आज घरातून मुलगी बाहेर पडली की पालक जीव मुठीत घेऊन बसतात. कारण, पालकांच्या मनात दहशत आहे ती समाजात पसरलेल्या रानटी वृत्तीची!
रात्रीचे नऊ वाजले होते. स्मिताच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी तिच्या घरी आल्या. स्मितानं हसतमुखानं त्यांचं स्वागत केलं. स्मिताच्या आईने सगळ्यांसाठी सरबत केलं. दहा-पंधरा मिनिटांनी स्मिता आणि तिच्या मैत्रिणींमध्ये इशारे आणि कुजबुज सुरू झाली. स्मिताच्या आईच्या नजरेतून त्यांचे इशारे सुटू शकले नाहीत. ‘‘काय झालं मुलींनो?’’ स्मिताच्या आईने थेट प्रश्न केला. ‘‘काकी उद्या रविवार आहे. कॉलेजला सुट्टी आहे. चौकात आज दांडिया उशिरापर्यंत चालेल. स्मिताही आमच्या सोबत आली तर बरं होईल.’’ स्मिताच्या मैत्रिणी काचरत-काचरतच बोलल्या. ‘स्मिताचे बाबा आज घरी नाहीयेत. त्यामुळे मी स्मिताला एकटी पाठवू शकत नाही. सॉरी!’ आईचं बोलणं थांबताच स्मिता बोलली, ‘‘अगं आई, पण मी एकटी कुठं असणार? या मैत्रिणी असणारच की माझ्यासोबत.’’ ‘तुला एकदा सांगितलं ना? समजत नाही का तुला? हट्ट करायला आता लहान आहेस का तू?’ स्मिताच्या आईनं थोडं वैतागूनच तिला ओरडलं. मैत्रिणींसमोर आईनं आपला ‘इनसल्ट’ केला, असा समज (?) करून स्मिता रडत-रडत आपल्या बेडरूममध्ये गेली. स्मिताच्या मैत्रिणीही मग हिरमुसून निघून गेल्या हा एक प्रसंग. असाच एक दुसरा प्रसंग.. सायंकाळची साडेसहाची वेळ. सीनिअर केजीमध्ये शिकणा-या पिंकीने आपला होमवर्क पूर्ण केला. ‘‘मम्मा, माझा होमवर्क झालाय, मी अंगणात खेळायला जातेय.‘’ पिंकीने तिच्या आईला सांगितलं आणि ती निघू लागली. ‘पिंकी थांब, आत्ता इतक्या उशिरा एकटी बाहेर खेळायला जायची गरज नाही. अंधार व्हायला सुरुवात होईल. गप्पपणे घरातच खेळ. बाबापण नाहीयेत घरी. मी स्वयंपाकाची तयारी करतेय.’’ असं सांगून पिंकीच्या आईने घराचा दरवाजा बंद केला आणि दरवाजाची वरची कडी लावून घेतली. कारण, तिथपर्यंत पिंकीचा हात पोहोचणार नव्हता. बिचारी पिंकी हिरमुसली. तिचे डोळे भरून आले. आईने तिला लगेच मिठीत घेत कुरवाळून शांत केले.
पहिल्या प्रसंगात स्मिताच्या आईने तिला नवरात्रोत्सवात मैत्रिणींसोबत जायला रोखलं. दुस-या प्रसंगात पिंकीच्या आईने तिला सायंकाळी साडेसहानंतर अंगणात खेळण्यास परवानगी दिली नाही. आईने मैत्रिणींसमोर ‘इनसल्ट’ केल्याचा गैरसमज करून रुसणारी स्मिता आईने आपल्याला का रोखलं, हे समजण्याइतपत ‘अज्ञान’ नव्हती. दुस-या प्रसंगातील चार-पाच वर्षाची पिंकी मात्र खेळायला जाण्यास आईने परवानगी का दिली नाही, हे समजण्याइतपत ‘सज्ञान’ नव्हती. स्मिताने नवरात्रोत्सवाचा आनंद लुटू नये, चिमुकल्या पिंकीने अंगणात खेळू नये, अशी आईची इच्छा होती? नाही. पण, आजची आई घाबरते. ती का घाबरते? कसली भीती आहे तिच्या मनात?
