मुंबई- गौरी लंकेश यांच्या मारेक-यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या कर्नाटक शिक्षण विभागाच्या कर्मचा-यानेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांना प्रशिक्षण दिल्याची सुत्रांची माहिती आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
एसआयटीच्या सुत्रांनुसार, २३ जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या ५० वर्षीय राजेश बनगेरा याच्यावर तरुणांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजेश बनगेरानेच दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांना प्रशिक्षण दिले होते.
सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांना राजेश बनगेराचा फोटो दाखवला असता त्यांनी ओळख पटवली आहे. त्यानेच बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली असल्याची माहिती कर्नाटक एसआयटीकडून मिळाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विचारवंत हिंदुत्ववाद्यांच्या टार्गेटवर होते. ज्यासाठी राजेश बनगेराने जवळपास ५० तरुणांना प्रशिक्षण दिले होते. यामध्येच सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांच्यासह गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयित परशुराम वाघमारे आणि गणेश यांचा समावेश होता. रमेश बनगेराकडे दोन परवाना शस्त्र असून कराटेत ब्लॅक बेल्ट असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
हत्येचा कट रचण्याचा संशय असणा-या अमोल काळेने महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक तरुणांची भरती केली होती. या सर्वांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी राजेश बनगेरावर असल्याचा आरोप एसआयटीने केला आहे. अमोल काळेचा दाभोलकरांच्या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे. अमोल काळे आणि विरेंद्र तावडे यांनीच मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट आखल्याचं बोललं जात आहे.
एसआयटीने केलेल्या तपासात राजेश बनगेराने गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेक-यांनाही प्रशिक्षण दिले असल्याचे समोर आले आहे. त्यांचे मारेकरी वेगळे असल्याची माहिती आहे. राजेश बनगेरानेच चारही हत्यांसाठी काडतुसे पुरवली असल्याचा संशय आहे.
अटकेला घाबरू नका, नामजप करत रहा – सनातनची साधकांना सूचना
डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश आणि गोविंद पानसरे हत्याप्रकरणात संशयित आरोपींची अटक तसेच नालासोपा-यातून वैभव राऊतला झालेली अटक या प्रकरणात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध असल्याचा आरोप होत आहे. याचा संदर्भ देत सनातनने साधकांना सूचना दिल्या आहेत. निरपराध हिंदूंना अटक होत असल्याने साधकांमध्ये भीती निर्माण होणे स्वाभाविक असून अशी भीती वाटत असल्याने नामजप आणि प्रार्थना करत राहावी, असे सनातनने म्हटले आहे.
सनातन संस्थेच्या ‘सनातन प्रभात’ या संकेतस्थळावरुन साधकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यात म्हटले आहे की, निरपराध हिंदूंच्या अटकसत्रामुळे अशाच प्रकारे मलाही चुकीची अटक होऊ शकते अशी नाहक भीती साधकांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत साधकांनी नामजप आणि प्रार्थनेचे प्रमाण वाढवावे. अशा प्रकारच्या कारवाया झाल्या, तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. हे आतापर्यंतच्या विविध घटनांमधून समोर आले आहे, असेही यात शेवटी म्हटले आहे.
सनातन प्रभात या संकेतस्थळावर आणखी एक सूचना करण्यात आली आहे. सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर ‘राष्ट्रविरोधी संघटना’ असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत, असा आरोप यात करण्यात आला आहे. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा तसेच सनातनच्या कार्यात रस असल्याचे सांगून सनातनचे आश्रम किंवा साधकांच्या निवासस्थानी येऊन काही आक्षेपार्ह वस्तू ठेवू शकतात. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तींपासून लांब रहावे व त्यांना आश्रमाच्या आवारात येऊ देऊ नये, असे देखील यात म्हटले आहे.