काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी ५६ दिवसांच्या रजेनंतर भारतात परतले.
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी ५६ दिवसांच्या रजेनंतर भारतात परतले. थाई एअरवेजच्या विमानाने बँकॉकहून सकाळी ११.१५ वाजता ते दिल्लीत दाखल झाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या घरासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला. नवी दिल्लीतील तुघलक लेनमधील ते राहत्या घरी दाखल झाले. यावेळी निवासस्थानी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.
राहुल गांधी सकाळी १०.३५ वाजता येणार होते. मात्र ४० मिनिटे उशिराने त्यांचे विमान उतरले. विमानतळावरून ते थेट निवासस्थानी गेले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करणे टाळले. त्यानंतर ते कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राहुल गांधी हे शुक्रवारी पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत. तसेच शेतक-यांच्या शिष्टमंडळाशीही चर्चा करणार आहेत.
येत्या दोन दिवसांत राहुल हे आपला मतदारसंघ अमेठीला भेट देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. कॉँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, कॉँग्रेसचे उपाध्यक्ष परतल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे नेतृत्व पक्षाला प्रेरणादायी ठरेल. दोघांच्या नेतृत्वाची गरज पक्षासाठी आवश्यक आहे.
राहुल गांधी हे सुट्टीसाठी गेले नव्हते तर आत्मविश्लेषण करण्यासाठी गेले होते. देशातील सर्वात जुन्या पक्षाचे ते परिपक्व नेते आहेत. ते लवकरच पक्षाच्या नेत्यांशी, प्रसारमाध्यमांशी चर्चा करतील. २३ फेब्रुवारी रोजी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी सुट्टीवर गेले होते.
दरम्यान, केंद्राच्या वादग्रस्त भू-संपादन अध्यादेशाच्या विरोधात दिल्लीत १९ एप्रिला शेतक-यांची रॅली आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये राहुल गांधी सहभागी होऊन मोदी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध करणार आहेत.