होळी-धुळवड आली की, दोन-चार दिवस समस्त महिला वर्गाला धडकी भरते. कारण या दिवसांत पाणी आणि रंगाने भरलेले फुगे एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे कुठून अंगावर फेकले जातील, हे काही सांगता येत नाही. रस्त्यावरून येता-जाता हा छळवाद या काळात महिलांच्या वाट्याला येतो आणि सणांचा आनंद वाटण्याऐवजी ते नकोसे होऊन जातात. सणांच्या विकृतीकरणाचा हा एक नमुना आहे. सगळ्याच सण-उत्सवांचं पूर्वीचं मंगलमय स्वरूप हरवून आजकाल त्यांना बिभत्स आणि ओंगळवाणं रूप आलं आहे. त्यांच्यातील डिजे संस्कृती त्रासदायक ठरू लागली आहे. त्यामुळे या सणांचं मुख्य उद्दिष्टच कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आहे. मग तो लोकमान्य टिळकांनी सुरू कलेला सार्वजनिक गणेशोत्सव असो की, प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेला नवरात्रौत्सव. कानठळ्या बसवणा-या या संगीताशिवाय कोणताही सण साजरा होत नाही. जनजागृतीकरता सुरू करण्यात आलेल्या गणेशोत्सवासारख्या सणातही अक्षरश: धांगडधिंगा चालतो. उत्सवांच्या निमित्ताने मिरवणुका तर किळसवाण्या असतात. आज सणांमध्ये तरुणाईचा उत्साह वाढत असला तरी त्यांचं हे विकृत स्वरूप क्लेशकारक आहे. हे विकृतीकरण नेमकं का होतंय, याचा घेतलेला हा आढावा.
सणांचं ‘चिनी’ स्वरूप हेदेखील विकृतीकरणच!
वेदांमधील ‘समनस् सूक्तात’ सांगितल्यानुसार, सर्वाना आनंद देणं, हा सण साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे. पूर्वी गावाकडे १२ बलुतेदारांची (श्रमिक वर्गाची) घरं सधन व्हावीत, सणांच्या निमित्तानं त्या-त्या ज्ञातीतील श्रमिक वर्गाला रोजगार मिळून त्याचं कुटुंब सुखी व्हावं, हा गावोगावी सण साजरा करण्यामागचा हेतू होता. जो अगदी गोरगरिबांपासून ते श्रीमंत वर्गापर्यंतच्या सर्वानाच सुखावणारा होता.
सण साजरे करण्याच्या आनंदासोबत गोडधोड खाणं आणि वर्षभर येणा-या सणांच्या निमित्ताने पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीतील सर्वाच्याच तोंडात आणि मनात हा गोडवा कायम राहावा, हा उद्देश असे. आज मात्र सणांच्या निमित्ताने खाल्ली जाणारी पंचपक्वान्नं ही कायमच या ना त्या निमित्तानं खाल्ली जातात. त्यामुळे सणांनिमित्त खाल्ल्या जाणा-या पक्वान्नांचं मोठ्यांना किंवा लहानांनाही अप्रूप राहिलेलं नाही. हेही एक प्रकारचं विकृतीकरणच आहे. शिवाय या पक्वान्नांचा अतिरेक आणि अतिसेवनानं होणारे आजार, हाही एक वेगळा मुद्दा आहे.
सण आपले आणि साजरा करतो चीन, अशी सध्या परिस्थिती आहे. कारण प्रत्येक सणांसाठी चीनमध्ये तयार होऊन भारतीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आयात केलेल्या वस्तूंनी भरलेल्या दिसतात. आपल्यापैकी बरेच जण अगदी कौतुकानं दिवाळीत चायनीज पद्धतीचे कंदील, दिवे, मेणबत्त्या, फटाके वगैरे, तर होळीत चायनीज रंग, मार्गशीर्ष महिन्यात पूजले जाणारे महालक्ष्मीच्या व्रतासाठीचे मुखवटे असे अनेक ‘चायना आयटम’ घरी आणतो. आता तर गणपतीच्या मूर्तीही चीनहून येऊ लागल्या आहेत. तात्पर्य हे की, आपण भारतीय आपल्या संस्कृतीतले सण साजरे करताना, आपल्याकडील तळागाळातील लोकांचा रोजगार हिसकावून घेऊन सणांच्या, निमित्ताने त्यांच्या जगण्यातला आनंद हिरावून घेऊन चीनसारख्या प्रगत राष्ट्राचे खिसे भरून त्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करतोय.
