तरुण पिढी मोबाइल आणि टीव्हीकडे जास्त आकर्षित झालेली आहे. त्यावर येणा-या फसव्या जाहिरातींनी अच्छे दिन येणार नाहीत.
मुंबई – तरुण पिढी मोबाइल आणि टीव्हीकडे जास्त आकर्षित झालेली आहे. त्यावर येणा-या फसव्या जाहिरातींनी अच्छे दिन येणार नाहीत. अभिनव तंत्रज्ञान आणि प्रगत शैक्षणिक धोरणानेच प्रगती शक्य असते, असे प्रतिपादन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. शिक्षणाबरोबर भविष्यातील उत्पन्नाचे मार्ग दाखविण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या लाइफ सायन्स विभागाकडून सागरी विज्ञान विषयाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सिंधू स्वाध्याय संस्थे’चे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या कलिना संकुलात शुक्रवारी झाले. त्या वेळी ते पुढे म्हणाले, आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.
३० वयोगटांतील तरुणांची संख्या ही लोकसंख्येच्या ६३ टक्के आहे. या तरुणांना ज्ञानाच्या, संशोधनाच्या शाखांमध्ये सहभागी करून घेतले तर देशाच्या विकास प्रक्रियेत नक्कीच त्याचा प्रभाव जाणवेल. आपल्याकडील तरुण हे रोजगार, नोकरीसाठी सागरी क्षेत्राकडे वळत नाहीत.
मात्र या क्षेत्रात अनेक प्रकारचे रोजगार आणि ज्ञानाच्या संधी आहेत. यासाठी यांचे प्रबोधन करणे गरजेचे असून सागरी क्षेत्रात नोकरीच्या संधी, त्यांचे स्वरूप आदींची माहिती देण्याची गरजही राणे यांनी व्यक्त केली.
एकीकडे बेकारी वाढली आहे, असे म्हटले जाते. मात्र त्याच वेळी तंत्रज्ञ मिळत नाहीत. थोडेफार शिकायचे आणि सरकारी नोकरीत जायचे एवढेच आजच्या तरुणाचे ध्येय आहे.
सागरी संपत्तीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी कशा उपलब्ध होतील याचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले पाहिजे. महाराष्ट्राला जेवढा सागरी किनारा लाभलेला आहे. त्याच्यापेक्षा केरळची किनारपट्टी कमी आहे. मात्र मासे निर्यातीत ते आपल्यापेक्षा आघाडीवर आहेत. याचे कारण काय असेल तर त्याबाबतचे ज्ञान आपल्याकडे नाही. शोभेचे मासे ही वेगळी इंडस्ट्री आहे.
एक एक मासा सहा-सात लाखाला विकला जातो. आपण खाण्याचे मासे जेवढय़ा किमतीचे निर्यात करतो, त्याच्यापेक्षा सिंगापूर येथून येणा-या शोभेच्या माशांची किंमत जास्त आहे. ते तंत्रज्ञानही आपल्याला आता आत्मसात करावे लागेल. समुद्रातून उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजेत. तसे वातावरण निर्माण झाले पाहिजे. आपल्याकडे तसे वातावरण नाही.
आपली तरुण पिढी टीव्ही आणि मोबाइलकडे आकर्षित झालेली आहे. त्यावरील जाहिराती पाहून ती आपली मते मनवितात. केवळ टीव्हीवरील फसव्या जाहिराती पाहून अच्छे दिन येणार नाही. विचार केला पाहिजे. आपली अर्थव्यवस्था काय आहे. कुणीही पंतप्रधान आला म्हणून जादूची कांडी फिरवून अच्छे दिन आणू शकणार नाही. यावेळचे बजेट पहा.
संरक्षणखात्यामध्येही आपण ४९ टक्के एफडीआय आणला आहे. म्हणजे संरक्षणासाठी लागणारा पैसाही आपण कराच्या माध्यमातून जमवू शकत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव वाढताहेत, डॉलरचा भाव वाढतोय. पण विद्यार्थी डॉलर पाहात नाही. केवळ जाहिरातीवर आपले मत ठरवतो. म्हणून युवा वर्गाचे लक्ष कुठे केंद्रित करावे, हेही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. शिक्षणाबरोबर भविष्यातील मार्ग काय असतील हेही विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसे वातावरण निर्माण केले पाहिजे. ते काम काही प्राध्यापकांचे नाही.
ते सरकार आणि समाजातील इतर लोकांनी केले पाहिजे. तसे वातावरण निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे ज्या कमतरता असतील त्या जरूर तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या. तुम्ही कधीही या, तुमचे स्वागत असेल. मी काही स्वत:ला साहेब मानत नाही. आम्ही सेवक आहोत. या देशाची प्रगती व्हावी. देश सुजलाम् सुफलाम् व्हावा यासाठी आम्ही आहोत. काही उणिवा असतील त्या पूर्ण करण्याचे काम आम्ही करू, असे ठोस आश्वासनही राणे यांनी दिले.
जमिनीवरील जेवढी आपली साधनसामग्री होती ती आपण उपयोगात आणत आहोत. त्याच्यावर बरेच काही अवलंबून आहे. तरीही आता यापुढे आपले जीवनमान उंचवायचे असेल तर सागरातील साधनसामग्रीचा उपयोग देशाच्या अॅसेटसाठी केला पाहिजे. म्हणून तुमचे हे शिक्षण महत्त्वाचे आहे. तुम्ही देत असलेले हे आधुनिक शिक्षण विद्यार्थी घेतील आणि देश घडवतील.
आपला देश तरुण आहे. युवकांची संख्या ६३ टक्के आहे. या तरुणांना ज्ञानाच्या क्षेत्रात गोवले पाहिजे, त्यांचा योग्य वापर केला गेला पाहिजे. या देशात काही कमी नाही. इतर देशांपेक्षा आपल्याकडे साधनसामग्री जास्त आहे.
माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदाहरण द्यायचे झाले तर नऊ प्रकारची खनिजे आहेत. आंबे, काजू, करवंदे, फणस यांच्या बागा आहेत. मात्र तिथले लोक त्याचा योग्य उपयोग करून घेत नाहीत. थोडे शिकले की थेट मुंबईला येतात. तिथे थांबतच नाहीत. तिथे ३०० रुपये रोजानेही नोकर मिळत नाहीत. परंतु मुंबईत येऊन दोन हजारांवर नोकरी करतात. त्यांना सागरी साधनसामग्रीचे ज्ञान देऊन तिथेच रोजगार मिळावा, अशी अपेक्षा राणे यांनी शेवटी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता भवन येथे असलेल्या व्हच्र्युअल क्लासरूममध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते. या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, बीसीयूडीचे संचालक डॉ. राजपाल हांडे, कुलसचिव डॉ. एम. ए. खान, प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. विनायक दळवी, लाइफ सायन्सचे प्रा. बी. एल. जाधव आदी उपस्थित होते.