‘परंपरा आहे’ असं उत्तर दिल्यानंतर परंपरेने चालत आलेल्या गोष्टीमागचं शास्त्र शोधण्याचा प्रयत्न तिथे थांबतो. त्यामुळे अनेक कलांची, शास्त्रांची, इतिहासाची इत्थंभूत माहिती आपल्या हाती लागत नाही. पण डॉ. नयना तडवळकर यांच्यासारखी काही जिज्ञासू व्यक्तिमत्त्व मात्र परंपरेच्या मुळाशी जाऊन तिचा अभ्यास करण्याचं औत्सुक्य दाखवतात. पाच ते सहा हजार वर्षाचा प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या ‘रांगोळी’ या विषयावर नयनाताईंनी पीएचडी केली. चौकटीबाहेरच्या त्यांच्या या अभ्यासपूर्ण विचारांचा हा आढावा-‘रांगोळी’ या कलेची नाळ भारतीय संस्कृतीशी इतकी घट्ट जोडली गेली आहे की, भारतातल्या ६४ कलांमध्ये आपण तिला स्थान दिलं आहे. रांगोळी, चौकपूर्णा, मांडना, कोलम, अल्पना अशा जवळपास २५ नावांनी ही रांगोळी ओळखली जाते. पण असं असूनसुद्धा रांगोळी ही आपल्या उंबरठयापर्यंतच मर्यादित राहिली. इतर अनेक पारंपरिक कलांवर अभ्यास केला गेला. रांगोळीचा अभ्यासाच्या दृष्टीने मात्र कधी विचार केला गेला नाही. त्यामुळे आपल्या दारापुढची छोटीशी ‘रांगोळी’ एखाद्या व्यक्तीचा ‘पीएचडी’चा विषय होऊ शकते, ही कल्पनासुद्धा आपण कधी केली नसेल. पण वडाळा येथे राहणा-या डॉ. नयना तडवळकर यांनी ‘रंगावली आर्ट ऑफ इंडिया’ या विषयावर पीएचडी करून भारतातल्या रांगोळीची व्याप्ती संपूर्ण जगासमोर आणली आहे. त्या सांगतात, ‘‘फाईन आर्ट्स या विषयात मास्टर्स केल्यानंतर पीएचडीसाठी यापूर्वी अभ्यास न झालेला विषय निवडायचा, असं मी ठरवलं होतं.
पीएचडीसाठी विषय शोधायला घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, भित्तिचित्र किंवा वेगवेगळ्या लेणी, गुंफा यांसारख्या विषयांवर भरपूर काम झालेलं आहे. पण रांगोळी ही कला मात्र अभ्यासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिली होती. म्हणून मी ‘रांगोळी’ या विषयावर पीएचडी करायचं ठरवलं. दरम्यान, मी पीएचडीसाठी गाइड शोधू लागले. पण दुर्दैवाने मुंबईत कुठल्याच कॉलेजमध्ये फाईन आर्ट्स या विषयात पीएचडी करण्याची सोय नाही. कारण बहुतेक लोक फाईन आर्ट्सचं शिक्षण पूर्ण करून लगेच काम सुरू करतात. रिसर्चमध्ये कोणाला फारसा रस नसतो. त्यामुळे ब-याच जणांनी मला बडोदा किंवा नागपूरला जा, असं सुचवलं. पण योगायोगाने मला एसएनडीटी विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. वर्षा शिरगावकर यांच्याविषयी कळलं. ‘भारताचा सांस्कृतिक इतिहास’ या विषयात त्यांचा हातखंडा होता. मग त्यांना जाऊन भेटले, त्यांना माझा सिनॉप्सिस दाखवला आणि तीन दिवसांतच त्यांनी ‘मी तुला गाइड करेन,’ असं सांगितलं. मग २००८ ते २०१२ या चार वर्षामध्ये माझी पीएचडी पूर्ण झाली.