याचं एक उदाहरण म्हणजे, मी एका प्रदर्शनात गेले असता, तिथे एक जण चीनमध्ये बनलेली दिव्यात अखंड तेवणारी वात विकत होता. ही चायनीज वात वापरल्याने आपण एकाच वेळी शेतकरी, पर्यावरण आणि आपलं आरोग्य या तिन्हींशी खेळतो. कारण आपल्याकडील शेतकरी दिव्यात वापरल्या जाणा-या वातीच्या कापसासाठी ‘देवकापसाच्या झाडा’ची लागवड करतो. ही वात जर दिव्यांमध्ये सर्वत्र वापरली जाऊ लागली, तर शेतक-याच्या रोजीरोटीला धोका, वृक्षलागवडीला धोका आणि आपल्या खोलीत पेटवल्यावर त्यातून निघणा-या अदृश्य विषारी वायूमुळे (जो अर्थातच हानिकारकच असतो) पर्यायाने आपल्या आरोग्यालाही निश्चितच धोका संभवतो.
पर्यावरणाचं संरक्षण आणि त्याचं संवर्धन, पर्यावरणाचा होणारा -हास हा कटाक्षाने टाळण्याशिवाय आता पर्याय नाहीये. शिवाय लोकमान्यांचा सणांद्वारे सामाजिक एकत्रीकरण व त्यातून साधलं जाणारं प्रबोधन आणि आनंदाची देवाण-घेवाण होणं, या उद्देशापासून दुरावू नये व पुढील पिढयांनीही हा उद्देशाचा मान राखूनच सण साजरे करावेत, यासाठीची पायाबांधणी करण्याची जबाबदारी आपलीच आहे! – डॉ. सुचेता सावंत, पीएच. डी. रिसर्च स्कॉलर
मागची पिढी दोषीच!
गेल्या काही वर्षात आपल्या हिंदू धर्मातील सणांचं रूपडं खूपच बदलत चाललं आहे, याला काही घटक कारणीभूत आहेत, यातला प्रमुख घटक म्हणजे राजकीय हस्तक्षेप. जेव्हा एखाद्या सणात राजकीय हस्तक्षेप आणि मोठमोठाले स्पॉन्सर गुंतले जातात, तेव्हा त्या सणांचं महत्त्व, पावित्र्य आणि मूळ स्वरूप पूर्णपणे बदलले जातं. आपल्या सणांचं काय महत्त्व आहे, हे आजच्या पिढीला माहीतच नाही. हा दोष त्यांचा नाही, त्यांना आपल्या सणांचं महत्त्व न शिकवणा-या मागच्या पिढीचा आहे. तरुण पिढी आपल्या सणांविषयी पूर्णपणे अज्ञानीच आहेत आणि त्यामुळे सणांना बिभत्स रूप येणं साहजिकच आहे, पण यात त्यांना दोषी ठरवण्यात काहीच अर्थ नाही. आज ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात त्यांच्या सणांचं महत्त्व पटवून देणा-या अनेक शाळा चालवल्या जातात त्यांचा प्रसार केला जातो आणि त्या त्या धर्मातले लोक आपल्या या सणांचं पावित्र्य आणि महत्त्व जपण्याच्या पूर्णपणे प्रयत्न करतात. मग हिंदू धर्मात असं का नाही होत? आपल्या लोकांना त्यांच्या मुलांनी कॉन्व्हेंट शाळेत जावं, अशी खूप इच्छा असते पण जेव्हा ते कॉन्व्हेंट शाळेत जातात तेव्हा नकळत त्यांच्यावर हिंदू धर्माचे संस्कार होण्याऐवजी ख्रिश्चन धर्माचे संस्कार होतात. ती मुलं तशीच वागत जातात, आजकाल तर काही शाळांनी शाळेच्या वेळापत्रकातून मूल्यशिक्षणाचा तासही काढून टाकला आहे मग आजच्या पिढीला आपल्या सणांचं महत्त्व समजावणार कोण? आज आपली मुलं शिकण्यासाठी जेव्हा परदेशी जातात, तेव्हा तेथील लोक ही आपली सण-संस्कृती जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात, पण आपल्या मुलांवर मुळातच त्यांचे आईवडील सणांचे, त्याविषयीच्या वाचनाचे संस्कार करत नाहीत. मग ते आपली संस्कृती इतर लोकांना काय सांगणार? मला असं वाटत की अजूनही वेळ गेलेली नाही. मी या तरुण पिढीकडे खूप आशेने बघतो, पण डोंबिवलीसारख शहरं सणांची पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न करत आहे, ते पाहता पुढच्या काही काळात आपल्या सणांना आलेलं बिभत्स रूप नक्कीच बदलेल. – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक
वैज्ञानिक तत्त्वांचा विचार व्हावा!