गेल्या काही महिन्यांत घडलेल्या भयानक आणि किळस वाटणा-या घटनांचा मागोवा घेतला की, आजच्या आई-वडिलांच्या मनातल्या या भीतीमागचं उत्तर आपोआपच मिळतं. ते म्हणजे रानटी वृत्तीची दहशत! चिमुकल्या मुलींच्या, कॉलेजमध्ये शिकणा-या तरुणींच्या पालकांच्या मनात आजच्या घडीला या रानटी वृत्तीच्या दहशतीने क्षणाक्षणाला धडकी भरत आहे. दिल्लीतील ‘निर्भया’वर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने पेटलेल्या वादळानंतरही अशा घृणास्पद वाटणा-या प्रकारांचं ‘भय’ संपलेलं नाही. मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिलमधील दोन सामूहिक बलात्कार प्रकरणांनी या भीतीत आणखीनच भर टाकली आहे. तरुणींबरोबरच चिमुकल्या मुलींवरील अमानवी अत्याचाराच्या घटनांनीही पालकांना हादरवून सोडलं आहे. पणजोबाने आपल्या सहा वर्षाच्या पणतीवर बलात्कार केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी मुंबईत घडली. मन सुन्न करणारा आणि चीड आणणारा हा प्रकारही तेवढाच भयानक होता. अंगणात भावासोबत खेळणा-या एका चिमुकलीच्या तोंडात कापड कोंबून तिला दूर नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यात उघडकीला आली.
रोज असं काही ना काही ऐकण्यात अन् वाचण्यात येतं आहे. त्यामुळेच मुली, तरुणींचे पालक धास्तावले आहेत. दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना, मुंबईतील शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराची दोन प्रकरणं, गणेश विसर्जन मिरवणुकीत गिरगाव चौपाटीवर एका तरुणीसोबत घडलेला घृणास्पद प्रकार यामुळे आपली मुलगी आजच्या वातावरणात असुरक्षितच आहे, अशी भीतीवजा भावना प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण झाली आहे. या सा-या घटनांच्या पार्श्वभूमीवरच यंदाच्या नवरात्रोत्सवात मुंबईत तरुणाईचा निरुत्साह दिसून आला. या सा-या घटनांचा विचार करूनच अनेक पालकांनी आपल्या मुलींना नवरात्रोत्सवाच्या जल्लोषापासून रोखल्याची कबुली दिली आहे. या उत्सवाच्या आयोजकांनीही ते मान्य केलं आहे.
सकाळी मुलगी शाळेत, कॉलेजला जायला घरातून बाहेर पडली की ती घरी सुखरूप पोहोचेपर्यंत आईच्या काळजाचे ठोके वाढत असतात. बापाची तळमळ सुरू असते. स्कूल बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटना, शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचा-याच्या घटना आई-वडिलांच्या या तळमळीला कारणीभूत आहेत. मुंबईसारख्या दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीची जागा एका वेगळ्या भीतीने घेतल्याचं चित्र दिसतंय. आज घरातून मुलगी बाहेर पडली की पालक जीव मुठीत घेऊन बसतात. कारण, पालकांच्या मनात दहशत आहे ती समाजात पसरलेल्या रानटी वृत्तीची! मोठय़ा शहरांमध्ये ही परिस्थिती आहेच. मात्र छोटी शहरे आणि ग्रामीण भागातही या भीतीने हळूहळू घर करण्यास सुरुवात केली आहे. कामावर जाण्या-येण्याच्या निमित्ताने मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना अशाच भेदरलेल्या अनेक पालकांची चर्चा कानावर पडली. स्कूल बसमधून मुलीला पाठवण्यापेक्षा जवळच्याच एखाद्या छोटय़ा शाळेत अॅडमिशन घेऊन स्वत: ने-आण केलेलं बरं, असं मत चर्चेतून ऐकायला मिळालं. गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता मुलीचे पालक आता कुणावरही विश्वास ठेवण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. इतकी दहशत निर्माण झाली आहे.
बलात्का-यांना कडक शिक्षा देण्याची मागणी होते. काही प्रकरणांमध्ये जन्मठेप, फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अशा शिक्षेमुळे अत्याचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असा मतप्रवाह दिसून आला. पण, तरीही हे प्रकार थांबले का? नाही ना? अन् थांबणारही नाहीत. कारण भीती ही ‘मन’ असलेल्या मानवजातीला असते. रानटी वृत्तीच्या व्यक्तींना अशा कडक शिक्षांचं भय नसतं. त्यांच्यात असते ती फक्त आणि फक्त वासना. मग मुलीच्या, तरुणीच्या आई-वडिलांनी अशा रानटी वृत्तीच्या दहशतीखालीच जगायचं? आणखी किती काळ? कधी सापडेल या प्रश्नाचं उत्तर? वाट पाहताहेत प्रत्येक मुलीचे पालक या प्रश्नाच्या उत्तराची.