राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणा-या वेगवेगळ्या नाट्य स्पर्धाचा बिगुल वाजला आहे. येत्या १ ऑगस्टपासून या स्पर्धाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ ऑगस्ट ही प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आहे.
राज्यभरातील नाट्यकलावंतांचा हक्काचा रंगमंच म्हणजे राज्य शासनाच्या वेगवेगळ्या नाट्य स्पर्धा. बालनाट्य, संगीत, संस्कृत, हिंदी, मराठी हौशी नाट्य संस्थांच्या कलावंतांना महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची वाटणारी ही स्पर्धा दरवर्षी शेकडो कलावंतांचा गौरव करीत असते. हीच स्पर्धा नव्या कलावंतांना प्रकाशझोतात आणत असते. महाराष्ट्रभरातील नाट्यकलावंत एकमेकांशी स्पर्धा करत असतात. आपले नाट्यगुण दाखवत असतात. त्यातून रंगमैत्रीचे नवे नाते विणत असतात. दरवर्षीच या स्पर्धेची सुरुवात या वेगवेगळ्या स्पर्धाच्या प्रवेश प्रक्रियेने सुरू होते आणि अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरणा-यांचा गौरव करून संपते. साधारणत: वर्षभर वेगवेगळे टप्पे पार करत रंगणा-या २०१५-१६ या वर्षीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार राज्यभरातील वेगवेगळे नाट्यगृह आरक्षित करण्यात आले आहेत.
पाच वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जात असल्या तरी यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणारी आणि गावखेडय़ापासून शहरांतील हौशी रंगकर्मीची हौस पूर्ण करणारी स्पर्धा म्हणजे हौशी मराठी नाट्य स्पर्धा. या स्पर्धेची प्राथमिक फेरी यावर्षी १७ नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या केंद्रांवर सुरू होणार आहे. त्यासाठी १ ऑगस्टपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, ती ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे हे ५५वे वर्ष असणार आहे.
हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पाठोपाठ आपले वेगळे महत्त्व अधोरेखित करणारी स्पर्धा म्हणजे बालनाट्य स्पर्धा. २०१५-१६ या वर्षीची या स्पर्धेची प्राथमिक फेरी
७ डिसेंबरपासून राज्यभरातील वेगवेगळ्या पाच शहरांत होणार असून, हे या स्पर्धेचे १३ वे वर्ष असणार आहे. िहदी, संगीत आणि संस्कृत भाषेतील नाट्य स्पर्धा डिसेंबर २०१५ आणि जानेवारी २०१६दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. या तीनही स्पर्धाची थेट अंतिम फेरी होत असते. या नाटकांसाठी प्राथमिक फेरी नसते.
बालनाट्य वगळता इतर नाट्य स्पर्धेकरिता रु. ३००० तसेच बालनाट्य स्पर्धेकरिता रु. १००० इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणा-या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्या वेबसाईटवर ‘नवीन संदेश’ या शीर्षकांतर्गत उपलब्ध आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका ३१ ऑगस्टपर्यंत संचालक, सांस्कृतिक कार्य, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (०२२-२२०४३५५०) येथे कार्यालयीन दिवशी व वेळेत स्वीकारल्या जातील. ३१ ऑगस्टनंतर प्राप्त होणा-या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे. याशिवाय प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येणार आहे. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, असेही आयोजकांनी कळवले आहे.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे निवेदन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी कळवले आहे.
स्पर्धा जाहीर झाली आहे. नाट्यगुणांचा गौरव होण्यासाठी हौशी रंगकर्मी कामाला लागले आहेत. या स्पर्धेचा दर्जा नाट्यगुणांनी उंचावण्यासाठी कुणीही, कुठलीही कसर सोडणार नाही, या विश्वासाने आपापल्या कलाकृती सादर करणार आहेत. गेल्या स्पर्धेत राहून गेलेल्या उणिवा रंगकर्मी आणि आयोजकांनी समन्वयाने भरून काढल्यास या स्पर्धेची श्रीमंती वाढणार आहे. त्यासाठी या स्पर्धेत सहभागी होणारे रंगमित्र आणि आयोजक यांचा संवाद होईल, अशी अपेक्षा करू या!