पश्चिमेकडील रेल्वे तिकीट घर कार्यालयात रेल्वेच्या दक्षता पथकाने छापा टाकल्यानंतर बुकिंग क्लार्क अमित गोसावी यांच्याकडे १७० रुपये अधिक मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
कल्याण- पश्चिमेकडील रेल्वे तिकीट घर कार्यालयात रेल्वेच्या दक्षता पथकाने छापा टाकल्यानंतर बुकिंग क्लार्क अमित गोसावी यांच्याकडे १७० रुपये अधिक मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या तिकिटांत प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचे प्रकार या कार्यालयात सर्रास घडत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यापूर्वीही दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिकीट घरातील काळाबाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
रेल्वेच्या दक्षता पथकाचे जितेंद्र यादव, सुरेंद्र वाजपेयी व पी. के. वर्मा यांनी रेल्वे तिकीट कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी घाबरलेले बुकिंग क्लार्क अमित गोसावी यांनी त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दक्षता पथकातील वर्मा यांचा सरकारी मोबाइलही तुटला गेला. गोसावी यांनी हातावर पेनाने ओरखडे मारून इजा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दक्षता पथकाने टाकलेल्या छाप्यात बुकिंग क्लार्क गोसावीकडे १७० रुपये अधिक मिळून आले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरोधात रेल्वे कायदा १४५, १४६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यापूर्वीही रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक विवेक सहाय यांनी कल्याण रेल्वे बुकिंग कार्यालयात छापा टाकून दोन क्लार्कना रंगेहात अटक केली होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच अंबरनाथमध्येही भट्टाचार्य नामक बुकिंग क्लार्ककडून नकली तिकिटे मिळाल्याचा प्रकार घडला होता.
कसा चालतो काळाबाजार?
कल्याण जंक्शन परिसरात लांबपल्ल्याच्या सुमारे २५० मेल व एक्सप्रेस दररोज अप-डाउन होत असतात. गजबजलेले स्थानक म्हणूनच कल्याण ओळखले जाते. उत्तर आणि दक्षिणेकडे व देशाच्या कानाकोप-यातून गाडय़ा जातात. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत विवाह आणि इतर कार्यक्रम असल्याने मेल व एक्सप्रेस गाडय़ांत प्रचंड गर्दी असते. एखाद्या प्रवाशाने तिकीट कार्यालयातून २८५ रुपयांचे तिकीट घेतल्यास त्याच्याकडून बुकिंग कार्यालयातील कर्मचारी ३०० रुपये घेतात. सुम्पर चार्जच्या नावाखाली १५ रुपये त्या कर्मचा-याच्या खिशात जात असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. कायद्यानुसार तिकिटावर जी रक्कम छापली जाते तितकेच पैसे घेणे बंधनकारक आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात प्रवासी मोठय़ा प्रमाणात शिकार होत असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. कल्याण हे महत्त्वाचे स्थानक असल्याने तेथे बुकिंग क्लार्कची जागा मिळण्यासाठी कर्मचा-यांत स्पर्धा असल्याचे बोलले जाते.