वनभोजन म्हटले की, आठवतात ते दिवस शाळेतले. शाळा हे ठिकाण काही औरच आणि तेही तळकोकणात सिंधुदुर्गात, हे सर्व प्रकार म्हणजे आठवणीतल्या गोष्टी. आयुष्य संपत आलं तरी या गोष्टींना अधिकच चव येते. ते शाळेतले दिवस म्हणजे जादूई दुनिया. ते दिवस पुन्हा कधीच येत नाहीत. जगायचं ते फक्त आठवणींना एकांतात घेऊन आणि आनंद मानायचा.
आजही वनभोजन असतं. वनभोजन अमुक दिवशी आहे असं गुरुजी-बाईंनी सांगितलं की, मुलांमध्ये एवढा प्रचंड उत्साह येतो की विचारू नका. तांदूळ किती आणायचे आणि प्रत्येकी किती किती पैसे काढायचे, याचा संपूर्ण तपशील बाई किंवा गुरुजी देत. जेवण बनविणा-या मुलांची निवड केली जाते. त्यांना मदत करणा-यांची यादी, कुणी कुठली कामे करायची याचा लेखाजोखा तयार केला जातो. भांडी कुणी कुठली आणायची, बाजाराचे सामान आणायला कोण जाणार? जागा निश्चित झाल्यावर दगडाची चूल बनविण्यापासून सुरुवात. लाकडे गोळा करणे, पाणी आणणे ही सर्व कामे सर्वानाच करावी लागायची. जेवण झाल्यावर पंगत बसायची, नंतर गाणी, नाच, एकपात्री अभिनय यात संपूर्ण दिवस घालवायचा. असे वनभोजन आयुष्यभर लक्षात राहते. मुलांना एक वेगळा आनंद मिळतो. सहल आयोजित केल्यावरही एक-दोन दिवसांचा विरंगुळा. कारण सतत अभ्यास आणि पुस्तकांचे ओझे सांभाळणारी ही मुलं एका दिवसासाठी का होईना मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेतात आणि आयुष्यातल्या जगण्यातला आनंद घेतात.
कुडाळ तालुक्यातल्या पांगड्र गावातील एन. व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर यांनी नुकतेच एका ठिकाणी वनभोजन आयोजित केले होते. या शाळेचे मुख्याध्यापक मराठे गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या संकल्पना राबवून मुलांना निसर्ग आणि संस्कृतीची आवड कशी निर्माण होईल याकडे लक्ष देतात. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक प्राथमिक शाळा, हायस्कूल आजही वनभोजन आयोजित करून निसर्गाशी संवाद साधताना दिसतात. असे गुरुजन नक्की असावेत जे मुलांमध्ये समरस होतात. वाढत्या शहरीकरणामुळे आणि मोबाईल युगामुळे मुलांमध्ये या गोष्टींची उणीव भासत चालली आहे, हेही नाकारता येत नाही. पण, मुलांमध्ये कष्ट व सामाजिक बांधिलकी जोपासली गेली पाहिजे. यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत.
ग्रामीण भागात पाहिजे तशी उद्याने नाहीत, क्रीडांगणे नाहीत अशा वेळी मुलांना खेळात स्वारस्य यावे, यासाठी त्यांची स्फूर्ती वाढावी म्हणून त्यांना अशा उपक्रमांबाबत योग्य ते ज्ञान देणे क्रमप्राप्त आहे. आजही नृत्याचे व्यासपीठ ग्रामीण भागात फार कमी मुलांसाठी उपलब्ध आहे. घरची परिस्थिती, वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता यामुळे हवे तसे व्यासपीठ त्यांना मिळत नाही. रानावनांत या वनभोजनाच्या निमित्ताने एक आनंद मिळतो. शहरी भागात या वनभोजनाची मात्र ‘पिकनिक’ झालीय. मोकळ्या मैत्रीचा स्वैराचारही पाहायला मिळतो, पण ग्रामीण भागात हे प्रमाण तर नाही. किंबहुना गुरुजनांचा आदर केला जातो. शिक्षणपद्धती बदलली तरी संस्कृती जपणा-यांनी संस्कृतीचा नक्कीच आदर केला आहे.
त्यामुळे बदलत्या व्यवस्थेसोबत बदलणे मान्य असले तरी शाळेतले ते दिवस नेहमी आठवणीतच असतात. खाकी पँट घालून खांद्यावर लाकडे घेऊन येणारा विद्यार्थी शर्टाला डाग लागले याचा विचार करत नाही आणि जेवण बनवताना डोळ्याला धूर बसला म्हणून जेवण थांबवणारी विद्यार्थिनी नाही. कारण हा आनंद मलेशिया, सिंगापूरला नाही मिळणार. खडकावर बसून हातात काठीचा माईक घेऊन वेडय़ावाकडय़ा आवाजात गाणे म्हणणे हे बालिशपणा नव्हे, तर विद्यार्थी दशेतला तो कलाकार असतो. सरस्वती पूजनाच्या वेळी वाडीतल्या मुलांच्या ओढण्या मागून दशावतार सादर करणारे विद्यार्थी आणि नऊवारी नेसून लावणी सादर करणारी विद्यार्थिनी आहे, त्यात समाधान माणणे हे महत्त्वाचे. आज आपण मुंबई व परदेशात नोकरी करताना हेच दिवस जेव्हा आठवतात, ते वनभोजन आठवते, तेव्हा मनाला मिळणारा आनंद द्विगुणित होतो.