भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा धडा राजस्थानच्या सामाजिक शास्त्राच्या शालेय पुस्तकातून गायब झाला आहे.
जयपूर- भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा धडा राजस्थानच्या सामाजिक शास्त्राच्या शालेय पुस्तकातून गायब झाला आहे. राजस्थानमधील भाजपा सरकारच्या या आकसापोटी केलेल्या कृतीचा काँग्रेसने जोरदार निषेध केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या सहावी ते आठवीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके तयार केली आहेत. या पुस्तकातून पंडित नेहरू यांनी केलेला स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्यानंतर त्यांनी दिलेले योगदान याबाबतची माहिती देणारा धडा रद्द करण्यात आला आहे. हे पुस्तक बाजारात आले नसले तरी त्याची माहिती राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर टाकली आहे.
या पुस्तकात महात्मा गांधी, वीर सावरकर, भगत सिंग, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, हेमू कलानी यांना स्थान देण्यात आले आहे. हा नवीन अभ्यासक्रम उदयपूरच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने बनवला आहे.
राज्यातील भाजपा सरकारच्या या कृतीविरोधात काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामेश्वर दुडी म्हणाले की, राजस्थानातील भाजपा सरकार आपला अजेंडा राबवत आहे. नेहरू यांनी स्वातंत्र्यलढयात मोठे योगदान दिले आहे. तसेच आधुनिक भारताचा पाया रचण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, असे त्यांनी सांगितले.
राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक व भाजपा इतिहासाचे पुनर्लेखन करू शकत नाही. ते नेहरूंसारख्या नामवंत द्रष्टया नेत्याला बाजूला करू शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थान सरकारची ही कृती निंदाजनक आहे. भारताच्या इतिहासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणतेही स्थान नाही. मात्र, आता भाजपा सरकार इतिहासातून नेहरू यांचे योगदान पुसायला निघाले आहे. देशातील जनता भाजपाला धडा शिकवेल.
राजस्थानला नेहरूंनी मोठे योगदान दिले आहे. पंचायती राज व्यवस्था राजस्थानमधून सुरू झाली. मात्र, विद्यमान भाजपा सरकारची ही कृती कोत्या मनाचे निदर्शक असून आम्ही सरकारच्या या कृतीचा निषेध करत आहोत. आम्ही जनतेच्या दरबारात सरकारचा डाव हाणून पाडू, असे त्यांनी सांगितले.