्याला लवंग टोचावी.
२. बडीशेप
साहित्य – बडीशेप ३ वाटय़ा, ओवा ३/४ वाटी, लवंग-अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्त, सुके खोबरे किसलेले, १ वाटी तीळ – १ वाटी, ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी, मीठ आणि साखर- चवीपुरते.
कृती – शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्त्वाचे आहे. बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालतं.
३. गोविंद विडा
साहित्य – नागवेलीची पाने, (त्यालाच विडय़ाची पाने म्हणतात.) काताच्या गोळय़ा, चुना, बडीशेप, बारीक किसलेले खोबरे किंवा खवलेले ओले खोबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी, अथवा कातरलेली सुपारी.
कृती – प्रथम ओलसर कपडय़ावर विडय़ाची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात, साधारणत: एक विडा पाच पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत, त्याच्या पाचपट पाने घ्यावीत. एका विडय़ाची पाने घेऊन त्यांना प्रथम चुना लावावा. एका पानाचा द्रोणासारखा आकार करून त्यात २/३ कात गोळय़ा, लहान चमचाभर सुपारी, वेलदोडय़ाचे ६-८ दाणे, लहान चमचाभर बडीशेप व १ चमचाभर ओले खोबरे किंवा कोरडय़ा खोब-याचा किस घालावा. नंतर हे पान चारीबाजूंनी दुमडून त्रिकोणी आकार द्यावा. नंतर हा त्रिकोण वर येईल अशा तऱ्हेने हे दुमडलेले पान दुस-या पालथ्या पानावर ठेवावे व प्रथम लांबीच्या बाजूने पाने दुमडून घ्यावीत, नंतर रुंदीच्या बाजूने दुमडावीत. याचप्रकारे पाच पाने एकावर एक ठेवून मोठा त्रिकोण तयार होतो, या दुमडी निघू नयेत म्हणून सपाट बाजूने लवंग टोचावी.
४. आवळा सुपारी
साहित्य – २५० ग्रॅम डोंगरी आवळे, अर्धा चमचा काळय़ा मि-यांची पूड, अर्धा चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, २ लिंबाचा रस.
कृती – मोठे डोंगरी आवळे धुऊन, पुसून स्टीनलेस रुटीलच्या किसणीवर किसून घ्यावेत. (साध्या किसणीवर किसल्यास आवळे काळे पडतात.) नंतर त्यात मीठ, मिरेपूड, जिरेपूड घालून कालवावे. नंतर त्यावर २ लिंबाचा रस घालावा आणि हा कीस उन्हात वाळत घालावा. ही सुपारी पाचक असून उपवासाला चालते आणि मुलांनादेखील फार आवडते.
५. मसाला सुपारी
साहित्य – पाव किलो भरडी सुपारी, १२५ ग्रॅम चिकणी सुपारी, ८ ते १० लवंगा, ८ ते १० वेलदोडे, ४ चमचा खसखस, पाव जायफळ, १ वाटी खोबरे कीस, १ चमचा ज्येष्ठ मध पूड, २ चहाचे चमचे साजूक तूप.
कृती – खोबरे किसून भाजून घ्यावे व चुरावे, बडीशेप खसखस भाजून घ्यावी. सुपारी कुटून घ्यावी. लंवग, वेलदोडय़ाची पूड करून घ्यावी. तुपावर काढलेली सुपारी गरम करून जरा परतून घ्यावी. लालसर झाली की, उतरवावी. नंतर बाकीचे सर्व पदार्थ घालून चांगली कालवावी. नंतर गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरावी. मसाला सुपारी बरेच दिवस टिकते.
६. जिरागोळी
साहित्य – २० ते २५ आमसुले, अर्धा चमचा मीठ, १ चमचा जिरे, १ चमचा साखर, २ चमचे पिठी साखर.
कृती – पिठी साखर सोडून इतर सर्व जिन्नस एकत्र करून चिकट होईपर्यंत वाटावेत. नंतर या वाटलेल्या मिश्रणाच्या हाताने छोटय़ा-छोटय़ा गोळय़ा कराव्यात. या गोळय़ा एक दिवस उन्हात वाळवाव्यात. नंतर त्या गोळय़ा पिठीसाखरेत घोळवून बाटलीत भरून ठेवाव्यात.