झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे कथानक सध्या कोकणातील भुताटकी, अंधश्रद्धा यावर सुरू असून यामुळे कोकणाची मोठी बदनामी होत आहे.
ठाणे – झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे कथानक सध्या कोकणातील भुताटकी, अंधश्रद्धा यावर सुरू असून यामुळे कोकणाची मोठी बदनामी होत आहे. याचा थेट फटका कोकणच्या पर्यटनाला बसण्याची शक्यता असून पर्यटनावर आधारित असलेल्या कोकणवासीयांवर यामुळे उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही मालिका बंद करा किंवा कथानकात बदल करा, अशा आशयाची नोटीस ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंदार केणी यांनी झी मराठी वाहिनीला पाठवली आहे. ठाण्यातील प्रसिद्ध वकील ओमकार राजूरकर यांच्यामार्फत ही नोटीस त्यांनी पाठवली आहे.
या मालिकेत दाखविलेली पात्रे मालवणी भाषेत बोलत असून त्यांच्या अवती-भोवती अदृश्य शक्ती दाखविण्यात आली आहे. यामुळे देशभरातून कोकणात येणा-या पर्यटकांच्या मनात भीती बसण्याची शक्यता असून एकीकडे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारच्या मालिकांमुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय यामुळे कोकणाची नाहक बदनामीही होत असल्याने ही मालिका ३ दिवसांच्या आत बंद करावी, अन्यथा पोलिसांत गुन्हा दाखल करू अशी भूमिका मंदार केणी यांनी या नोटीसमध्ये घेतली आहे. या मालिकेला कोकणी जनतेतूनही प्रचंड विरोध होत असून त्यामुळे आता झी मराठी काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
‘मग दाभोळकर, पानसरेंचे बलिदान व्यर्थ’
या नोटीसबाबत वकील ओमकार राजूरकर यांना विचारले असता, ज्या अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरांविरोधात लढताना दाभोळकर, पानसरे यांच्यासारख्यांनी बलिदान दिले, त्यांचे बलिदान अशा मालिकांमुळे व्यर्थ जात असल्याचे ते म्हणाले. शिवाय यात दाखवण्यात येत असलेल्या प्रकारांमुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून ही मालिका बंद झाली नाही, किंवा त्याचे कथानक बदलले नाही, तर माझे अशील उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राजूरकर दिली.
कोकण ग्रामविकास मंडळाचाही इशारा
दरम्यान, या मालिकेबाबत ठाण्यातील कोकण ग्रामविकास मंडळानेही झी मराठी वाहिनीला पत्र पाठवले असून त्यात मालिकेत दाखवलेल्या भुताटकीमुळे कोकणच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. शिवाय यात दाखवलेली मालवणी भाषाही चुकीची असून यात दाखवल्या जाणा-या प्रकारांतून कोकणचा अपमान होत असल्याचेही ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रात म्हटले आहे. ही मालिका बंद झाली नाही, तर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यान्वये तक्रार करण्याचा इशाराही राणे यांनी दिला आहे.