जागतिक बाजारपेठेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षात निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण ठरणार आहे.
मुंबई- जागतिक बाजारपेठेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षात निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण ठरणार आहे. एवढेच नाही तर ३०० अब्ज डॉलरखाली या निर्यातीचा आकडा घसरण्याबाबत सरकारी पातळीवरच चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या अकरा महिन्यांमध्ये निर्यातीत सातत्याने घसरण सुरू आहे.
गेल्या वर्षी ३१२ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. या वर्षी ३२५ अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पण या वर्षी ३०० अब्ज डॉलरचा आकडा जरी गाठण्यात यश आले तरी ती आनंदाची बाब ठरेल.
मात्र ३०० अब्ज डॉलरचा आकडा गाठणेही मुश्कील असल्याचे वाणिज्य आणि उद्योग खात्याचे सहसचिव रवी कपूर यांनी ‘इंडिया इंजिनीअरिंग सोर्सिग शो’मध्ये स्पष्ट केले. भारतीय अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेने या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
कमजोर जागतिक बाजारपेठेत भारतीय निर्यातीला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे निर्यातीत सलग अकरा महिन्यांमध्ये घसरणीची नोंद झाली आहे. या वर्षी पहिल्या सात महिन्यांमध्ये १५४ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे.
पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत झालेल्या मोठय़ा घसरणीचा भारतीय निर्यातीला मोठा फटका बसत आहे. निर्यातीला आधार देण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. यामध्ये व्यवहार खर्चासंबंधीचा विषय तडीस नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे कपूर म्हणाले.