साधू, हा जर खरा प्रबुद्ध गुरू असेल तर तो भाविकांच्या मनातील भाव तोलून पाहतो. त्याला भक्ताच्या मनातील भावाची भूक असते. तो कधीही पैशांचा भुकेला नसतो. आणि ‘जर तो पैशामागे धावत असेल तर तो साधूच नाही!’ असा स्पष्ट निर्वाळा कबीरदासजी देऊन टाकतात.
संत कबीरदासजींनी अगदी नेमक्या शब्दात मानवी मनाचे जे चित्रण केले आहे ते केवळ अद्वितीय आहे. त्यासाठी त्यांच्याकडे अतिशय सूक्ष्म निरीक्षणशक्ती होती. कारण जेव्हा ते मनाच्या व्यापाराविषयी एखादे विधान करतात तेव्हा ते आपल्याला आपल्याच बाबतीत केले आहे की काय असे वाटू लागते.
रोजच्या जीवनाच्या धकाधकीत तातडीने करावयाच्या गोष्टींची आपली यादी रोज बदलत राहते. कारण त्या दिवसाची स्वत:ची अशी काही वेगळीच एक दिनदर्शिका उलगडते आणि आपल्याला चटकन निर्णय घ्यावे लागतात. जे जे अंगावर येऊन पडले आहे ते कर्तव्य पार पडताना अनेकदा जे करायची मनापासून इच्छा होती ते अनेकदा राहूनच जाते. शिवाय ख-या महत्त्वाच्या गोष्टींकडे जेवढे लक्ष द्यायला हवे तेवढे दिले जात नाही. काही लोक मात्र जगण्याचा प्राधान्यक्रम नीट ठरवून जगण्याचे नियोजन करतात. त्यांना जीवनाच्या शेवटी एक सार्थ आयुष्य घालविल्याचे समाधान मिळते. यासाठी कबीरदास आपल्याला सांगतात – जे काही मनात इच्छित असेल ते प्राप्त करण्यासाठी निर्धास्त मनाने स्वत:ला त्यात झोकून द्या. जे मिळवायचे आहे ते लगेच आणि सहजच मिळेल असे नाही तर शोधावे लागेल आणि त्यासाठी खोल उडीच घ्यावी लागेल.
जुन्या काळी पाणबुडय़ा नव्हत्या, मात्र पाणबुडे होते. हे पाणबुडे लोक नदीत खोल डुबकी मारून त्यातून शंख-शिंपले, मौल्यवान वस्तू वर काढीत असत. ज्यांना पोहता येत नसे, ते जर नदीत बुडू लागले तर हे लोक त्यांनाही वर काढीत आणि त्यांचा जीव वाचवीत असत. त्यांचे उदाहरण देऊन कबीर आपल्याला जागे करतात. समोर जीवनाची नदी खळाळत वेगाने वाहते आहे. बुडण्याच्या भीतीने आपण जर किना-यावर बसून राहिलो तर उभे आयुष्य रितेच राहील. संपून जाईल आणि हाती काहीच न लागल्याचे दु:ख मनात ठेवूनच आपल्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागेल. ध्येय ऐहिक असो की पारमार्थिक असो, बुडी खोल घेतली तरच काही हाती लागेल. किना-यावर काहीही मिळणार नाही असा जीवनाभिमुख सल्ला कबीरजींनी दिला आहे. म्हणून त्यांच्या एका दोह्यात ते म्हणतात :-
जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ
मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ
ज्यांनी शोधले त्यांनाच सापडले. त्यासाठी त्यांना खोल पाण्यात म्हणजे त्या विषयाच्या खोलीतच उतरावे लागले. जर आपण बुडून जाऊ या भीतीने मी नदीच्या किना-यावर बसून राहिलो तर माझ्या हाती काहीच लागणार नाही. असेच माणूस अनेकदा ‘हे करू की ते करू?’ ‘हे योग्य की ते योग्य?’ अशा द्विधा मन:स्थितीत सापडत असतो. त्याच्यासमोरचे उद्दिष्ट ऐहिक असो की आध्यात्मिक असो, काय योग्य आणि काय अयोग्य या गोंधळातून त्याला मार्ग सापडत नाही. हाच अनुभव जवळजवळ प्रत्येकाला जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आलेला असतो. त्यावर गुरुदेव कबीरदासजी म्हणतात,
‘माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर,
कर का मनका डार दे, मन का मनका फेर।’
जशी जपाची माळ एकेक मणी सरकवून लोक कितीतरी वेळ फिरवीत राहतात. तरीही त्यांना सत्याचे दर्शन काही होत नाही, निर्णय काही घेता येत नाही. एकेक विचार आपण सतत बदलत राहतो, हा बाजूला सारून तो करून पाहतो, पुन्हा पहिल्या विचाराकडे येतो, पण मनाचे समाधान करणारा मार्ग सापडत नाही. कबीरदासजी अशांना सल्ला देतात. तो हातातील माळेचा मणी बाजूला ठेव. तुझ्या मार्गातील अडथळा बनलेल्या तुझ्याच मनाचा मणी हलव! विचारांची एक मर्यादा असते. त्या पलीकडे त्यांचा उपयोग होणार नसतो. शेवटी ध्येय साध्य होणार ते प्रत्यक्ष कृती केल्यानेच. त्यासाठी आधी मनाचा मणका हलव, तो पुढे सरकव. हातातील माळ फिरविणे थांबवून, मनातील चुकीच्या धारणांची, संशयाची, आत्मविश्वासाच्या अभावाचे मणी पुढे सरकवून चटकन काहीतरी निर्णय घेऊन टाक. कारण निर्णय हीच यशाची सुरुवात आहे.
