लोकसभा निवडणुकीनंतर अंत्यत महत्त्वाच्या समजल्या जाणा-या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यंदा सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार आहेत.
मुंबई- लोकसभा निवडणुकीनंतर अंत्यत महत्त्वाच्या समजल्या जाणा-या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यंदा सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार आहेत. निवडणुकांच्या घोषणा होण्याआधीपासूनच आघाडी आणि महायुतीमध्ये सुरु असलेल्या जागावाटपावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक असताना देखील काही तोडगा निघाला नाही.
प्रथम भाजपने २५ वर्ष जुनी युती मोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्याच्या स्थापनेनंतर सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर प्रथमच निवडणुका लढतील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर १९९९मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. मात्र त्यानंतर एकत्र येवून सत्ता स्थापन केली होती. पुढे विधानसभेच्या दोन निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या होत्या. यंदा मात्र हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील. राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढताना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार असून, सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासंदर्भात ते राज्यपालांना भेटणार आहेत.
दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या १९८९ भाजप-शिवसेना हे देखील आपली २५ वर्षाची युती तोडून विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील. वाचा-भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या राज्यातील प्रमुख पक्षांनी अखेरपर्यंत मित्र पक्षांना अतिरिक्त जागा देण्यास नकार दिल्याने अखेर स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.