सध्या दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून मीरा रोडमध्ये आठवडय़ातून ३ दिवस पाणी येत आहे.
भाईंदर – सध्या दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून मीरा रोडमध्ये आठवडय़ातून ३ दिवस पाणी येत आहे. याविरोधात एकीकडे महापालिकेवर दररोज मोर्चे निघत असताना मीरा रोडच्या हाटकेश भागात मात्र होळी आणि रंगपंचमीनिमित्त ‘रेन डान्स’ करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पाणी बचतीच्या आवाहनाला त्यांच्याच पक्षाच्या महापौर असलेल्या मीरा-भाईंदर भागातूनच आव्हान दिले जात असल्याचे समोर आले आहे.
हाटकेश भागात असलेल्या रितू पॅराडाईज संकुलात रंगपंचमीनिमित्त रंग आणि पाणी यांची उधळण करण्याच्या कार्यक्रमाचे पत्रक लावण्यात आले आहे.
रितू पॅरेडाईज रेसिडेंट फेडरेशन आणि बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी लीना पंकज पाठक यांनी यात ‘रेन डान्स’चे आयोजन केले असून पाणी, रंग आणि नृत्याने होळी साजरी केली जाणार असल्याचे लिहिले आहे.
तसेच पाणी, रंग, अल्पोपहार, थंड पेयाची व्यवस्था असल्याचे सांगितले आहे. याबाबत आयोजक आणि बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी लीना पाठक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रेन डान्स धुमधडाक्यात होणार असल्याचे सांगितले, पाणी कपात आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाबाबत त्यांना सांगितले असता त्यांनी आपल्याकडे २४ तास पाणी असते आणि मुख्यमंत्र्यांनी हॉटेल आणि रिसॉर्टवर बंदी घातली असल्याचे सांगितले.
यानंतर बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र सर्व नागरिकांनी नतिक जबाबदारीचे भान ठेवून पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, असे मत व्यक्त करत नागरिकांनी फक्त गुलालाचा टिळा लावून यावर्षी होळी साजरी करावी, असे आवाहन केले. त्यामुळे आता या ‘रेन डान्स’वर पक्षीय किंवा प्रशासकीय कारवाई होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.