सोशल मीडियाचा आवाका आता इतका प्रचंड वाढला आहे की, इतका की, आता भारतीय बाजारात बटणे असणारे मोबाईल दिसेनासे झाले असून फक्त स्मार्ट फोन बाजारात दिसू लागले आहेत. जगभरातील ग्राहकांचा स्मार्टफोनकडे कल आहे. या स्मार्टफोनचा उद्देश म्हणजे त्यात अनेक अॅप्लिकेशन्स आणि नवनवीन सोशल मीडिया सहज सुरू होऊ शकतात. पण या सोशल मीडियाचा वापर मोठय़ा प्रमाणात गैरवापरही होत असतो. संवादाचे हे माध्यम अधिक सुसंवाद साधू लागले असले तरी त्यातून अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. जसे फक्त फोनवर बोलण्याचे दिवस आता इतिहास जमा होऊ लागले आहेत. बोलण्याबरोबर फोटो, व्हिडिओ या गोष्टीही झटपट देवाणघेवाण करू शकतील, असे फोन कमी किमतीत मिळू लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापरही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप माहीत असलेली पिढी निर्माण झाली आहे. त्यांच्यासाठी या गोष्टी म्हणजे सहज टीव्ही पाहण्याइतक्या सोप्या राहिलेल्या आहेत.
सोशल मीडियावर लहानांपासून मोठय़ापर्यंत आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचा वावर वाढला आहे. अगदी डॉक्टरपासून सैनिकांपर्यंत सगळेच जण या सोशल मीडियावर दिवसातील आपला काही ठरावीक वेळ घालवू लागले आहेत. माहितीची देवाण-घेवाण मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. लष्करातील जवान आणि अधिकारीही दिवसातील काही वेळ सोशल मीडियावर घालवू लागले आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या नकळत विविध मार्गानी देशातील संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी देशविघातक शक्तींनी लष्करातील सैनिक आणि अधिका-यांसाठी ‘हनी ट्रॅप’मध्ये लावलेला असतो. दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी हवाई दलातील जवान रणजीत के. के. याला अटक करण्यात आली. त्याने देशाशी संबंधित माहिती सोशल मीडियावरून दुस-या देशाला नकळतपणे पुरवली. फेसबुकवर असलेल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये रणजीत सापडला. एका अनोळखी सुंदर महिलेचे छायाचित्र असलेल्या ‘फेसबुक’ अकाऊंटमधून झालेल्या माहितीच्या आदानप्रदानातून त्याने देशाशी संबंधित माहिती त्या महिलेला पुरवली होती. प्रत्यक्षात ही महिला म्हणजे दुस-या देशाचे गुप्तहेर होती. सुंदर महिलेच्या माध्यमातून सोशल मीडियावर येणा-या भारतीय सैनिकांना भुरळ घालून त्यांच्याकडून माहिती काढून घेण्याचे काम अशा प्रकारे इतर देशाचे गुप्तहेर करू लागले आहेत. म्हणून भारतीय लष्कराने सोशल मीडियावर जाताना मार्गदर्शक नियम घोषित केले आहेत. या नियमांनुसारच, आता लष्करातील सैनिकांना वापर करावा लागणार आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या आधीही रणजीत के. के. याच्यासारखे अनेक जवान आणि अधिकारी दुस-या देशांनी टाकलेल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले होते आणि त्या माध्यमातून त्यांनी देशातील सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तीला दिली होती. रणजीत याने हवाई तळांसंबंधीची माहिती दिली होती. आता सध्या पंजाबमधील पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी या हनी ट्रॅपचा काही संबंधही असू शकतो. म्हणून सोशल मीडियावर वावरताना काही खबरदारी घेण्याच्या सूचना लष्कराने केल्या आहेत. विशेष करून अश्लील संकेतस्थळे आणि छायाचित्रे असलेल्या संकेतस्थळांपासून, बक्षिसाचे आमिष दाखवणा-या संकेतस्थळांपासून लांब राहण्याची सूचना करण्यात आली आहे. लष्करामधील औपचारिक ओळख उघड करू नयेच; पण लष्करी गणवेशातील शस्त्रसहित छायाचित्रेही टाकू नयेत. संगणकावर लष्कराशी संबंधित माहिती साठवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करातील सैनिक आणि अधिका-यांनाच देशातील संवेदनशील माहिती ठाऊक असते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्याकडील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न हा दुस-या देशातील गु्प्तचर यंत्रणा करत असतात. म्हणून सोशल मीडियावर असलेला धोका वेळीच ओळखून लष्कराने आपल्या सैनिकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. देशप्रेम, राष्ट्रप्रेम, शिस्त आणि जबाबदारी यात सदैव पुढे असलेले सैनिक या सुचनांचे काटेकोर पालन करतील, अशी आशा आहे.