अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त समजला जातो. या दिवशी किमान गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे.
नवी दिल्ली- अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त समजला जातो. या दिवशी किमान गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सोन्याच्या दुकानात या दिवशी गर्दी असते. मात्र, यंदा ग्राहकांनी सोन्याच्या दुकानांकडे चक्क पाठ फिरवल्याचे देशभरात दिसले. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याची विक्री २० ते ३० टक्क्यानी घटल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
सोने खरेदीत भारतीय जगात अव्वल आहेत. दिवाळी, धनतेरस व अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी मोठया प्रमाणावर केली जाते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ३०१०० रुपये गेला आहे.
गेल्यावर्षी हाच दर २७,१०० रुपये होता. किंमत वाढल्याने सोन्याच्या विक्रीत घट झाली. तसेच सरकारने दोन लाखांपेक्षा अधिक खरेदी केल्यास पॅन सक्तीचे केल्याने त्याचाही परिणाम झाला, असे गीतांजली समूहाचे अध्यक्ष मेहुल चोक्सी यांनी सांगितले. पी. सी. ज्वेलर्स व्यवस्थापकीय संचालक बलराम गर्ग म्हणाले की, सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने विक्री स्थिर राहिली.
सोन्याच्या विक्रीत २० ते २५ टक्के घट झाली आहे. कारण दिल्लीत सोन्याच्या दरांमध्ये दरवर्षी ११ टक्के वाढ होत आहे, असे अखिल भारतीय सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरिंदर कुमार जैन यांनी सांगितले. तामिळनाडूत सोन्याच्या विक्रीत २० ते ३० टक्के घट झाली, असे मद्रास ज्वेलरी आणि डायमंड र्मचट असोसिएशने सांगितले.