कमल यांचे आरोप निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आयसीसीने लगेचच स्पष्ट केले. या आरोप प्रत्यारोपामुळे यंदाच्या विश्वचषकाला विनाकारण ‘फिक्सिंग’च्या आरोपाचे गालबोट लागले.
मेलबर्न/ढाका- यंदाचा विश्वचषक सुरळीतपणे आणि कोणत्याही वादविवादाशिवाय सुरू असताना अचानक निमित्त झाले ते भारत वि. बांगलादेश लढतीतील पंचांच्या निर्णयांचे. पाकिस्तानचे पंच अलीम दार आणि इंग्लंडचे पंच इयान गॉल्ड या मैदानातील पंचांचे निर्णय बरेचसे भारताच्या बाजूने होते त्यामुळे पंचांनाच ‘फिक्स’ केले होते की काय, असा थेट आरोप अन्य कोणीही नाही तर आयसीसीचे बांगलादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी केला आहे. दरम्यान, कमल यांचे आरोप निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आयसीसीने लगेचच स्पष्ट केले. या आरोप प्रत्यारोपामुळे यंदाच्या विश्वचषकाला विनाकारण ‘फिक्सिंग’च्या आरोपाचे गालबोट लागले.
बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा ९० धावांवर असताना झेलचीत झाल्यावर तो चेंडू नाबाद ठरवण्यावरुन प्रकरण वाढले. लढत संपल्यावर पत्रकार परिषदेतच बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्ताझाने जाहीरपणे पंचांच्या निर्णयावर टीका केली. इतकेच नाही बांगलादेशमध्येही पंचांच्या निर्णयावरुन सामन्यानंतर संतापाचा उद्रेक झाला होता. बांगलादेशमध्ये शहरात काही ठिकाणी रस्त्यावर उतरून लोकांनी पंचांच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला. इतकेच नाही फेसबुकसारख्या सोशल मिडियावरुनही बांगलादेश क्रिकेटप्रेमींनी पंचांच्या निर्णयावर जाहीर टीका करणारी मते व्यक्त केली. एकंदरीत हे प्रकरण चांगलेच रंगले. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही (बीसीबी) घडल्याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पंचांच्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी आयसीसीकडे बीसीबी रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे बीसीबीचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी सांगितले. बांगलादेशच्या वृत्तपत्रांनीही शुक्रवारी ‘‘टायगर (बांगलादेश संघाला म्हणतात) वादग्रस्त निर्णयांवर बाद झाले,’’ असे मथळे दिले.
नेमके काय म्हणाले मुस्तफा कमाल
‘‘भारताविरुद्धच्या लढतीत मी जे काही बघितले त्यावरुन एकच म्हणेन पंचगिरी अतिशय हलक्या दर्जाची होती. पंच सामन्यात काहीतरी उद्देश ठेवून (भारताला जिंकून द्यायच्या) पंचगिरी करायला उभे होते असे वाटते. मी एक क्रिकेटप्रेमी म्हणून बोलत आहे आयसीसीचा अध्यक्ष म्हणून नाही. पंच चुका करू शकतात. मात्र त्या जाणुनबुजून त्यांनी केल्यात का हे आयसीसीने तपासले पाहिजे. कारण सामन्यातील प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केलेली असते. पंचांनी (भारताच्याबाजूने निर्णय देण्याचे) हे कृत्य जाणुनबुजून केले आहे का, हे आयसीसीने तपासायलाच हवे. मी इंडियन क्रिकेट काउन्सिलचा प्रतिनिधी नाही. कुणीतरी जाणुनबुजून आमच्यावर निकाल लादत असेल तर तो कुणीच स्वीकारणार नाही. आयसीसीचा अध्यक्ष म्हणून आयसीसीच्या पुढील बैठकीत मी हा मुद्दा उचलून धरणार आहे. गरज पडली तर मी राजीनामाही देईन.’’
आयसीसीकडून खंडन
दरम्यान, मुस्तफा कमाल यांनी हे आरोप केल्यावर आयसीसीने लगेचच त्याचे खंडन केले. ‘‘मुस्तफा कमाल यांनी दिलेली प्रतिक्रिया दुर्दैवी आहे. पण अर्थात त्यांचे ते वैयक्तिक मत आहे. ते आयसीसीचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी आयसीसीमधील व्यक्तींबद्दल अशाप्रकारे जाहीर भाष्य करणे योग्य नाही. रोहित शर्माच्याबाबतीत दिलेला नोबॉलचा निर्णय हा ५०-५० मते मिळतील असा होता. मात्र नोबॉलच्याबाबतीत मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम मानण्यात येतो. त्याचवेळी पंचांचा निर्णयाचा आदरही करायला हवा. त्यास्थितीत पंचांवर आरोप करण्यात तथ्य नाही,’’ असे आयसीसीचे मुख्य अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनीही मुस्तफा कमाल यांच्यावर टीका केली. ‘‘आयसीसीच्या बैठकीत मुस्तफा कमाल यांना हा विषय उचलून धरता आला असता. बांगलादेशविरुद्ध भारत जिंकला आहे ही वस्तुस्थिती आहे. इतकेत नाही तर भारताने याआधी गटवार साखळीतही सर्व सामने जिंकले होते. ते पाहता आता पुढे पाहण्याची गरज आहे. हे वादग्रस्त मुद्दे आयसीसीच्या बैठकीत चर्चिले जाऊ शकतात,’’ असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले.
मश्रफेही नाराज
दरम्यान, भारताविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्ताझानेही नाराजी व्यक्त केली. ‘‘पंचांच्या निर्णयावर मला फार काही बोलायचे नाही. प्रत्येकाने पाहिले आहे जे काही घडले ते. त्यामुळे मी आणखीन काही बोलणे योग्य ठरणार नाही,’’ असे मोर्ताझाने म्हटले. दरम्यान, या लढतीत मोर्ताझाच्याबाजूने काहीच नव्हते. कारण संथ गतीने षटके (स्लो ओव्हर रेट) टाकल्याबद्दल त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. अर्थात विश्वचषकात बांगलादेशचे आव्हान संपल्याने पुढील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय लढतीसाठी त्याच्यावर ते निलंबन असेल.
शेन वॉर्नच्या प्रतिक्रियेला उचलून घेतले
रोहित शर्माला नोबॉलवर नाबाद ठरवल्यावर समालोचक शेन वॉर्नने दिलेली प्रतिक्रिया बांगलादेशच्या क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावरुन जास्त उचलून धरलेली दिसली. वेगवान गोलंदाज रुबेल होसेनने टाकलेला डावातील ४०व्या षटकातील चेंडूंवर रोहितने मारलेला फटका इम्रुल कायेसकडे झेल देऊन गेला. मात्र तो ‘फुलटॉस’ चेंडू कंबरेच्यावर असल्याचे पंचांचे मत पडले आणि मैदानातील पंच गॉल्ड यांनी लागलीच नोबॉल जाहीर केला. मात्र त्यावेळी समालोचन करणा-या शेन वॉर्नने लगेचच दिलेली प्रतिक्रिया बांगलादेशने उचलून धरली. ‘‘ही विकेट आहे (बाद दिला पाहिजे). कारण चेंडू कमरेच्या खाली होता,’’ असे वॉर्नने म्हटले.