इतिहास या विषयात पीएचडी करत असताना बरेचदा ‘पेशवेकालीन इतिहास’ किंवा ‘मुगलकालीन इतिहास’ असा एका ठरावीक काळाचा अभ्यास केला जातो. पण नयनाताईंच्या बाबतीत इथेही आव्हान होतंच. पाच ते सहा हजार वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली ही कला आजही घरोघरी जोपासली जाते. म्हणूनच कदाचित आपल्या पुढच्या पिढयांना सर्वार्थाने रांगोळीचं महत्त्व कळण्यासाठी त्यांनी आपल्या अभ्यासात रांगोळीच्या उगमापासून सद्य स्थितीपर्यंतचा कालखंड विचारात घेतला आहे.
तंत्रज्ञान आणि कला यांच्यात मुख्य फरक असा की, तंत्रज्ञानाला नव्याची आस असते, तर कलेला जुन्याची कास. सतत नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी माणूस प्रयत्नशील असतो, पण त्याच वेळी जुनी कला मूळ स्वरूपात टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण बरेचदा या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी पूरकही ठरतात. ‘रांगोळी’ अतिशय अल्पायू आहे. अनेकदा नुकतीच काढलेली रांगोळी वर्दळीमुळे लगेचच पुसली जाते किंवा ती पुसावी लागते. एकदा काढलेली रांगोळी जतन करण्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का, असं विचारलं असता नयना म्हणाल्या, ‘‘काही जण रांगोळी अधिकाधिक काळ टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. कुणी कॅनव्हासवर रांगोळी काढतंय, तर कुणी थ्रीडी चष्मा लावून पाहावी लागणारी थ्रीडी रांगोळीसुद्धा काढत आहे. पण माझ्या मते रांगोळीच अल्पायू आहे म्हणूनच ही कला आजही जिवंत आहे आणि घराघरांपर्यंत पोहोचली आहे. कारण एकदा दीर्घकाळ टिकणारी रांगोळी निर्माण केली गेली तर, एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीला रांगोळी शिकवण्याची पद्धत बंद होईल आणि हळूहळू ही कला लुप्त होत जाईल. त्यामुळे रांगोळीचं अल्पायुष्य हे या कलेसाठी वरदानच ठरलं आहे, असं मला वाटतं.’’
नयना यांनी संस्कृत, प्राकृत आणि प्रादेशिक साहित्याचा अभ्यास केला. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांनी माहिती घेतली, छायाचित्रं टिपली आणि अशा सखोल संशोधनानंतर त्यांचा पीएचडीचा प्रबंध तयार झाला आहे. रांगोळी या विषयाचा इतिहास सांगणारं, संपूर्ण माहिती देणारं एकही पुस्तक आज उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या या प्रबंधावर आधारित पुस्तक लवकरच त्या प्रकाशित करणार आहेत. त्यांचा प्रबंधाचा विषय ‘भारतातील रांगोळी’ असा असला तरी या पुस्तकात त्यांनी इतर देशांतल्या रांगोळ्यांचाही अंतर्भाव केला आहे. पीएचडी झाल्यानंतर त्यांना हाँगकाँग देशाकडून त्यांचा शोधनिबंध सादर करण्यासाठी बोलावणं आलं. ९३ देशांच्या प्रतिनिधींमध्ये डॉ. नयना या भारताच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.
याशिवाय या वर्षी एप्रिल महिन्यात त्या जर्मनी देशातही त्यांचा शोधनिबंध सादर करून आल्या. सध्या त्या सोफिया कॉलेजमध्ये ‘भारतीय आणि पाश्चात्त्य कलांचा इतिहास’ या विषयाच्या निमंत्रित प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या राजस्थानातील मांडना या रांगोळी प्रकारावर ‘पोस्ट डॉक्टरेट’ करत आहेत. त्यासाठी त्यांना केंद्र शासनाची शिष्यवृत्ती (फेलोशिप) मिळाली आहे. ‘भारत हा असा देश आहे की, जिथे प्रगतीची आस धरताना आपण संस्कृतीची कास सोडत नाही. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अशा विषयांचा अभ्यास करून त्या कला, संस्कृती जगासमोर आणली पाहिजे,’ असं आवाहन करणा-या डॉ. नयना तडवळकर यांनी त्यांच्या सखोल अभ्यासाद्वारे कालाविश्वासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे..