रेल्वे प्रवासात सामान हरवले किंवा त्याचे नुकसान झाल्यास आता चिंता बाळगण्याचे कामच नाही.
नवी दिल्ली- रेल्वे प्रवासात सामान हरवले किंवा त्याचे नुकसान झाल्यास आता चिंता बाळगण्याचे कामच नाही. कारण रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सामानाचा विमा उतरवण्यात येणार आहे. आयआरसीटीसीतर्फे प्रवाशांना लवकरच ही सुविधा पुरवली जाणार आहे.
आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग केल्यावर प्रवाशांना ‘सामानाचा विमा’ ही सेवा पुरवली जाईल. या विम्याअंतर्गत लॅपटॉप, मोबाईल फोन आणि महागडय़ा वस्तूंचा समावेश असेल.
प्रवासाचा कालावधी आणि वर्ग यावर विम्याचा प्रीमियम अवलंबून असेल. या विम्यासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीसोबत चर्चा सुरू आहे. हा विमा ऐच्छिक असेल, असे आयआरसीटीसीच्या अधिका-याने सांगितले.
प्रवासाच्या कालावधीत प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यास त्याचाही विमा उतरवला जाणार आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ातून २० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी ५२ टक्के प्रवासी हे ई-तिकीट काढतात. सामानाच्या विम्यालाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असे अधिका-याने सांगितले.