मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते इंदापूर टप्प्यातील खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती तातडीने पावसाळ्यापूर्वी करावी व रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, असे आदेश जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिले आहेत.
अलिबाग- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते इंदापूर टप्प्यातील खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती तातडीने पावसाळ्यापूर्वी करावी व रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, असे आदेश जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिले आहेत. येणारा पावसाळा तसेच आपत्ती व्यवस्थापन या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रविण िशदे, उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रशांत फेगडे यांच्यासह पनवेल तहसीलदार पवन चांडक, पेण तहसीलदार श्रीमती सुकेशिनी पगारे, रोहा तहसीलदार ऊर्मिला पाटील आदी उपस्थित होते. महामार्गावरील कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच आपत्ती काळात महामार्गावर प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळतील यासाठी अॅम्ब्युलन्स सेवा विविध ठिकाणी उपलब्ध ठेवावी.
वाहन चालकांसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक बोर्ड, स्टिकर्स, होìडग लावावेत. पावसामुळे येणा-या अडचणी, ड्रेनेज आदीबाबतही तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले.
तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आदींच्यामार्फत या रस्त्याची पाहणी करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांनी आपआपल्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे भरणे व रस्ता दुरुस्तीसाठी तीन संच केले असून या संचामार्फत दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. जेसीबी, पोकलेन, ट्रक, कामगार आदींचा या संचात समावेश आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.