भारत दौ-यावर आलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची हवा मोदी सरकारने तयार केली होती. प्रत्यक्षात चीनकडून भारतात केवळ २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली.
नवी दिल्ली- भारत दौ-यावर आलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची हवा मोदी सरकारने तयार केली होती. प्रत्यक्षात चीनकडून भारतात केवळ २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. त्यामुळे मोदी सरकारचे अपयश ढळढळीतपणे उघड झाले आहे. त्यातच चीनकडून भारताच्या सीमेत सातत्याने घुसखोरी सुरू असल्याने संरक्षणाच्या पातळीवर मोदी सरकारचा ढिसाळपणा सुरू असल्याचे दिसत आहे.
चिनी अध्यक्षांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच भारतात चीनकडून १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात केली जाण्याची मोठी हवा मोदी यांनी तयार केली होती. चीनचे अध्यक्ष तीन दिवस भारतात होते. त्यांनी मोदींशी चर्चा केली. मात्र चीनने भारतात अवघी २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. मात्र, चीनने अन्य देशांच्या तुलनेत भारतात तुटपुंजी गुंतवणूक केली. भारतात येण्यापूर्वी जिनपिंग हे श्रीलंका आणि मालदीवच्या दौ-यावर गेले होते. या दोन्ही छोटय़ा देशांत चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली. मालदीवमध्ये विमानतळाचे आधुनिकीकरण चीन करणार असून श्रीलंकेत मोठे बंदर विकसित करणार आहे. भारत आणि चीनमध्ये १५ कलमी करार झाले आहेत. त्यात चीनने भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात २० अब्ज डॉलर्स गुंतवण्याचे आश्वासन दिले. मात्र ही गुंतवणूक ते एकदम करणार नसून टप्प्याटप्याने करणार आहेत. चीनने गेल्या १० वर्षात भारतात केवळ ४०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
चीनचे अध्यक्ष भारतात असताना चीनचे सैन्य देमचोक व चुमार भागात शिरले होते. लडाख परिसरात भारतीय हद्दीत पाच किलोमीटर आत हे सैन्य घुसून तंबू ठोकत होते. त्यातच चिनी कामगारांनी भारतीय हद्दीत रस्ते बांधण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने त्यांना हटकले. त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. चिनी सैन्याने आपल्या सैनिकांसाठी हेलिकॉप्टरमधून विशेष रसद पुरवली होती. त्यामुळे संरक्षण पातळीवरही मोदी सरकारचे अपयश ढळढळीतपणे उघड झाले.