सण मुळात असतात कशासाठी, हेच आपण विसरून गेलेलो आहोत. त्यामागील शास्त्रीय तत्त्व, वैज्ञानिक कारणं आपण विसरलो आहोत. त्यांच्या मूळ उद्देशांना अनुसरून आता सण साजरेच होत नाहीत. आपले सण-उत्सव व ऋतू हे चंद्रसूर्याच्या भ्रमणावर आधारित आहेत. त्यामुळे आपल्याकडे सणांची एक विशिष्ट रचना आहे. त्यातही सण म्हटलं तर ते शारीरिक आरोग्यासाठी असतात, तर उत्सव हे बहुतेक सामुदायिक असल्याने ते मनाच्या आरोग्यासाठी असतात. आता स्वरूप बदललं आहे, ते जास्त करून उत्सवांचं. हे लोकांनी एकत्र यावं, यासाठी सुरू झालेले उत्सव आहेत. पण होतं काय की, लोकं एकत्र आले की तिथे पुढारी जमतात. वारेमाप पैसे खर्च करतात. थोडक्यात ती त्यांची प्रचारयात्राच होऊन जाते. आजकाल गोकुळाष्टमी, गणपती इत्यादी सणांत हेच आढळते. सणांचा मूळ हेतू त्यामुळे बाजूलाच राहतो. त्यामागील वैज्ञानिक हेतू कोणी लक्षात ठेवत नाहीत. मग त्यात नर्तिका नाचवणं असे काही विकृत प्रकार घडतात. हे चुकीचं आहे. कृष्णाने कर्मयोगाचा संदेश दिला. तो कोण लक्षात घेतो? होळी पौर्णिमेत झाडांची तोड करतात. पण खरं तर आपण थंडीत झाडांखाली पडलेला पालापाचोळा जमा करून तो जाळायचा असतो आणि होतं उलटंच. रंगपंचमीतही कृत्रिम रंग उधळले जातात ज्याने शरीराचं नुकसान होतं. आता तर परदेशी लोकंही आपल्या सणांचा अभ्यास करण्यासाठी इथे येत आहेत. परंतु आपण आपल्या सण-उत्सवांकडे किती गांभीर्यानं पाहतो? आपल्याकडे व्यास ऋषी व संत तुकाराम यांनी परोपकाराचा संदेश दिला. परोपकार म्हणजे पुण्य व दुस-याला पीडा, त्रास देणं म्हणजे पाप, असं त्यांनी म्हटलं आहे. मग आता सण साजरे करताना आपण दुस-यांना त्रास देत असू तर आपण पापच करत आहोत हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. हल्ली सामाजिक असुरक्षितता वाढलेली आहे, त्यामुळे देवावरची नसती श्रद्धा वाढली आहे. सतत कसली तरी भीती, चिंता, ताण, काळजी, स्पर्धा यामुळे मनुष्य दैववादी झाला आहे. त्यातूनच सण जास्त जोशात कोण साजरा करतो याची अहमहमिका लागते. मुळात आपण आपलं कर्म विसरतो व देवाच्या मागे लागतो. हे टाळून, आपली कर्तव्य-कर्म लक्षात घेऊन आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे, सण-उत्सवांच्या साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये नाही. – दा. कृ. सोमण, खगोल अभ्यासक
विकृतीकरणामागे राजकीय व व्यावसायिक कारणं!
