मान्सून एकदाचा सगळीकडे सक्रिय झालाच आहे. त्यामुळे सगळेच गरमागरम आणि लज्जतदार पदार्थ खायला आतुर असतात. पण, पावसात भिजताना सगळ्यांचा आवडता आणि चमचमीत पदार्थ म्हणजे रस्त्याच्या कडेला मिळणारा गरमागरम भाजलेला मका. पण, अशा रस्त्याच्या कडेला असलेल्या पदार्थाचा आनंद घेताना आपण आपल्या आरोग्याला धोका पोहोचवत तर नाही ना.. याचा विचारही करावयास हवा. या पावसाळ्यात आपण ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते खालीलप्रमाणे..
१) पदार्थाच्या भोवताली घोंघावत असलेल्या माश्या
तुम्ही कोणताही पदार्थ खाताना तुमच्या अवती भवती माश्या भुणभुणत असतात ना. पण, या माश्यांमध्ये शरीराला अपायकारक असे विषाणू असतात. ज्यामुळे आपल्याला भयानक आजारांना सामोरे जावे लागते. रस्त्याच्या कडेला बसणारे मका विक्रेते अत्यंत गलिच्छ अशा जागांवर आपला व्यवसाय करताना आढळून येतात. अशा ठिकाणचे पदार्थ खावे की नाहीत, हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
२) खराब असलेल्या जाळ्या
पाहायला गेले, तर पावसाळ्यात सगळेच विक्रेते इतके व्यस्त असतात की, त्यांना आपल्या स्वच्छतेविषयी काळजीच नसते. पावसाळ्यात मके विक्रेते ज्या जाळ्यांवर मके भाजतात अशा बहुतांश जाळ्या या कोळशाने भरलेल्या असतात. अशा परिस्थितीत कर्करोगाला निमंत्रणदेखील असू शकते. कोळसा मिश्रित मका खाल्ला, तर आपल्या शरिराला नक्कीच अपाय होऊ शकतो हे मात्र नक्की.
३) खराब हात
रस्त्याच्या कडेला मका अथवा कोणतेही तत्सम पदार्थ विकताना विक्रेत्याजवळ पाण्याने भरलेल्या खराब बाटल्या असतात. त्यातच हे विक्रेते आपले हात माती आणि पाण्याने धूत असतात. त्यामुळे अनेक असे सूक्ष्मजीव या पदार्थामधून आपल्या शरीरात जाऊ शकतात.
४) मक्यामध्ये वापरण्यात येणारे जुने मसाले आणि लिंबू
अनेकदा असे दिसून येते की, मक्यासाठी वापरली जाणारी लिंबं आणि मसाले जुनेच वापरले जातात. त्यामध्ये भाजी विक्रेत्यांकडून सहसा टाकण्यात आलेली लिंबं असे विक्रेते विकत घेतात आणि त्याचा वापर करतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे आपल्या शरिरासाठी घातक आहेत.