अन्न सुरक्षा विधेयकासाठी मतदान न करता आल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आश्रू आवरता आले नसल्याचे राहुल गांधी यांनी एका सभेत सांगितले.
शाहडोल(मध्य प्रदेश)- संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या महत्त्वाच्या अन्न सुरक्षा विधेयकासाठी मतदान न करता आल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आश्रू आवरता आले नसल्याचे राहुल गांधी यांनी एका सभेत सांगितले.
अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेने २६ ऑगस्ट रोजी मंजूर केले होते. या विधेयकावरील चर्चा दरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळेच त्यांना विधेयकावर मतदान करता आले नाही. या विधेयकासाठी सोनिया गांधी आग्रही होत्या. मात्र त्यांना मतदानात सहभागी होता आले नाही याचे दुखः असल्याचे राहुल यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली असतानाही त्या सभागृहात थांबण्याचा आग्रह करत होत्या. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांनी आपल्याला अन्न सुरक्षा विधेयकावर मतदान करायची इच्छा असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांनी यावेळी एनडीएच्या काळात करण्यात आलेल्या इंडिया शायनिंग या जाहिरातीवर जोरदार टीका केली.