आध्यात्मिक क्षेत्रात आज अचानक तेजी आली आहे. दिवसभर विविध धार्मिक वाहिन्यांवर आपल्याला घरबसल्या देशभरातील अनेक बाबांचे दर्शन होते. त्यांचे विचार ऐकायला मिळतात. त्यात भर म्हणून ज्यांना आपल्या धर्माचा प्रसार जगभर करावयाची महत्त्वाकांक्षा आहे अशा धार्मिक वाहिन्याही आपल्याला त्या-त्या धर्माचे शिक्षण दिवसभर देतच असतात. अशा कार्यक्रमांच्या शेवटी हमखास एक आवाहन असते. ‘आम्ही गोरगरिबांसाठी, अपंगांसाठी सेवेचे मोठे काम करीत आहोत. त्याला तुम्हीही आर्थिक मदत करा.’ असे आपल्याला सांगितले जाते. काही लोकांच्या केवळ प्रवचनाला जायचे पैसेही आधी त्यांच्या बँक खात्यात भरावे लागतात. ते खाते क्रमांक, ते लोक टीव्ही स्क्रीनवर झळकवतात. पैसे भरल्यावरच हे गुरुवार मग आपल्याकडून ‘काय आगळीक घडली आहे’ आणि ती कोणत्या मंदिरात जाऊन निस्तरली म्हणजे पुन्हा आपल्यावर ‘कृपेचा वर्षाव सुरू होईल’ ते सांगतात. अशा १०० पैकी ९० लोकांचे पितळ उघडे पाडताना कबीरदास म्हणतात –
साधू भूखा भाव का, धन का भूखा नाहिं
धन का भूखा जी फिरै, सो तो साधू नाहिं।
साधू, हा जर खरा प्रबुद्ध गुरू असेल तर तो भाविकांच्या मनातील भाव तोलून पाहतो. त्याला भक्ताच्या मनातील भावाची भूक असते. तो कधीही पैशांचा भुकेला नसतो आणि ‘जर तो पैशामागे धावत असेल तर तो साधूच नाही!’ असा स्पष्ट निर्वाळा कबीरदासजी देऊन टाकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा मनात किंतु निर्माण होईल, मग तो जगण्याच्या विषयातला असो की श्रद्धेच्या, भक्तीच्या विषयातला असो, कबीरदास हेच आपले उत्तम गुरू होऊ शकतात. कारण ते ‘एक घाव दोन तुकडे’ करून आपल्या मनाची द्विधा अवस्था संपवितात.
त्यांच्या एकंदर लिखाणात व्यवहारी शहाणपणही पुरेपूर भरले आहे. एका प्रसिद्ध दोह्यात तर कबीरजींनी मनाच्या शांतीसाठी आपल्याला छान उपाय सुचवलाय. आपल्यावर टीका करणा-याला त्यांनी विशेष मान द्यायला सांगितले आहे. ते म्हणतात, आपल्या घराच्या अगदी जवळच निंदकाला ठेवा. कारण तो जी सेवा आपल्याला देतो ती फार विशेष आहे. पाणी किंवा साबणही न लावता तो आपले मन स्वच्छ करून देतो.
निंदक नियरे राखिए, आंगन कुटी छवाय
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाये
अर्थात यासाठी मनाची ठेवणही कबीरदासजींसारखी निर्मल हवी. नाहीतर रोज भांडणे आणि मनस्ताप व्हायचा! जर आपल्यावर झालेली टीका आपण सकारात्मक पद्धतीने घेऊ तर आपल्याला फार लाभ होईल. निंदा करणा-याने दाखवून दिलेल्या चुका आपण सुधारत गेलो तर आपलीच प्रगती होईल. असा कबीरदासजींचा सल्ला आहे. हे व्यावहारिक शहाणपण शिकवीत असताना ते आपल्याला मात्र कुणाचीही निंदा न करण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात, ‘अगदी आपल्या पायाखाली येणा-या कुसळालाही शिव्याशाप देऊ नका.’ कारण त्याचेही उपद्रवमूल्य खूप मोठे आहे. जर उद्या तेच कुसळ वा-याने उडून आपल्या डोळय़ात गेले तर ते खूप वेदना देऊ शकते आणि डोळय़ातून पाणी काढल्याशिवाय राहात नाही.
तिनका कबहुँ ना निन्दिये, जो पाँवन तर होय
कबहुँ उडमी आँखिन पडमे, तो पीर घनेरी होय।
त्यामुळे कबीरदासजींचे ऐकून, चटकन निर्णय घेऊन, एखाद्या विषयात खोल डुबकी मारल्यावर हाती काहीतरी रत्ने नक्कीच लागणार. फक्त त्यासाठी आपण निवडलेला गुरू मात्र कबीरदासजींसारखा ‘पहुंचा हुवा’, म्हणजे पैलतीरावर आधीच पोहोचलेला हवा.