शाळांना पडलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा, त्यातच महाराष्ट्र दिन व येणारा रविवार असे लगोलग सुट्टयांचे दिवस असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
खोपोली – शाळांना पडलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा, त्यातच महाराष्ट्र दिन व येणारा रविवार असे लगोलग सुट्टयांचे दिवस असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणा-यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खासगी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे या मार्गावर शुक्रवारी मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर तब्बल ११ तास वाहनांची रखडपट्टी झाली. त्यामुळे संध्याकाळ व रात्री उशिरापर्यंत कासवगतीने वाहने कोकणाकडे जात होती.
पेण ते वडखळदरम्यान वाहतूक कोंडी झाली. या पट्टय़ात गाडय़ा पुढे सरकायला दीड तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. भरदुपारी वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी अखेर मार्गवरच मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. तर अनेकांनी महामार्गावरील रखडलेल्या वाहतुकीचा त्रास वेगळ्या पद्धतीने ‘एंजॉय’ केला. शितपेय, कलिंगडांचा गारेगार गोडवा अनुभवत उन्हाळ्यातला हा रखडलेला प्रवास सुकर केला.
या महामार्गाला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत तब्बल अकरा तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. फक्त पेण ते वडखळ हे अंतर गाठायला वाहनचालकांना दीड तास लागत होता. यामुळे रोहा, नागोठणे, पोलादपूपर्यंत वाहतूक कोंडी पसरली होती. गुरुवारी रात्रीपासूून हजारो वाहने कोकणात जाण्यासाठी निघाली असल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अलिबाग जिल्हा वाहतूक शाखेने पेण ते रोहा, पोलादपूपर्यंत महामार्गावर वाहतूक नियमनासाठी पोलीस तैनात ठेवलेले आहेत. अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक सिदार यांनी दिली. सायंकाळी सहानंतर कासवगतीने वाहतूक सुरू झाली मात्र, त्याने विशेष फरक पडला नाही.
मुंबई-पुणे महामार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खालापूूर टोलनाक्यापासून मांडप भोगद्यापर्यंत सात किमीपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रासलेले असताना ही कोंडी फोडण्यासाठी आवश्यक कुठलीही यंत्रणा या ठिकाणी नव्हती. कोंडी वाढल्यामुळे एकाच ठिकाणी वाहने खोळंबून होती. त्यामुळे रस्त्यालगतच्या पार्क किंवा हॉटेलमध्ये प्रवाशांनी काही काळ आसरा घेतला.