आजकाल कोणताही सण हा एक मोठा दिखावूपणा होत चालला आहे. हे सण साजरे करण्यामागे मोठ्या प्रमाणावर राजकीय व व्यावसायिक कारणं आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे या सणांचं स्वरूप भव्य होताना दिसून येतं. त्याचबरोबर बॉलिवुडच्या तारेतारकांची उपस्थिती व त्याला मिळणारा व्यापारिक प्रतिसाद यामुळेही या सणांमध्ये गोंगाट वाढलेला पाहायला मिळतो. आज कोणताही कार्यक्रम पाहिलात तरी त्यात अनेक मोठ्या-मोठ्या कंपन्यांना स्वारस्य असतं. त्यामुळेच व्यावसयिक तत्त्वावर अधिकाधिक गर्दी खेचण्यासाठी अशा प्रकारचे सण साजरे करण्याकडे कल वाढलेला दिसून येतो. वास्तविक पाहता ही मंडळी समाजाची आदर्श आहेत. रोल मॉडेल आहेत. त्यांनीच जर अशा प्रकारच्या सण साजरे करण्याला प्रोत्साहन दिलं नाही तर त्याने मोठा फरक होईल. तसं न होता त्यांच्या व्यावसायिक कारणांनी तेच या कार्यक्रमाचा अधिकाधिक फायदा उचलताना दिसत आहेत. वास्तविक पाहता सणांचं स्वरूप हे धार्मिक आहे. त्यामुळे हे सण व्यक्तिगत पातळीवर साजरे केले पाहिजेत ज्याचा इतरांना कोणताही त्रास होता कामा नये. मात्र सध्या तरी आपल्याला याचं चित्र उलटंच पाहायला मिळतं आहे. जर लोकांनी एकत्र येऊन आपल्या सणांचा विचार केला तर हे सहज लक्षात येईल. याबाबतीत दिवाळी या सणाचे एक सकारात्मक असे उदाहरण देता येईल. वास्तविक पाहता हा सण सर्वाधिक लोक साजरा करतात. मात्र गेल्या काही वर्षात या सणातली आवाजाची पातळी कमी झाल्याचं दिसून येत आहे. किमान मुंबईतली तरी आकडेवारी ही आशादायक आहे. या सणाच्या वेळी होणा-या ध्वनिप्रदूषणाचा लोकांनीच विचार केला असून त्यात घट झालेली पाहायला मिळते. सण साजरे करण्यासाठी काही एक निश्चित योजना आखायला हवी. एखादी जागा निश्चित करायला हवी, तिथे लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारे सण साजरे करावेत, जेणेकरून इतरांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही. एखादी मिरवणूक जर एखाद्या मोठ्या इस्पितळासमोरून जात असेल व त्याचा रुग्णांना त्रास होणार असेल तर ती गोष्ट माणुसकीला धरून नाही, याचा विचार सुज्ञांनी करायला हवा. अशा प्रकारे मिरवणुका आयोजित करून सगळ्यांनाच वेठीला धरणं हे बेजबाबदारपणाचं आहे असं वाटतं. सर्वच धर्मामध्ये आता या प्रकारे सण साजरे करण्याचं प्रमाण वाढत आहेत हे नक्कीच चिंताजनक आहे. सण हा आनंदासाठी असावा, त्यात दिखावा येऊ नये असं मला वाटतं. एकदा का दिखावा आला की त्यात गैरप्रकार सुरू होतात. – सुमारिया अब्दुल्ला, आवाज संघटना
बदल स्वीकारणं अपरिहार्य आहे!
