रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दुस-यांदा सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही दिलासादायक घोषणा न केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दुस-यांदा सादर केलेल्या ‘रेल्वे अर्थसंकल्प २०१६’ मध्ये महाराष्ट्रासाठी काही दिलासादायक घोषणा न केल्याने महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांनी रेल्वे अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.
या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी वेगळे असे काही न देता मागच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार मुंबईसाठी ‘चर्चगेट-विरार’ आणि ‘सीएसटी-पनवेल’ असे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर्स (उन्नत मार्ग) उभारण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
प्रभू यांनी प्रवास भाड्यात कोणतीही वाढ न करून देशातील जनतेला थोडासा दिलासा दिला आहे. तसेच माल वाहतूक भाडे देखील जैसे थे ठेवण्यात आले आहे. हमसफर-तेजस-उदय-अंत्योदय सारख्या चार नव्या गाड्या सुरु करण्यात येणार आहेत. मात्र या गाड्या श्रीमंताच्या चोचले पुरवणा-या आहेत. यातून सर्वसामान्य आणि गोरगरीब प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (Public-private partnership) वाढवण्यावर रेल्वेने जोर दिला आहे. यात देशातील राज्य सरकारची मदत घेण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रातील सहकार्याने प्रोजेक्ट वेगाने पूर्ण करण्यावर फोकस करण्यात येणार आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर कारखाने सुरु करण्यात येणार आहे. यामुळे देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पण यापैकी एकही कारखाना महाराष्ट्रात व्हावा, असे प्रभूंना वाटले नाही.
महिलांना प्रत्येक कॅटगरीमध्ये ३० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सारथी सेवा सुरु करणार आहे, कोकण रेल्वेत प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली सारथी सेवा ज्यामुळे महिला आणि वृद्धांना सेवा देण्यात येते ती इतर स्टेशन्सवर वाढवण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर नांदेड, नाशिक, पालीसाठी स्पेशल ‘आस्था सर्किट ट्रेन्स’ चालवण्याचीही घोषणा केली आहे.
हमसफर ही संपुर्णपणे ३ टायर वातानुकूलित सेवा आहे. तर तेजस ही ताशी १३० वेगाने धावणारी ऑनबोर्ड एंटरटेनमेंट सुविधेचा कोच असणार आहे. यामध्ये वाय-फायची सुविधाही असणार आहे. तसेच उदय ही रात्रीच्या गर्दीच्या वेळी वातानुकूलित डबलडेकर सेवा असणार आहे. या शिवाय अंत्योदय ही लांब पल्ल्याची अनारक्षित सुपरफास्ट गाडी असणार आहे. मात्र या घोषणांचा कोणताही फायदा राज्यातील जनतेला होणार नसल्याने महाराष्ट्रातील जनतेने या अर्थसंकल्पावर तीव्र नापसंती दर्शवली आहे.
भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्थानक देशातले पहिले मॉडेल स्टेशन बनणार, गुजरातमधील बडोद्यात रेल्वे विद्यापीठ (यूनिव्हर्सिटी) उभारणार, कोच निर्मितीसाठी दोन कारखाने उभारणार, रेल्वेची गती व देशाच्या प्रगतीवर फोकस ठेवणार अशा देशाच्या अन्य राज्यांकडे कल असलेल्या प्रभू यांनी राज्यातील जनतेच्या अपेक्षा फोल करणारा हा अर्थसंकल्प असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.