राज्य सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने २१ ते २४ जानेवारीदरम्यान रायगड महोत्सव पार पडला. शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष उभारण्यासाठी रायगडावर शिवसृष्टी निर्माण करण्यात आली होती.
रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्यापाशी पाचाड येथे रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एखाद्या किल्ल्यावर महोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती. शिवकालीन संस्कृतीचा चैतन्यदायी इतिहास मांडणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू नव्या पिढीसमोर मांडणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा रोमहर्षक इतिहास नव्या पिढीसमोर सादर करणे,पर्यटकांमध्ये गड, किल्ले याविषयी आवड निर्माण करणे असा या महोत्सवाचा उद्देश होता. किल्ले रायगडावर आणि पाचाड येथे दोन ठिकाणी एकाच वेळी हा महोत्सव साजरा झाला. रायगड हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजधानी किल्ला असल्याने या किल्ल्यापासून या महोत्सवाची सुरुवात केली गेली.
गड-किल्ल्यांचं संवर्धन आणि पर्यटन विकास व्हावा यासाठी महोत्सवाचे आयोजन केले गेले. रायगड महोत्सवामुळे शिवकालीन इतिहास अनुभवण्याची संधी मिळाल्याने गडप्रेमी या महोत्सवात मोठय़ा संख्येने सामील झाल्याने मोठा प्रतिसाद मिळाला. शिवभक्तांसाठी ही मोठी पर्वणीच ठरली. इतिहासप्रेमी भारावून गेले. मेघडंबरीची फुलांनी सजावट केली आहे. याबरोबर राजदरबारासमोर हत्ती-घोडे, नगारे सज्ज ठेवले आहेत. राजदरबारात राजसिंहासन ठेवले आहे. गडावर गोंधळी, वाद्य वाजवत होते. शिवशाहीर पोवाडे गात होते. वासुदेव नाचत होता. मोखाडा येथील आदिवासींचे नृत्य रंगले होते. धनगरांचे गोफ नृत्य सुरू होते. याबरोबर होळीच्या माळावर ढोल पथकाचे रिंगण रंगले होते. मर्दानी खेळही येथे सुरू होते.
जगदीश्वर मंदिरातून शिवरायांची मिरवणूक आली. शिवकालीन बाजारपेठ सजलेली होती. राजदरबारात शिवरायांचे आगमन होताच तुता-या ललकारल्या. चौघडे झडले. पारंपरिक नृत्ये बहरली आणि जिजाऊ व राण्यांसह महाराज सिंहासनाकडे आले. तेथे स्वराज्याची शपथ झाली अन् साक्षात छत्रपती सिंहासनावर विराजमान झाले. हा मंगल सोहळा पाहताना अनेकांचे डोळे दिपले. जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय..च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात किल्ले रायगडावर शिवशाही अवतरल्याचा थाट पाहायला मिळाला. रायगड किल्ल्यावर महादरवाजा, सभामंडप, राणीवसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधीस्थळ या वास्तूंची इतिहासकालीन सजावट करण्यात आली होती. राजदरबारात शिवकालीन पेहरावात सादर करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या जिवंत देखाव्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी गडावर शिवकालीन थाटात निघालेल्या मिरवणुकीमध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, विविध लोककलांचे दर्शनही घडले. राजमाता जिजाऊ वाडय़ालगत विस्तीर्ण माळरानावर उभारण्यात आलेल्या शिववैभवाचे दर्शन घडविणा-या शिवसृष्टीत शिवराज्याभिषेक सोहळा, शिवकालीन नाणी प्रदर्शन, किल्ल्यांच्या प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे, इतिहासतज्ज्ञांच्या व्याख्यानमाला, लोककलांचे दर्शन, ढोल-ताशांची आतषबाजी,शिवकालीन कथांचे कथाकथन उलगडून दाखविणारे दृकश्राव्य कार्यक्रम, पालखी, कीर्तन, भारूड, गोंधळ असे सोहळे पार पडले.
शिवसृष्टीमध्ये इतिहासकालीन गावाचा साज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात गाय, बैल यांचा वावर, पेंढय़ा आणि गवताने साकारलेल्या झोपडय़ांमध्येच विविध स्टॉल उभारून कलात्मकता साधली आहे. रायगडावर शिवकालीन वातावरण तयार करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सक्षम नेतृत्वातील महाराष्ट्राचे वैभव याठिकाणी प्रत्यक्ष साकार करून इतिहास व ऐतिहासिक वास्तूंची गौरवशाली परंपरा सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न होता. रायगडाचा महोत्सव म्हणजे गडप्रेमींना आनंद झाला. खूपसे गडप्रेमी गडावर जमले होते. वेगळा अनुभव होता. शिवाजी महाराजांच्या राजधानीतील वास्तूंना ब-याच जणांनी प्रथम भेट दिल्याने ती मंडळी भारावून गेली होती. पुढचा गड महोत्सव आणखी चांगला करता येईल.