सध्या सगळ्याच सण-उत्सवांचं रूप बदलत चाललंय, हे खरं आहे. सर्वच क्षेत्रांत बदलाचे वारे वाहू लागलेत. त्या बदलांबरोबरच यापुढच्या काळात आपल्याला जावं लागणार असल्यामुळे हा बदल स्वीकारणं अपरिहार्य आहे. आता सध्या होतंय काय की, आपण सगळ्या पाश्चिमात्य गोष्टींकडे आकर्षित व्हायला लागलेले आहोत. त्यांच्यातही काही चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. त्या घेऊन आपण आपल्याही परंपरा जपू शकतो. आणि आपल्या परंपरेमध्ये जे चांगलं आहे, जे या काळाशी निगडित आहे ते आपण नक्कीच करू शकतो. उदा. पाश्चिमात्य देशात महिला, किटी पार्टीज करतात. त्या आपल्या हळदीकुंकू समारंभापेक्षा काय वेगळ्या असतात? आपण महिलांनी एकत्र यावं आणि आपल्या विचारांची देवाण-घेवाण करावी म्हणूनच हळदी-कुंकू, मंगळागौर, भोंडला असे सार्वजनिक तरीही घरगुती समारंभ पूर्वी असत. मंगळागौर किंवा भोंडल्यासारख्या कार्यक्रमातून त्या काळातल्या महिलांना आपली नृत्य, गायन, काव्यप्रतिभा लोकांसमोर आणण्याची संधी मिळत असे. कारण त्या काळात महिला घराबाहेर पडून असे मनोरंजनाचे कार्यक्रम करू शकत नव्हत्या. आता मात्र प्रसारमाध्यमांमुळे जग खूप जवळ आलंय. तसंच आपल्या एकत्र कुटुंबपद्धती जाऊन ब-याच प्रमाणात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे, आपण आपल्या नातेवाईकांपासून दुरावलो आहोत. त्यामुळे आज प्रत्येकालाच सेलिब्रेशन करण्यासाठी काहीतरी कारण किंवा निमित्त शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा हे सर्व सणवार इव्हेंट म्हणून साजरे करायला सुरुवात झाली आहे. असे उत्सव साजरे करणं केव्हाही चांगलंच, पण त्यामागचा मूळ हेतू, मूळ उद्देश हे पुढच्या पिढीला समजावून सांगितलंच पाहिजे. त्या सणामागचा इतिहास लक्षात घेऊन तो सण-समारंभ आधुनिक पद्धतीने साजरा करायला काहीच हरकत नाही. उदा. श्रावणात शुक्रवारी सवाष्ण स्त्री जेवायला बोलावायची पद्धत आहे. तिच्यात आपण नेहमी लक्ष्मीचं रूप पाहतो. परंतु आज सर्वच महिला नोकरी करत असल्यामुळे त्यांना शुक्रवारी सवाष्ण बोलावणं शक्य नसेल तर तिने तोच भाव मनात बाळगून रविवारी सवाष्ण बोलवायला काय हरकत आहे? म्हणूनच मला वाटतं, आज पारंपरिक सण प्रोफेशनल पद्धतीने साजरे करणारे ग्रुप अस्तित्वात आले आहेत. तशी गरज आज लोकांना वाटू लागली आहे. – शिबानी जोशी , दूरदर्शन वृत्तनिवेदिका, ‘सई’ ग्रुप संस्थापिका
पर्यावरणाचा विचार व्हावा!
सण-समारंभ हे समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक असा घटक आहे. या निमित्ताने लोक एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, आपल्या विचारांचं आदानप्रदान करतात, आनंदोत्सव साजरा करतात. एका सावर्जनिक आनंदात सहभागी होतात. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला इतरांबरोबर आपला आनंद वाटायला आवडतं. सगळ्याच संस्कृतींमध्ये अशा प्रकारचे सण साजरे केले जात असतात. त्याचं स्वरूप हे धार्मिक असतं. परमेश्वराविषयीची कृतज्ञताच या आनंदातून व्यक्त होत असते. आताशा मात्र या सणांचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदललं गेल्याचं दिसून येत आहे. त्यात कुठेतरी सणाचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे की काय असं वाटतं. त्यात मद्यपानाचं प्रमाण अचकट विचकट नाचगाणं करणं, याचा प्रभाव वाढला आहे. अशा प्रकारे सण साजरे करणं हे अध्यात्माला मारक ठरत चालल्याचं दिसून येत आहे. अशा प्रकारच्या वागण्यातून ना समाजाला आनंद मिळत नाही स्वत:ला. त्यासाठी सण साजरे करण्याबाबत समाजातल्या धुरिणांनी मार्गदर्शन करण्याची वेळ आता आली असल्याचं मला वाटतं. आता काही प्रमाणात अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळतात. निर्माल्य गोळा करणं, पर्यावरणासंबंधी विचार करणं, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न करणं हे त्याचचं द्योतक आहे. सण जर आनंदाने व उत्साहाने साजरे करायला हवे असतील तर त्यातून राजकारण्यांना दूर ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपल्या कार्यक्रमाला मोठी देणगी देणा-या व्यक्तीचा अंतस्थ हेतू काय आहे. त्यातून समाजाला काय मिळणार आहे याचाही विचार करायला हवा. केवळ कुणाच्या तरी पैशाने एक सण साजरा झाला याचंच समाधान मानू नये असं मला वाटतं. सणातल्या या नाचगाण्यांच्या व आवाजाच्या गोष्टी टाळून ते वेगळ्या पद्धतीने साजरे व्हायला हवेत. त्यात एखादी व्याखानमाला, मुलांच्या गुणांचं दर्शन होईल अशा काही स्पर्धा व परीक्षाही आयोजित करायला हव्यात, जेणेकरून या सणांच्या निमित्ताने मुलांच्या अंगभूत गुणांना काही वाव मिळू शकेल. – फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ख्रिस्ती धर्मगुरू
सणांमुळेच संस्कृती टिकून आहे!
सणांचं स्वरूप निश्चितच बदललं आहे. खरं म्हणजे बदल हा सृष्टीचाच नियम आहे. तो याही बाबतीत दिसून येत आहे. आता लोकांचं राहणीमान बदललं आहे. नुसतं बदललं असं म्हणण्यापेक्षा ते उंचावलं आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा भपका करावा, अशी वृत्ती वाढत आहे. त्यामुळे हा बदल होणारच होता. पण तरीही विकृतीकरण झालं आहे असं म्हणता येणर नाही. लोकांच्या जगण्याच्या संकल्पना बदलल्या आहेत. त्या संकल्पनांना किंबहुना आपल्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी त्या त्या प्रमाणे प्रत्येक जण सण साजरे करतात. त्यामुळे कुठेतरी आपल्याला त्या सणांचं विकृतीकरण होत असल्याचं केवळ वाटतं, म्हणून काय आपण सण साजरे करायचं सोडून देतो का? सण साजरे केलेच नाहीत तर आपली संस्कृती कशी काय टिकून राहणार? या सणांमुळेच खरं तर संस्कृती टिकते. पण हे होत असताना काही सार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांची छेडछाड, चोरीमारी असे काही प्रकार घडतात, मात्र असे प्रकार अपवादात्मकच दिसून येतात. तसंच कित्येक ठिकाणी मोठ्या आवाजात लाउडस्पीकर लावले जातात. या गोष्टी अनावश्यक असतात. त्यांच्यावर ध्वनिविरोधकांकडून निर्बंध लादले जातातच आणि योग्य ती कारवाईदेखील होते. – अशोक पवार, अध्यक्ष (लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
आपले सण ग्लोबल होत चाललेत!
सणांचं स्वरूप बदलतंय, असं म्हणण्यापेक्षा आपले सण ग्लोबल होत चाललेत, असं म्हणायला मला अधिक आवडेल. मी स्वत: दहीहंडीच्या एका संघाचा प्रशिक्षक आहे. दोन महिने आम्ही सरावाला त्याच्या सुरुवात करतो, सगळी मुलं वेळ काढून एकत्र एका ठिकाणी भेटत असतात. सण हे साजरे यासाठी केले जातात की, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सणांचा आनंद लुटला पाहिजे. म्हणजे सणांचा मूळ हेतू कुठे ना कुठे आजही पूर्ण होतोच आहे. या सणात बदल जर घडलाच आहे तर तो बक्षिसांमध्ये, आणि थर लावण्याच्या स्पर्धेमध्ये.. पण या सगळ्यांमुळेच या सणाला जागतिक दर्जावरही एक स्थान मिळालं आहे. वेगवेगळ्या देशातील लोकं या सणात सहभागी होऊ पाहत आहेत. दहीहंडीव्यतिरिक्त अन्य सण पाहता ही मला तसंच वाटतं. सणांचं स्वरूप बदललेलं नाही.. पण सण साजरा करण्याचं स्वरूप नक्की बदललं आहे. ते बदलणं सहाजिकच आहे. गणपती विसर्जनाची जी मिरवणूक निघते, त्यामध्ये स्पीकर्स लावले जातात. यावर वेळोवेळी आक्षेप घेतला जातो. पण जर आपण सगळ्याच आधुनिक गोष्टींचा अवलंब करू लागलो आहोत, तर सणांमध्येही ते येणारच. – संदीप ढवळे, प्रशिक्षक, जय जवान दहीहंडी पथक
>संकलन- राजेश शिरभाते
>शब्दांकन- विशाखा शिर्के, अदिती पराडकर, प्रतीक्षा चौकेकर, प्राजक्ता तांडेल, तृप्ती राणे, प्रियांका चव्हाण